You are currently viewing नगर परिषदेने ६० स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढले

नगर परिषदेने ६० स्वच्छता कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढले

आठ दिवसांत निर्णय न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात कचरा टाकण्याचा इशारा – माजी नगराध्यक्ष दिलीप गिरीप आक्रमक

वेंगुर्ला

वेंगुर्ला नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता नगरपरिषदेतील ६० कंत्राटी सफाई कामागारांना कामावरुन काढून टाकल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आले आहे. हे सर्व कामगार आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. गेले काही दिवस शहरातील कचरा उचलला जात नसल्याने शहरात कच-याचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कचराच उचलला जात नसल्याने नागरिकांनीही स्वच्छता कर न भरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ दिवसात या कंत्राटी सफाई कामगारांबाबत निर्णय न झाल्यास शहरातील कचरा मुख्याधिका-यांच्या केबिनमध्ये आणून टाकण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

वेंगुर्ला भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी भाजपाचे सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, साईप्रसाद नाईक, प्रशांत खानोलकर, रविद्र शिरसाट, दादा केळुसकर, प्रशांत आपटे, शीतल आंगचेकर, अॅड.सुषमा प्रभूखानोलकर, श्रेया मयेकर आदी उपस्थित होते. २०१६ ते २०२१ या कालावधीत भाजपाची सत्ता होती. याकाळात आम्ही ही स्वच्छतेची कामे पुढे सुरु ठेऊन त्यावर कळस रोवल्याने नगरपरिषदेला आत्तापर्यंत १५ कोटीची बक्षिसे मिळाली.

या कामात या सफाई कामगारांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे आम्ही कायमस्वरुपी सफाई कर्मचा-यांना सोयीसुविधा पुरवायच्या असतानासुद्धा या कंत्राटी कामगारांना गेल्या ५ वर्षात विविध सेवा पुरविल्या. वेंगुर्ला नगरपरिषदेत फक्त २८ कायमस्वरुपी सफाई कामगार आहेत. कंपोस्ट डेपो, गार्डन, रस्ते, ६ घंटागाड्या संक्शन व्हॅनसाठी म्हणून ६० कंत्राटी सफाई कामगार नेमण्यात आले होते. त्यांना १४ व १५वा वित्त आयोगातून पगार देण्याचे ठरले होते. मात्र, हा निधी ७ ते ८ महिन्यांपूर्वी संपला. त्यावेळी सव्वा कोटी बक्षिसाच्या रक्कमेतून त्यांना पगार देण्याचे ठरले व तसा प्रस्ताव मंत्रालयात मंजूर करुन आणल्याने नोव्हेंबर ते एप्रिल या काळात या कामगारांचे पगार या बक्षिस रक्कमेतून करण्यात आले. अजूनही नगरपरिषदेकडे सव्वा पाच कोटी रुपये बक्षिस रक्कमेतील आहे. नगरपरिषदेने तसा प्रस्ताव करुन त्याला प्रशासकीय मान्यता घेतली असती तर आज या सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आली नसती असेही माजी नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा