You are currently viewing नगरपालिकेच्या खांद्यावर हात ठेवून महोत्सव कसला करता ? सुदेश आचरेकरांचा सवाल

नगरपालिकेच्या खांद्यावर हात ठेवून महोत्सव कसला करता ? सुदेश आचरेकरांचा सवाल

आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी राणे कुटुंबियांप्रमाणे स्वखर्चातून महोत्सव करून दाखवावा

बाजारपेठेतील रस्ता सत्ताधाऱ्यांना ५ वर्षात जमला नाही, पण मुख्याधिकाऱ्यांनी ५ महिन्यात करून दाखवला

मालवण :

नगरपालिकेच्या वतीने मालवणात पर्यटन महोत्सव जाहीर करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या आयोजनावरून भाजपा नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. आमदार वैभव नाईक यांनी आमदारकीच्या काळात स्वखर्चातून महोत्सव सोडा साधा सांस्कृतिक कार्यक्रम घेतला नाही. नगरपरिषदेच्या खांद्यावर हात ठेवून कसला महोत्सव करता ? जसे केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि कुटुंबीय स्वखर्चातून दणक्यात महोत्सव साजरे करत होते तशी धमक शिवसेना नेत्यांनी दाखवावी असे आव्हान सुदेश आचरेकर यांनी दिले आहे.

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीका केली. यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, विजय केनवडेकर, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, विलास मुणगेकर, ललित चव्हाण, बाळा मालवणकर आदी उपस्थित होते.

आचरेकर म्हणाले, शिवसेनेला गेल्या पाच वर्षात बाजारपेठेतील रस्ता करता आला नाही. शेवटी व्यापाऱ्याना आक्रमक व्हावं लागलं. शिवसेनेचे राज्यकर्ते, नगराध्यक्ष आणि तेंच्या चेल्यांच्या नाकर्तेपणामुळे गेल्या पाच वर्षात बाजारपेठेतील रस्ता झाला नाही. मात्र, मुख्याधिकाऱ्यांनी फक्त पाच महिन्यात रस्ता करून दाखवला. यांना नारळ फोडताना शरम काशी वाटली नाही ? गेल्या पाच वर्षात विकास कामांचे तीनतेरा वाजले आहेत. बिल्डरांना अभय देऊन उंच उंच टॉवर बांधकामांना परमिशन देऊन कोटी कोटी उड्डाणे केली.
बिल्डरांना भेटायला, हितगुज करायला यांना वेळ आहे. मात्र, लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास याना वेळ नाही. त्यामुळे शिवसेना राज्यकर्त्यांनी फुकाचे रस्त्यांच्या कामाचे फुकाचे श्रेय घेऊ नये. कारण डिसेंबर मध्येच नगरपरिषद नगरसेवकांचा कालावधी संपला आहे. पाच महिने प्रशासकीय राजवट सुरू आहे. मुख्याधिकारी नगरपरिषदेचा कारभार हाकत आहेत. मुख्याधिकाऱ्यांनी प्रशासकीय कामाच्या अनुभवाच्या जोरावर कामे केली. प्रशासनाने केलेल्या कामाचे शिवसेनेनं श्रेय घेऊ नये. पाच वर्षात जे सत्ताधारी शिवसेनेला जमले नाही ते मुख्याधिकाऱ्यांनी चार महिन्यात करून दाखवले.

नगरपरिषदेच्या खांद्यावर हात ठेवून महोत्सव कसला करता ? हिंमत असेल तर स्वखर्चातून महोत्सव करावा. हा शहर वासीयांच्या पैशाची लूट करण्याचा प्रयत्न आहे. आमदार, पालकमंत्री, खासदार यांनी स्वखर्चातून महोत्सव करावा. जसे नारायण राणे, निलेश राणे, नितेश राणे यांनी सिनेकलावंत आणून महोत्सव दणक्यात साजरा करतात तशी धमक शिवसेनेमध्ये नाही. म्हणून प्रशासकाच्या खांद्यावर हात ठेवून जनतेच्या पैशाची लूट राज्यकर्त्यानी थांबवावी. जरा जरी शरम असेल तर स्वखर्चातून महोत्सव करावा. दहा वर्षांत वैभव नाईक एकही महोत्सव सोडा, साधा संकस्कृतीक कार्यक्रम घेऊ शकले नाही. फक्त जनतेची फसवणूक करत आहेत. गेल्या पाच वर्षात शहरात सांगाडे आणि गटार उभारण्याचे उद्योग केला. विकासाच्या नावाखाली पालिका लुटण्याचे काम केले. भुयारी गटार परिपूर्ण करणार अशी वलग्ना करणारे नगराध्यक्ष, आमदार, खासदार, पालकमंत्री याना साधे २० टक्के काम करता आले नाही. पाच वर्षात अग्निशमन बंब देता आली नाही. गेल्या पाच वर्षात आगी लागण्याचे प्रकार घडले. नागरिकांनी स्वतः रात्री अपरात्री धावून येऊन शहर वाचवले. शिवसेना बंब आणू शकली नाही. परंतु पाच महिन्यात मुख्याधिकारी जिर्गे यांनी करून दाखवले आहे. आवश्यक प्रस्ताव तयार करुन पाठवला आहे. त्यामुळे बंब आल्यावर हेच राज्यकर्ते नारळ फोडण्यास पुढे असतील असा टोला आचरेकर यांनी लगावला.

हिंमत असेल तर भुयारी गटार योजना पूर्ण करून दाखवा, हिंमत असेल तर शहर विकास आराखडा रद्द करून दाखवा. आराखडा जैसे थे मंजूर करून शहर उध्वस्त करण्याचा कुटील डाव आखला आहे. बिल्डरांना हाताशी धरून शहरावर नांगर फिरवण्याचे काम शिवसेनेने केले आहे. शहराची राखरांगोळी करण्याचे काम शिवसेनेनं केलं आहे असा घणाघातही सुदेश आचरेकर यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six − 2 =