You are currently viewing कणकवलीतील शिक्षिका तथा कवयित्री सरिता पवार यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योतिबा समता सहजीवन पुरस्कार प्रदान

कणकवलीतील शिक्षिका तथा कवयित्री सरिता पवार यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योतिबा समता सहजीवन पुरस्कार प्रदान

पत्रकार राजन चव्हाण राज्यस्तरीय सावित्री जोतिबा समता सहजीवन पुरस्काराने सन्मानित

 

पुणे येथील मिळून साऱ्याजणी मासिकामार्फत दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय सावित्री जोतिबा समता सहजीवन पुरस्कार कणकवली तालुक्यातील शिक्षिका तथा कवयित्री सरिता पवार आणि पत्रकार राजन चव्हाण या दाम्पत्याला पुणे येथील एस.एम.जोशी सभागृहात सावित्री जोतिबा समता उत्सव 2022 या कार्यक्रमात जेष्ठ नाट्यकर्मी अतुल पेठे, मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादिका गीताली वि.म., पुरुष उवाच दिवाळी अंकाचे संपादक संदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते 21 एप्रिल रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

यावेळी सिनेदिग्दर्शक तथा लेखक सुनील सुकथनकर, जेष्ठ पत्रकार संध्या टाकसाळे, प्रा. डॉ. संजयकुमार कांबळे आदी उपस्थित होते. याआधी मिळून साऱ्याजणी चा सावित्री जोतिबा समता सहजीवन पुरस्कार पुणे येथील ऍड. शारदा वाडेकर – ऍड. मोहन वाडेकर, किशोर ढमाले – प्रतिमा परदेशी, वैशाली भांडवलकर – संतोष चव्हाण यांना प्रदान करण्यात आला आहे. यावेळी बोलताना मिळून साऱ्याजणी च्या संपादिका गीताली वि. म. म्हणाल्या की स्त्रीपुरुष समानता ही मूळ सूत्र बनवून वाटचाल करणारे मिळून साऱ्याजणी हे मासिक आता केवळ मासिक राहिले नसून एक सामाजिक चळवळ बनली आहे. मिळून साऱ्याजणी च्या संस्थापक विद्या बाळ यांच्या संकल्पनेतून 2014 साली मासिकाच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून सावित्री जोतिबा यांच्या विचारधारेला अनुसरून समाजभान जपत सामाजिक कार्य करणाऱ्या आणि समाजात आणि वैयक्तिक जीवनात स्त्री पुरुष समानतेची वाटचाल करणाऱ्या दाम्पत्याला सावित्री जोतिबा सहजीवन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

सरिता पवार आणि राजन चव्हाण हे दांपत्य आपल्या अद्वैत फाऊंडेशन च्या माध्यमातून राष्ट्र सेवा दल शिबिरे आयोजित करून युवा पिढी आणि किशोरवयीन मुलांच्या मनावर साने गुरुजींच्या विचारांचे संस्कार रुजवत आहेत. यथाशक्ती पदरमोड करून एकविचाराने गरजूना मदतही करत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत सावित्री जोतिबा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सत्काराला उत्तर देताना सरिता पवार म्हणाल्या की हा पुरस्कार म्हणजे सावित्री जोतिबा या लोकोत्तर नावाची ठळक नाममुद्रा आमच्या जगण्यावर मिळून साऱ्याजणी च्या परिवाराने उमटवलेली आहे.समतेच्या शिकवणी चे बाळकडू आईवडीलांकडून मिळाले. केवळ नोकरी, साहित्य क्षेत्र आणि घर या परिघाबाहेर जगताना पतीची साथही महत्वाची असते.घरोघरी सावित्री आहेतच पण त्यांचा जोतीबाचा शोध सुरूच असतो. प्रत्येक घरात जर जोतिबा निर्माण झाले तर समानतेवर जगणारा समाज निर्माण होईल. यशस्वी पुरुषामागे स्त्री असणे अथवा यशस्वी स्त्रीमागे पुरुष असण्यापेक्षा एकमेकांच्या हातात हात गुंफून समाजभान जपत एकमेकांचा सन्मान जपण्याचा आजचा काळ आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा