You are currently viewing नि:संग

नि:संग

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर यांनी “नि:संग” या संजीवनी बोकील यांच्या कवितेचं केलेलं रसग्रहण..

स्वत:चं सामान्यत्व
फार छळू लागलं
की म्हातारीच्या पिसाकडे बघावं
स्वच्छंदपणे कसं ऊडत असतं हवेत
आपल्याला कुणी गरुड म्हणत नाही
याची त्याला खंत नसते
बळकट पंख नसल्याचा
खेद नसतो
आकाशाचा अंत गाठण्याचा
हव्यास नसतो
अन् पृथ्वीचा ठिपका
होउन जाण्याइतकी
उंची गाठायचा मोह नसतो.
आपल्याच मस्तीत भिरभिरत
हवेशी जुळवून घेत
आपल्या हलक्या अस्तित्वाला
सहजपणे स्वीकारत
ते मजेत जगून घेतं
उंचावर गेल्यावर
जमिनीची भीती नसते
अन् जमिनीवर उतरल्यावर
नसतो आकाशाचा मोह!
म्हणून
स्वत:चंं सामान्यत्व
फार सलु लागलं
की बघावं
नि:संग भिरभिरणार्‍या
म्हातारीच्या पिसाकडे….

संजीवनी बोकील

 

.. नि:संग..संजीवनी बोकील..रसग्रहण

काही दिवसांपूर्वीच संजीवनी बोकील यांची नि:संग
ही कविता वाचनात आली.एकेका शब्दांत मी रमून गेले.
मनातला एक विचार इतक्या सहज आणि साध्या
शब्दांत मांडण्याचं कसब,संजीवनीताईंच्या काव्यात
जाणवलं…
या कवितेतून त्यांनी एक सुंदर संदेश दिलाय्.
भरकटणार्‍या ,खचलेल्या,थकलेल्या सैरभैर झालेल्या
मनाला एक सकारात्मक दिशा दाखवली आहे.
माणसाच्या मनात भय का आणि कधी
निर्माण होतं?जेव्हां..
स्वत:च्या सामान्यत्वाला त्याला सामोरं नसतं जायचं.
पंखातलं बळ ठाऊक नसतं.
भरारी गरुडासारखी घ्यायची असते.
ऊंच आकाशाला गवसणी घालायची असते.
मग ओंजळीत येतो तो न्यून गंड..निराशा…
अपयश….आणि एक छान आयुष्य आनंदालाच
विन्मुख होतं….!!!
अशा मानसिकतेसाठी कवियत्री म्हणते,

।।स्वत:चं सामान्यत्व
फार सलू लागलं
की बघावं
नि:संग भिरभिरणार्‍या म्हातारीच्या पिसाकडे ।।

म्हातारीचं पिस..!!
हातभरच ऊडणार्‍या या पिसाला, आनंदाने भिरभिर उड्या मारत पकडणार्‍या बाळपणीची सहज आठवण झाली…
पण या नि:संग, स्वत:च्याच मस्तीत आकाशात गिरक्या घेणार्‍या या म्हातारीच्या पिसांतूनच ,संजीवनी बोकील यांनी जीवनानंदाचं एक तत्व किती सहजतेनं उलगडलंय!!
त्याला कुणी गरुड म्हणत नाही याचं दु:खं नाही
पंख बळकट नसल्याचा खेद नाही.
आकाशाचा अंत गाठायचा हव्यास नाही
उंची गाठायचा मोह नाही…
भिरभिरत,हवेशी जुळवून घेत ,हलक्या अस्तित्वाला सहज
स्वीकारत ते मजेत जगून घेतं…!!
ना जमिनीची भीती ना आकाशाचा मोह….
नि:संग जगण्याची शिकवण अशी निसर्गातूनच मिळते…
जगणं महत्वाचं….!!
जगण्यातली स्वीकृती महत्वाची…
संतांनी सुद्धा हेच म्हटलंय् ना..
।।ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।।
जे. कृष्णमूर्तींच्ंही असंच एक वाक्य….
know yourself..!!Be with you….happiness is within you..!!
सत्यात, सहजतेत,स्वीकृतीत आनंद आहे..
स्पर्धेत,मृगजळापाठी धावून दमछाक का करुन घ्यायची…?
संजीवनीताईंच्या या नि:संग,हवेत मस्त भिरभिरणार्‍या
म्हातारीच्या पिसाने शिणवटलेल्या मनावर हलकेच
फुंकर घातली..,,

सौ.राधिका भांडारकर
पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा