You are currently viewing आडाळीतील बंधाऱ्याच काम बंद पाडण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित 

आडाळीतील बंधाऱ्याच काम बंद पाडण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित 

पुंडलिक दळवी यांनी वरिष्ठांकडून तोडगा काढण्याचा दिला शब्द

सावंतवाडी :

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातर्फे आडाळी येथे कडशी नदीवर बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्यामुळे गावातील नळपाणी योजना, शेती, बागयतीवर परिणाम होणार आहे. विकासकामाला आमचा विरोध नाही. मात्र, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून गढूळ पाणी पिण्याची नामुष्की ओढवली आहे. या विरोधात सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे, डोंगरपाल, नेतर्डे, गोव्यातील फकीरफाटा, कडशी, तोरसे, मोपा, तांबोसे, उगवे गावातील ग्रामस्थांनी आडाळी येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केलं होतं. यावेळी या कामाला पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थगिती दिली होती.

दरम्यान, या बंधाऱ्याच्या कामाला कायमस्वरूपी स्थगिती मिळावी यासाठी हे काम बंद पाडण्याचा निर्णय या गावच्या ग्रामस्थांनी घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी यात हस्तक्षेप करत हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्याच आवाहन केले. यावर स्थानिक आमदार दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, उद्योग मंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा करून कायमचा तोडगा काढण्याचा शब्द पुंडलिक दळवी यांनी दिला. यानंतर बंधाऱ्याच काम बंद पाडण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. यावेळी सरपंच संजय डिंगणेकर डिंगणे उपसरपंच जयेश सावंत, एम डी सावंत, विलास सावंत, डोंगरपाल माजी सरपंच लाडू गवस,व्यंकटेश नाईक, पेडणे तालुका विकास समिती अध्यक्ष, कडशी नदी बचाव संघर्ष समिती नेते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा