You are currently viewing ^वास्तुशास्त्र शंभर टक्के शास्त्रच^

^वास्तुशास्त्र शंभर टक्के शास्त्रच^

श्री. सचिन अं. बागुल, वास्तुशास्त्र तज्ञ यांचा वास्तुशास्त्र या विषयावर अतिशय उपयुक्त अभ्यासपूर्ण लेख

वास्तुशास्त्र या शब्दात शास्त्र हा शब्द समाविष्ट आहेत तरीपण आज वास्तुशास्त्राबाबत समाजात बरेच गैरसमज आहेत.

जुने ते सोने , लोक पुन्हा जुन्या गोष्टींकडे वळत आहेत. हे एक शास्त्र आहे ,हे आता सर्वांनीच मान्य केले आहे .आपण करोडो रुपयाचे घर घेतले पण गृह सौख्य नसेल तर त्याची किंमत शून्य नसून मायनस आहे असे समजावे .

बर्‍याच सुशिक्षित लोकांना हा एक अंधश्रद्धेचा प्रकार वाटतो. या अशाच लोकांसाठी मी हे लिखाण करत आहे. या लेखात मी तुमच्या गैरसमजूती दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.

सर्वप्रथम आपण वास्तुशास्त्राबाबत थोडी माहिती करून घेऊ.
वास्तुशास्त्र हे एक त्याच्या नावाप्रमाणे वास्तुशी संबंधित असे शास्त्र आहे. वास्तुशास्त्र हे हजारो वर्षांपूर्वीपासुनचे शास्त्र आहे. वास्तुशास्त्रात प्रत्येक वास्तु बांधताना ती कशी बांधावी, कुठे बांधावी, त्यातील अंतर्गत रचना कशी असावी याचे नियम दिलेले आहेत. वास्तुशास्त्रात निसर्गातील पाचतत्वे जसे जल,अग्नी, पृथ्वी, वायु व आकाश या तत्वांचा प्रामुख्याने विचार केला जातो व या पंचतत्वांना वास्तुत योग्य ते स्थान दिले जाते. ही पांच तत्वे आहेत म्हणून सजीव सृष्टी आहे .
आता आपण सर्व प्रथम वास्तुशास्त्राचा मूळ उद्देश काय हे जाणून घेऊया. निसर्गातील या पाचतत्वांचा योग्य तो वापर करून मानवी जीवन अधिकाधिक सुखी, समाधानी व निरोगी बनवणे हाच वास्तुशास्त्राचा मुख्य उद्देश आहे. वास्तुशास्त्र हे संपूर्णपणे शास्त्रीय गोष्टींवर आधारित आहे. यातील दिलेले प्रत्येक नियम हे आधुनिक शास्त्रावरच आधारित आहेत. पृथ्वीचे परीवलन, पृथ्वीचे दोन ध्रुव, सूर्यप्रकाश व त्यातील विविध किरणे आदी सर्व गोष्टींचा वास्तुशास्त्रात खुप सखोल अभ्यास केला गेला आहे. तुमच्या माहितीसाठी काही उदाहरणे देतो.

1 वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा उत्तर ते पूर्व दिशेत असावा.

वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दरवाज्याला उत्तर ते पूर्व या स्थानात प्राधान्य दिले जाते. याचे मुख्य कारण हेच की जेणेकरून घरात अधिकाधिक सकाळची सूर्यकिरणे यावीत. सुर्याच्या सकाळची किरणे ही अतिनील ( Ultra Violet ) किरणांनीयुक्त असतात. हीच Ultra Violet किरणे जलशुद्धीकरणासाठी सध्या वाॅटर प्युरिफायरमध्ये वापरली जातात. ही किरणे आरोग्याच्यादृष्टीने ही खुप उपयोगी असतात. जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उत्तर ते पूर्व दिशेला असेल तर सहाजिकच तुमच्या घराचा दिवाणखाना (लिव्हिंग रूम ) याच दिशेत येतो जेणेकरून अधिक मोकळ्या जागेत हा सकाळचा सूर्यप्रकाश पसरून घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत मिळते. याच दिशेला जलतत्वाचे स्थान ही सांगितले गेले आहे जेणेकरून शुद्ध पाण्याद्वारे उत्तम आरोग्याचा लाभ ही होतो. सूर्याची हीच किरणे बुद्धीच्या दृष्टीनेही खुप उपयुक्त आहेत.

2 शौचालय हे वायव्य दिशेत का असावे ?

वास्तुशास्त्रानुसार शौचालय खरंतर घरात नसावेच परंतु आधुनिक जीवनशैलीचा विचार करता ते घराच्या वायव्य दिशेला असावे. या मागचे शास्त्रीय कारण हे आहे की जर शौचालय वायव्य दिशेला म्हणजे वायुतत्वाच्या प्रभावात असेल तर त्यातील दुर्गंधी वायुच्या प्रभावामुळे घराबाहेर घालवण्यास मदत होते. तसेच संध्याकाळी सूर्यकिरणे शौचालयाच्या निर्जंतुकिकरणास सहाय्यक ठरतात. सुर्याच्या संध्याकाळच्या किरणांमध्ये अतिताम्र म्हणजे (Infra Red ) किरणे अधिक असतात . ही किरणे अतिनील किरणांपेक्षा जास्त प्रभावी असतात. म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार ही किरणे घरात येऊ देऊ नयेत असे सांगितले जाते.

3 वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर अग्नेय दिशेला असावे.

अग्नेय दिशा ही पूर्व व दक्षिण दिशेतील उपदिशा आहे. ही स्त्रीकारक दिशा असून अग्नीतत्वाच्या प्रभावातील दिशा आहे. अग्नेय दिशेला किचन म्हणजेच स्वयंपाकघर असेल तर सहाजिकच तेथे अग्नीचा वापर होतो व अग्नी प्रस्थापित होतो. तसेच बर्‍याच घरात स्त्रीया स्वयंपाक करतात त्यामुळे त्यांना या दिशेत अधिक लाभ होतो. तसेच पूर्व दिशेतुन येणारा सूर्यप्रकाश व त्यातील अतिनील किरणांद्वारे घरातील स्त्रीयांना उत्तम शारीरिक तसेच मानसिक आरोग्याचा लाभ होतो. तसेच घरातील सर्वच लोकांना चांगले पौष्टिक खाण्यामुळे उत्तम आरोग्याचा लाभ होतो.

नीट अभ्यासपूर्वक पाहीले तर वास्तुशास्त्रातील सर्वच नियम असे शास्त्रीय सिद्ध झालेल्या सिद्धांतावर आधारित आहेत. आपल्या भारतातील ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी याबाबत अभ्यास करून हे नियम बनविले आहेत. आपल्याला भारतीय म्हणून खरंतर या गोष्टीचा अभिमान वाटायला हवा पण उलट आपण नीट जाणून न घेताच या वास्तुशास्त्राला कमी लेखतो. एक भारतीय म्हणून मला या गोष्टीचा खुप खेद वाटतो की आपल्या देशात उगम पावलेल्या अश्या कितीतरी विद्या व शास्त्र आहेत की जे दुसर्‍या देशात आजही प्रगतीसाठी वापरतात. परंतु आपल्या देशातच त्यांना विरोध सहन करावा लागतो. गंमत बघा ना ज्या पिरॅमिडचा शोध आपल्या ऋषीमुनींनी हजारोवर्षांपूर्वी लावला आज तोच पिरॅमिड इतर देशांच्या ( ईजिप्त, चीन ) नावाने ओळखला जातो.
अजूनही वेळ गेली नाही आतातरी जागे व्हा. विरोधापूरता विरोध न करता सत्यता जाणून घ्या व त्यानंतरच अंगीकार करा. आज रोजच्या रोज अनेक सुख सोयींच्या गोष्टी बाजारात येतात पण खरच जग किंवा आपण सुखी आहोत का? नाही .उलट रोज नवीन नवीन समस्या वाढतच जात आहेत. यासर्वांतुन मार्ग काढण्याची क्षमता वास्तुशास्त्रात खरच आहे. फक्त गरज आहे त्याच्याकडे विश्वासाने व तितक्याच डोळसपणे बघण्याची. 2009 सालापासून मी शेकडो घरांचे वास्तुपरीक्षण केले आहे. आज सांगायला आनंद वाटतो की त्यातील अनेकांना खुप चांगले अनुभव आले आहेत. कित्येकांच्या समस्या दूर झाल्या आहेत. शेवटी आपणच योग्य तो विचार करू शकतात.

माझ्यापरीने तुमचे गैरसमज दूर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा लेख नक्कीच आवडेल ही आशा आहे. तुमच्या प्रतिक्रीया जरूर कळवा. घरात तोड फोड न करता ही वास्तूत सुधारणा करून नव्याने गृह सौख्य हवे असेल तर नक्की कॉल करावा. जगी सुखी असा कोण आहे ? विचारी मना सांगून पाहे. हल्ली पैसा असूनही सुख दूर जात आहे कारण आपण प्राचीन शास्त्र विसरत चाललो आहे.

सर्व जगाच्या सुखाची कामना पसायदान द्वारे मागणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या जगातील सर्वांना गृह सौख्य मिळावे अशी कामना करून थांबतो .

सुखी भव

श्री. सचिन अं. बागुल ( वास्तुशास्त्र तज्ञ )
संपर्क – 9820115846

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × five =