You are currently viewing राष्ट्रवादीला पुन्हा सुगीचे दिवस आणणारे लढवय्ये नेतृत्व… :- पुंडलिक दळवी.

राष्ट्रवादीला पुन्हा सुगीचे दिवस आणणारे लढवय्ये नेतृत्व… :- पुंडलिक दळवी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रवादी संपली असे म्हणत असतानाच राष्ट्रवादीला सावंतवाडी मतदारसंघात उभारी देणारं नेतृत्व उभे राहिले ते म्हणजे पुंडलिक दळवी सर्वसामान्य कुटुंबातील पुंडलिक दळवी हे आपले कष्ट आणि अपार मेहनतीच्या जोरावर व्यवसाय उद्योगात यशाच्या शिखरावर पोचले. नोव्हेल्टी स्टोअर, हॉटेल उद्योग, किराणा व्यापारी असा प्रवास करत बांधकाम क्षेत्रातही उत्तम यश मिळवत त्यांनी समाजसेवेची कास धरली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, अर्चना फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांनी समाजसेवेला प्रारंभ केला. गेली १५ वर्षे ते समाजसेवेत कार्यरत आहेत.
राष्ट्रवादीला तालुक्यात नेतृत्व राहिलं नाही असं बोलले जात असतानाच समाजकार्याबरोबरच राजकारणात प्रवेश करून जनतेची सेवा करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत त्यांनी आपली मेहुणी व पुणे जिल्हा बँकेच्या संचालिका तथा राष्ट्रवादीच्या पिंपरी चिंचवड नगरपालिकेच्या नगरसेविका अर्चनाताई घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. आपल्या कुशल नेतृत्वामुळे त्यांनी तालुक्यात राष्ट्रवादीची पाळेमुळे पुन्हा घट्ट रोवण्यास सुरुवात केली आणि राष्ट्रवादीला उभारी आणली. त्यांच्या यशस्वी नेतृवामुळे सावंतवाडीच्या नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळत होती, परंतु महाविकास आघाडीचा धर्म पाळत त्यांनी माघार घेतली होती. पक्षाने त्यांच्यावर उद्योग व व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली होती. अनेक युवकांना राष्ट्रवादीकडे आकर्षित करत त्यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यास सुरुवात केली, त्यांच्या कुशल नेतृवावर विश्वास ठेवत अनेकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला व आजही करत आहेत.
सावंतवाडी तालुक्यात केसरकरांनी रामराम केल्यानंतर संपलेली राष्ट्रवादी पुंडलिक दळवी यांनी पुन्हा जोमाने उभी केली त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदाची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली. तालुकाध्यक्ष पदाचा कार्यभार आपल्या हातात घेतल्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही, गावागावातील तरुणांना एकत्र करत त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला. जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राष्ट्रवादीला तालुक्यात वेगळी ओळख निर्माण करून दिली. गोरगरिबांना अडचणीच्या वेळी मदतीचा हात देत जनमाणसांवर आपली छाप पाडली, लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलने देखील केली. राष्ट्रवादी सत्तेत असताना देखील अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा ते जनतेसाठी लढत राहिले, त्यामुळे पुंडलिक दळवी हे सर्वसामान्यांना आपलेसे वाटू लागले. कोरोना काळातही गरजवंतांच्या पाठीशी ते ठाम राहिले, बांदा, दोडामार्ग वगैरे भागात पूरस्थिती आली तेव्हाही त्यांनी जोमाने मदतकार्य केले होते. दोडामार्ग च्या डोंगराळ भागात जिथे प्रशासनाची मदत पोचली नव्हती तिथेही त्यांनी आपली व पक्षाच्या माध्यमातून मदत पोचवली. सर्वच पक्षातील नेत्यांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे देखील वेळोवेळी त्यांना मदतीचे ठरतात. त्यांच्या हसतमुख स्वभावामुळे ते अनेकांना आपलेसे वाटतात. त्यामुळे जनतेच्या मनावर राज्य करत त्यांनी अल्पावधीतच समाजकारणाबरोबरच राजकारणात देखील उत्तुंग भरारी घेतली आहे. आपल्या सौजन्यपूर्ण वागणुकीमुळे जनमानसात आपलासा वाटणारा नेता म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या तरुण तडफदार नेतृत्वाला संवाद मिडियाकडून त्यांच्या ४१ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 4 =