You are currently viewing महापुरुषांच्या चरित्र वाचनातुन उद्याची सक्षम पिढी घडेल – उदय सामंत

महापुरुषांच्या चरित्र वाचनातुन उद्याची सक्षम पिढी घडेल – उदय सामंत

*महापुरुषांच्या चरित्र साधने समित्यांनी अतिशय वेगवान पद्धतीने काम करावे*

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समित्यांची बैठक संपन्न*

मुंबई :

महापुरुषांच्या चरित्र साधने समित्यांनी अतिशय वेगवान पद्धतीने काम करावे असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी यावेळी दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती यांची स्वतंत्र बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र शासनाने विविध चरित्र साधने समित्यांचे पुनर्गठन केल्यानंतर शासनाने संबंधित समित्यांच्या बैठकांचे आयोजन केले. या बैठकांमध्ये त्या – त्या चरित्र साधने समित्यांच्या सदस्य सचिवांनी प्रकाशन समित्यांच्या आजवर झालेल्या कामांचा अहवाल मांडला. तसेच येत्या वर्षभरामध्ये हाती घ्यावयाच्या उपक्रमांची माहिती मंत्री श्री.सामंत व सदस्यांना दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशनातील सहाव्या खंडाचे प्रकाशन लवकरात – लवकर करून ते लोकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच सध्या बाजारात उपलब्ध नसलेले आणि लोकांची मागणी असलेले सर्व खंड तातडीने आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जावेत अशा सूचना संबंधितांना करून यासाठी निधीची कसलीही कमतरता पडू दिली जाणार नाही असे श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र खंड ३ आणि खंड ४ चे नवीन प्रकाशन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असून खंड १ आणि २ चे पुनर्मुद्रण करावे अशा प्रकारची सूचना संबंधितांना केली आहे. चरित्राच्या खंडाचे प्रकाशन मुंबईला न होता ते संबंधित महापुरुषाच्या जन्मस्थानी आणि त्यांच्या कर्मभूमीत व्हावेत असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या साहित्याची निर्मिती करून सध्या टिळकांच्या वंशजांकडे उपलब्ध असलेल्या साधनांचे प्रकाशन करावे असे निर्देश श्री.सामंत यांनी यावेळी दिले. तसेच अशा प्रकारचे सर्व साहित्य मुंबईतील अभिलेखांगारांमध्ये उपलब्ध असेल त्यासाठी गृह विभागाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या शासन तातडीने घेऊन देईल, असेही श्री. सामंत यावेळी सांगितले.

राज्यात व राज्याबाहेर संसाधनांचा शोध घेण्यासाठी सोयीचे जावे यासाठी सर्व समित्यांचे सदस्य सचिव आणि सदस्य यांना तातडीने नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात यावीत असे निर्देश श्री.सामंत यांनी यावेळी दिले.

कोविड – १९ ची स्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्यातील महाविद्यालयांत डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक तसे इतर महापुरूषांच्या नावाने अभ्यासमंडळे स्थापन केली असल्याचेही, श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

सर्व चरित्र साधने प्रकाशन समित्यांची प्रकाशने ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जातील. सर्व पुस्तकांना आयएसबीएन क्रमांक मिळण्यासाठी आणि सर्व समित्यांची ऑनलाईन पोर्टल तयार करण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले आहेत. तसेच हे साहित्य ऑनलाईन स्वरूपात अधिक सुलभ पद्धतीने सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिले जाईल, असे श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीस डॉ.दीपक टिळक, डॉ.भालचंद्र मुणगेकर, प्रा.राजा दीक्षित,डॉ.प्रकाश बचाव, प्रा.अरविंद गणाचारी, प्रा.बळीराम गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव मल्लिका अमर शेख, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव डॉ.श्रद्धा कुंभोजकर व संबंधित मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + eight =