You are currently viewing जामदा पुल धोकादायक, सावित्री पुलाची पुनरावृत्ती नको – नासीर काझी 

जामदा पुल धोकादायक, सावित्री पुलाची पुनरावृत्ती नको – नासीर काझी 

पुलाचे तात्काळ स्ट्रक्‍चरल ऑडिट करा…

वैभववाडी

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयांना जोडणारा जामदा पूल वाहतुकीला धोकादायक बनत चालला आहे. या पुलाकडे दुर्लक्ष केल्यास महाड येथील सावित्री पुलाची पुनरावृत्ती होऊ शकेल अशी भीती व्यक्त करत या धोकादायक पुलाचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे. अशी मागणी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.
या पुलाला तब्बल पन्नास वर्ष पुर्ण झाली आहेत. पुलाचे संरक्षण कठडे ढासळले आहेत. तर स्लँबला तडे गेले आहेत. दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीत हा पूल पाण्याखाली जातो. या पुलाला सात खांब आहेत. तर पुलाची उंची अंदाजे पाच ते सहा मीटर इतकी आहे. खारेपाटण-गगनबावडा मार्गावरती हा पूल आहे. राजापूर तालुक्यातील मठखुर्द हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत आहे. या गावातील ग्रामस्थांना शासकीय कामासाठी राजापूर व केळवली याठिकाणी जाण्यासाठी याच पुलावरून ये -जा करावी लागते. या पुलावरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दोन वर्षापूर्वी महाड येथील सावित्री पुल महापुरात वाहून गेला होता. अचानक पुल गेल्याने दोन एसटी बस देखील पुलावरून कोसळत वाहून गेल्या होत्या. काळीज पिळवटून टाकणारी मोठी दुर्घटना घडली होती. जामदा पुलाकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास सावित्री पुलाची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. पुढील धोका टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकामने पुलाबाबत तात्काळ पावले उचलावीत. या पुलावरून होणारी अवजड वाहतूक थांबवावी व पुलाची दुरुस्ती तात्काळ करावी अशी मागणी नासीर काझी यांनी पत्रकातून केली आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − 3 =