You are currently viewing शासनाच्या ‘वन नेशन, वन रेशन’ योजनेचे ग्राहक पंचायतीकडून स्वागत

शासनाच्या ‘वन नेशन, वन रेशन’ योजनेचे ग्राहक पंचायतीकडून स्वागत

वैभववाडी :

शासनाने ग्राहकांच्या हिताचा विचार करून ‘वन नेशन, वन रेशन’ सुरू केलेल्या योजनेचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभागाच्यावतीने स्वागत करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांची गैरसोय दूर होणार असल्याचे मत ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग प्रभारी अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक श्री.एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष श्री.संदेश तुळसणकर यांनी व्यक्त केले आहे. ग्राहक पंचायतीच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, आजपर्यंत कार्डधारकाला ज्या स्वस्त धान्य दुकानाचे रेशनकार्ड असेल त्यात दुकानातून धान्य घेण्याची मुभा होती. काम आणि रोजगाराच्या शोधार्थ अनेक कुटुंबे दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या राज्यात जात असतात. त्याठिकाणी मोलमजुरी करत असताना त्यांना रेशनकार्ड असून देखील जादा भावाने धान्य खरेदी करावे लागत होते. तीच अवस्था ऊस तोडणी कामगारांची होती. ऊस तोडणी करीता हे लोक आपले गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यात चार-पाच महिने जातात. त्यावेळी त्यांना आपल्या हक्काचे राशन खरेदी करता येत नव्हते. या बाबीचा शासनाने गांभिर्याने विचार करून ‘वन नेशन, वन रेशन’ योजना सुरू केली आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे आता ग्राहकाला आपल्या पद्धतीने कोणत्याही दुकानातून आपल्या हक्काचे राशन घेता येणार आहे. केवळ राशन घेण्याकरीता ग्राहकाला आपल्या गावी जाण्याची गरज भासणार नाही. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन शासनाने घेतलेल्या निर्णयाचे ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभागाने स्वागत केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × one =