You are currently viewing जिल्ह्यातील मृत होण्याचे प्रमाण हे उशिराने रुग्ण दाखल होत असल्याने – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील मृत होण्याचे प्रमाण हे उशिराने रुग्ण दाखल होत असल्याने – जिल्हाधिकारी

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्या मोठी दिसत असली तरीही रुग्ण पॉझिटिव्हीटी दर खाली आलेला आहे. असे सांगतानाच जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे, त्याचं कारण म्हणजे रुग्ण उशिराने दाखल होतात हे आहे. त्याच बरोबर ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत अशा रुग्णांचं मृत्यूच प्रमाण अधिक आहे ते कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्योत नायर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदेश कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मे महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट 31.4 टक्के होता. तो दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 15 ते 21 मे या कालावधीत 32 टक्के झाला. त्यानंतर 22 टक्के अशी स्थिती होती. मात्र सद्यस्थितीत हा रुग्ण पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्के पेक्षा कमी आला आहे.

रुग्ण संख्या अधिक दिसत असली तरी तपासणी वाढवल्यामुळे ही संख्या अधिक आहे. कोरोना च्या या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हॉटस्पॉट निश्चित केले असून त्या ठिकाणच्या तपासण्या अधिक प्रमाणात वाढविण्यात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची साथ इतर जिल्ह्यापेक्षा उशिराने सुरू झाली आणि ती मोठ्या प्रमाणात वाढली. आता ही साथ हळूहळू आटोक्यात येत आहे असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.

मृत्यूचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू
राज्याचा मृत्यूचा दर हा दोन टक्के आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मृत्यू रेट 2.4 टक्के एवढा आहे. हा खरे म्हणजे जास्तच आहे. याचे कारण म्हणजे रुग्ण उशिराने दाखल होतात. रुग्ण गंभीर झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल होतो आणि त्याचा परिणाम मृत्यु मध्ये होतो. तसेच ज्या रुग्णांना गंभीर आजार आहेत अशा रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मात्र हे प्रमाण कमी होण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यासाठी पुणे येथील ससून रुग्णालयातील चार तज्ञ फिजिशियन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे अजून चांगले उपचार करणे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केल

तर कडक कारवाई करणार
रुग्णांचे नातेवाईक रुग्णां सोबत राहतात त्यानंतर ते बाहेर समाजात ये जा करतात. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण आहे. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयांमध्ये नातेवाईकांनी रुग्णां सोबत राहू नये यासाठी त्यांचे प्रबोधन करण्याचे काम सुरू आहे. आपणही आपल्या रुग्णालयांतील दौऱ्यावेळी ही स्थिती पाहिली आहे. हे नातेवाईक रुग्णां सोबत राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अतिगंभीर रुग्ण असतील तर अशा रुग्णांना काही वेळेसाठी जाऊन नातेवाईकांना सर्व सुरक्षा यांचे पालन करून जाता येईल, मात्र इतर नातेवाईकांना जाता येणार नाही. अशा रुग्णां सोबत जाणाऱ्या नातेवाईकांवर कारवाई करण्याचे काम सुरू केले आहे. तरी कुणी ऐकत नसेल तर त्यांच्यावर अधिक कडक कारवाई केली जाईल असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हि दुसरी लाट संपर्कातून अधिक पसरत आहे. त्यामुळे ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हाडाच्या माध्यमातून सिंधुदुर्गनगरी येथे सुरू होणारे कोरोना सेंटर हे 50 बेड चे असून. यामध्ये 30 बेड ऑक्सिजनचे असणार आहेत. यासाठी लागणारे साहित्य आदि म्हाडा पुरविणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

तिसरी लाट आली तर त्यासाठी प्रशासन तयार
तिसरी लाट येईल आणि तिचा जास्त धोका लहान बालकांना असेल असे म्हटले जात आहे. तशीच स्थिती झाली तर प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे. त्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आपल्याकडे पुरेसा आहे. त्याचबरोबर लहान मुलांसाठी लागणारे व्हेंटिलेटर व्यवस्थाही करण्यात आली असून यासाठी कुडाळ महिला रुग्णालयात 50 बेडचे लहान मुलांसाठीचे विशेष कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालरोग तज्ञांशी आपली चर्चा झाली असून त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे आवश्यक ती उपायोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर म्यूकर मायक्रोप्रोसेसर चे तीन रुग्ण जिल्ह्यात ॲक्टिव असून त्यांच्यावर गोवा हॉस्पिटल आणि सीपीआर कोल्हापूर या ठिकाणी उपचार सुरू असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

सिंधुदुर्ग जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आवश्यक असलेला ऑक्सिजन उत्पन्न होत आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणाहून ही ऑक्सिजन मागविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऑक्सीजन चा प्रॉब्लेम नसल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले. तर लहान मुलं जिल्ह्यात 1 लाख 70 हजार एवढी असून या सर्वांचे नित्य लसीकरण सुरू आहे. या सर्वांची तिसऱ्या फेजमध्ये काळजी घेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आरोग्य विभागाअंतर्गत सुरू असल्याचे यावेळी डॉक्टर संदेश कांबळे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात 5143 एवढी गाव स्तरावर विलीनीकरण कक्ष सुरू करण्यात आले होते. यापैकी 5 हजार विलीनीकरण कक्ष सुरू असून या कक्षांमध्ये गावातील बऱ्यापैकी रुग्ण दाखल असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी सांगितले.तर सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये एकूण 62 गावे हॉटस्पॉट बनली आहेत. यामध्ये कुडाळ तालुक्यातील 15 गाव, दोडामार्ग तालुक्यातील 4 गावे, सावंतवाडी तालुका 8 गावे देवगड तालुक्यात चार गावे कणकवली तालुक्यात 13 गावे, मालवण तालुक्यात 11 गावे आणि वेंगुर्ला तालुक्यात 6 गावे अशी एकूण 65 गावे जिल्ह्यात सध्या कोरोना हॉटस्पॉट बनली असल्याचे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =