You are currently viewing कोकणातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी सीआरझेडच्या परवानग्या वेगाने मिळवा

कोकणातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी सीआरझेडच्या परवानग्या वेगाने मिळवा

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आदेश

रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सागरी आणि खाडी किनार्‍यालगतच्या गावांचे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याची योजना आहे. मात्र, हे बंधारे बांधण्यासाठी आवश्यक असलेली सीआरझेड परवानगी मिळण्याबाबतच्या प्रस्तावांना मान्यता देण्याची प्रक्रिया वेगाने करावी, असे आदेश राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शक्रवारी दिले.

राज्याच्या किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सागरी किनारपट्टी तसेच खाडी किनारी भागाला मोठा फटका बसला. समुद्राला आलेल्या उधाणामुळे समुद्राचे पाणी घुसून घरांचे तसेच शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर सागरी आणि खाडी किनार्‍यालगतच्या गाव संरक्षणासाठी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यासाठी सीआरझेडच्या परवानग्या तातडीने देण्याच्या मागणीसाठी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या विनंतीवरून ही बैठक आयोजित केली होती.

सीआरझेड मान्यतेबाबत महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यावस्थापन प्राधिकरणाकडे मिर्‍या बंदराचा एकच प्रस्ताव प्रलंबित आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावर प्राधिकरणाच्या पुढच्या बैठकीत चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा, असे निर्देशही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 21 आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 28 प्रस्ताव पत्तन व्यवस्थापनाने जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केले आहेत,अशी माहितीही यावेळी देण्यात आली. या प्रस्तावावरही संबंधीत जिल्हाधिकार्‍यांनी नियमानुसार योग्य तो निर्णय घेऊन प्रस्ताव लवकरात लवकर सागरी किनारा क्षेत्र व्यावस्थापन प्राधिकरणाकडे सादर करावेत, असे आदेश त्यांनी दिले.

या बैठकीला सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत,रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ड. अनिल परब,खासदार विनायक राऊत,पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर,पर्यावरण संचालक नरेंद्र टोके,रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा,सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 − three =