You are currently viewing राजन तेलींचा खरा मुखवटा जनता ओळखून आहे

राजन तेलींचा खरा मुखवटा जनता ओळखून आहे

तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांची टिका

सावंतवाडी
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या पासून सत्ताधारी पक्षाचे सर्व नेते, पालकमंत्री शिवसेनेचे खासदार व आमदार कोवीड रुग्णांसाठी सेवा देण्याचे काम करत आहेत मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली कुचकामी ठरल्याने लोकांची दिशाभूल करण्यासाठी सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत. उलट जनता राजन तेली यांचा खरा मुखवटा ओळखून आहे, असा टोला शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी हाणला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सत्ताधारी पालकमंत्री, आमदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुचकामी ठरल्याने कोविड रुग्ण मोठ्या हलाखीच्या स्थितीत आहेत आणि ऑक्सिजन व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत आहे सत्ताधारी असूनही प्रशासनाला त्यांची ताकद मिळाली नसल्याने रूग्णांचे हाल होत असल्याची टीका केली होती यावर शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत ,खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेचे आमदार आपापल्यापरिने काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी महामारी हाताळण्यासाठी जे मॉडेल राबविले त्याचे जगभर कौतुक होत आहे हे राजन तेली यांना खूपते त्यामुळे ते भाजपच्या नथीतून टीका करत आहे असे राऊळ यांनी म्हटले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री, खासदार,आमदार हे आपापल्या परीने लोकांची आरोग्य सेवा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करत आहेत आणि प्रशासनाच्या सहकार्याने ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, प्रतिबंध प्लस आणण्यासाठी देखील प्रयत्न करत आहेत ही वस्तुस्थिती असताना राजन तेली फक्त दिशाभूल करण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर टीका करताहेत असे राऊळ यांनी म्हटले आहे.

तेली यांना रुग्णांची सेवा करण्यासाठी कोणीही अडवले नाही ही राष्ट्रीय आपत्ती आहे प्रत्येकाने आपापल्या ताकदीनुसार आरोग्यसेवेसाठी झटले पाहिजे त्यासाठी आरोप-प्रत्यारोप टीकाटिप्पणी करण्याची गरज नाही. यातूनच राजन तेली यांचा दिखाऊपणाचा मुखवटा समोर आला आहे त्यामुळे तेली यांच्या अशा राजकारणाबाबत जनता प्रचंड नाराज आहे असे रुपेश राऊळ यांनी सांगितले.

कोविड रुग्ण सापडल्यानंतर त्यांचे कुटुंबीय भयभीत होते, या भयभीत होणाऱ्या कुटुंबियांना मार्गदर्शनाची गरज असते हे मार्गदर्शन आणि ऑक्सीजन रुपी विचार त्यांना दिले तर ते रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ शकतात पण काही विरोधक आरोग्यसेवेच्या सुविधा कमी आहेत किंवा सुविधा नाहीत असे भासवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे लोक कोवीड सेंटर किंवा हॉस्पिटल मध्ये जात नाहीत आणि शेवटच्या क्षणी रूग्णालयात जातात तेव्हा ऑक्सिजन कमी होते आणि दुर्दैवाने त्यांना जीव गमवावा लागतो हे टीका करणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे असे राऊळ यांनी आवाहन केले आहे

शिवसेना रस्त्यावर उतरून काम करणारी आहे त्यामुळे शिवसेनेच्या पालकमंत्री, आमदार किंवा सत्ताधार्‍यांच्या बाबत बोलताना राजन तेली यांनी जरा भान ठेवायला हवे. फक्त सुरक्षित ठिकाणी बसून पत्रकार परिषदा घेऊन काम करणाऱ्या तेली जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेली यांच्या भाजपाची सत्ता असणाऱ्या गोवा राज्यासह अन्य राज्यांमध्ये काय हलाखीची परिस्थिती आहे ते लोकांनी जाणून घेतले तर राजन तेलीना तोंड दाखवायला जागा राहणार नाही गोव्यामध्ये उच्च न्यायालय सध्या परिस्थिती हाताळत आहेत यावरूनच भाजपच्या सत्ता असणाऱ्या राज्या मधली परिस्थिती लोकांना समजली आहे असे राऊळ यांनी म्हटले आहे.

तेली यांनी उगाच नाकारात्मक मुखवटा लोकांना दाखवू नये त्यांचा खरा मुखवटा लोक जाणून आहेत. त्यामुळे त्यांनी काम करणाऱ्या पालकमंत्री आणि आमदार यांच्यावर टीका करताना भान ठेवावे असा इशारा राऊळ यांनी दिला. कोविड काळात राजकारण नको तर आरोग्य सेवा हवी त्यामुळे तेली यांनी आरोग्य सेवेला प्राधान्य दिले तर पालकमंत्री, आमदार चांगले काम करत आहेत हे त्यांच्या लक्षात येईल असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा