*निवतीतील जलसफरीवर बंदी; पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव- वैभव नाईक*
*देवबाग, तारकर्ली, वेगुर्ला निवती आणि मालवणच्या स्थानिक पर्यटन व्यवसायिकांवर अन्याय केल्यास शिवसेना पक्ष तीव्र आंदोलन छेडेल*
निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना जलसफर घडविणाऱ्या नौकांना महाराष्ट्र सागरी मंडळाने आय.व्ही. ॲक्टअंतर्गत प्रवासी वाहतुकीस बंदी घातली आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायिकांवर मोठे संकट आले असून, रोजगार हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. निवतीतील जलसफरीवर बंदी घालून हा पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
वेंगुर्ले येथील पर्यटनस्थळे स्थानिक पर्यटन व्यवसायिक आणि स्थानिक नागरिकांनीच पर्यटकांच्या दृष्टिक्षेपात आणली आहेत. त्यामुळेच या भागातील पर्यटनात वाढ झाली. मात्र, आता तेथे अत्याधुनिक बोट प्रकल्प राबवून पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा महायुती सरकार आणि प्रशासनाचा प्रयत्न असेल, तर त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विरोध राहील.
वेंगुर्ले येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिक गेल्या अनेक वर्षांपासून निवती लाईट हाऊस परिसरात पर्यटकांना सुरक्षितपणे जलसफर घडवून आणत आहेत. त्यामुळे केवळ नियमांवर बोट ठेवून जलसफर बंद करण्याऐवजी, स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या माध्यमातूनच जलसफर सुरू ठेवण्यासाठी सुरक्षित आणि नियमानुकूल आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
सिंधुदुर्ग मधील पर्यटन व्यवसाय धनदांडग्यांच्या हाती देऊन देवबाग, तारकर्ली, वेगुर्ला निवती आणि मालवणच्या स्थानिक पर्यटन व्यवसायिकांवर अन्याय केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.
