You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे होणार सर्वंकष मूल्यमापन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांचे होणार सर्वंकष मूल्यमापन

प्रत्यक्ष स्थितीचा पारदर्शक अहवाल सादर करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

दुर्गम भागापासून शाळांची पाहणी सुरू करण्याच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी : विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शाळांमधील पायाभूत सुविधांची पूर्तता सर्वोच्च प्राधान्याने करण्यात यावी. कोणाला तरी चांगले वाटावे म्हणून नव्हे, तर शाळांमधील प्रत्यक्ष वास्तव समोर आणणारा पारदर्शक वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करावा, असे स्पष्ट निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळांच्या पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, शाळा इमारतींच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी विविध योजनातून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक शाळेत मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, डिजिटल शिक्षणासाठी सौरऊर्जा पॅनेल्स, वाचनालय, क्रीडांगण आणि संरक्षक भिंती यांसारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता अनिवार्य करण्यात आली असून, शासनाच्या सर्व शालेय निकषांची (इंडिकेटर्स) काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील सर्व १,३०० शाळांचा एकत्रित अहवाल तयार करण्यासाठी प्रशासनातील अधिकारी आणि जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रीय भेटी द्याव्यात. या मोहिमेची सुरुवात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील शाळांपासून करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुबोध माने आदींसह शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शाळा भेटीदरम्यान केवळ औपचारिक पाहणी न करता विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पालकांशी थेट संवाद साधून स्थानिक अडचणी समजून घ्याव्यात. तसेच शाळेकडे ये-जा करण्यासाठी योग्य रस्ते आहेत का, याचीही खातरजमा करावी. प्रत्येक शाळेतील गरजा ओळखून परिपूर्ण ‘असेसमेंट रिपोर्ट’ तयार करावा आणि त्यानंतर विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून या गरजा प्राधान्याने पूर्ण कराव्यात, असे निर्देशही पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा