पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले होते दहन
कणकवली / प्रतिनिधी :
डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ कणकवली येथे झालेल्या आंदोलनप्रकरणी दाखल गुन्ह्यात महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, आमदार प्रमोद जठार यांच्यासह सर्व १६ आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.
१७ डिसेंबर २०२२ रोजी जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना कणकवली एसटी स्थानकासमोरील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निदर्शने करत पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. याप्रकरणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप ठेवत कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विनोद सुबराव चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली होती.
या प्रकरणात तत्कालीन आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, प्रज्ञा ढवण, हर्षदा वाळके, राजश्री धुमाळे, किशोर राणे, रवींद्र शेट्ये, गणेश तळेगावकर, महेश सावंत, रवींद्र गायकवाड, प्रदीप ढवण यांच्यासह एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.
प्रकरणातील साक्षीदारांचे जबाब व उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींविरुद्ध आरोप सिद्ध होत नसल्याचे नमूद करत त्यांची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात नितेश राणे, प्रमोद जठार आणि अन्य आरोपींची बाजू ॲड. राजेश परुळेकर व ॲड. ओंकार परुळेकर (कणकवली) यांनी मांडली.
