You are currently viewing आंबोली येथील सैनिक स्कूलच्या ”फी” बाबतचा वाद शिक्षणमंत्र्यांच्या कोर्टात…

आंबोली येथील सैनिक स्कूलच्या ”फी” बाबतचा वाद शिक्षणमंत्र्यांच्या कोर्टात…

तहसीलदार कार्यालयातील बैठकीत निर्णय; संस्थाचालकांसह पालक आपल्या भूमिकेवर ठाम….

सावंतवाडी

आंबोली येथील सैनिक स्कूलच्या संदर्भात फी वरून निर्माण झालेला वाद आज येथील तहसीलदार कार्यालयात पोहोचला.
फी मध्ये आपल्याला सुट देण्यात यावी,अशी मागणी उपस्थित पालकांकडून करण्यात आली.परंतु सवलत किंवा फी माफी दिल्यास आम्ही संस्था चालवायची कशी?असा सवाल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आला.त्यामुळे दोन्ही बाजूकडून कोणीच माघार न घेतल्यामुळे शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करून यावर तोडगा काढू,अशा सूचना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी पालक व संस्थेच्या प्रमुखांना दिल्या.त्यानुसार येत्या दोन दिवसात मुंबईत जाऊन शिक्षणमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्णय देण्यात आला आहे.
आंबोली येथील सैनिक स्कूलची फी कमी करण्यात यावी,अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे.आपण कोरोनाच्या काळात अडचणीत असल्यामुळे फी पूर्णता भरणे शक्य नाही.असे पालकांचे म्हणणे आहे.त्यामुळे काही अंशी ही माफ करा,अशी त्यांनी मागणी संस्थेकडे केली आहे. यासाठी आंदोलने,उपोषणे झाली होती. परंतु यावर तोडगा काढण्यासाठी आज येथील तहसीलदार कार्यालयात पालक व संस्थाचालकांची एकत्र बैठक घेण्यात आली.यावेळी त्या ठिकाणी असलेल्या संस्थेचे पदाधिकारी पी.एफ.डान्ट्स,सुनील राऊळ आदींनी आपण संस्था म्हणून विचार करा, संस्थेकडून कोरोना काळात सुद्धा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे.उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी कोणत्याही “ऍक्टिव्हिटीज” बंद केल्या नाहीत.त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले आहे.परंतु आता मात्र पालकांनी अर्धी फी देणार, अशी भूमिका घेतल्यास आम्ही संस्था कशी चालवायची संस्था खाजगी असल्यामुळे आम्ही अडचणीत येणार आहोत.त्यामुळे पालकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, पूर्ण फी भरावी किंवा न्यायालयाने,शासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यास आम्ही निर्णयाप्रमाणे उर्वरित फी परत देऊ,परंतु आता संस्थेची परिस्थिती नाही असे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावर दोन्ही बाजूने संस्थाचालक व पालक ठाम राहिले.त्यामुळे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्वजण या ठिकाणी चर्चा करीत बसण्यापेक्षा याबाबत योग्य तो निर्णय होणे गरजेचे आहे. सैनिक स्कूल म्हणून थेट शिक्षणमंत्र्यांकडून एखादा धोरणात्मक निर्णय होऊ शकतो. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊनच पुढील भूमिका स्पष्ट करा,यासाठी प्रथम शिक्षणमंत्र्यांची चर्चा करा, अधिवेशन असल्यामुळे हा प्रश्न निश्चितच सुटेल,असा विश्वास आहे. त्यामुळे योग्य ते धोरण ठरवा नाहक वाद करू नका,अशा सूचना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिल्या.त्यामुळे शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन यातून मार्ग काढला जाईल,असा निर्णय घेण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 13 =