वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन
नगरपरिषद प्रशासन लवकरच आंबा बाजारपेठेसाठी स्वतंत्र सोय करणार
सावंतवाडी:
शहरातील आंबा व्यापाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि आगामी हंगामात बाजारपेठेचे नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती यावेळी व्यापाऱ्यांच्या अडचणी ऐकून घेतल्यानंतर, त्यावर लवकरच ठोस उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले.
बैठकी दरम्यान प्रतीक बांदेकर यांनी व्यापाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. शहरात आंब्यांच्या स्टॉल्समुळे वाहतूक कोंडी होऊ नये, याची प्राथमिक जबाबदारी व्यापाऱ्यांनी स्वतः घ्यावी, असे त्यांनी बजावले.
नगराध्यक्षांनी मांडलेले प्रमुख मुद्दे
शिस्तबद्ध स्टॉल्स: व्यापाऱ्यांनी आपले स्टॉल्स अशा पद्धतीने लावावेत जेणेकरून ररस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आणि वाहनधारकांना कोणताही त्रास होणार नाही.
प्रशासनाला मदत: केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता, व्यापाऱ्यांनी स्वतः जबाबदारी घेऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मदत करावी.
स्वच्छता आणि शिस्त: बाजार परिसरात होणारी गर्दी आणि कचरा याकडेही व्यापाऱ्यांनी लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.
स्वतंत्र आंबा बाजारपेठेचे नियोजन
व्यापाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर बोलताना नगराध्यक्ष म्हणाले की, सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने आंबा विक्रेत्यांना बसण्यास मुभा आहे परंतु दुपारी वाहनांची संख्या या मार्गावर वाढत असल्याने रस्त्याच्या एका बाजूनेच आंबा विक्रेत्यांनी बसावे अशा सूचना नगराध्यक्ष श्रद्धा सावंत भोसले यांनी केल्या. आंबा व्यापाऱ्यांच्या समस्या रास्त असून त्या सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. येत्या काळात व्यापाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आणि ग्राहकांना एकाच ठिकाणी दर्जेदार आंबा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र आंबा बाजारपेठेची सोय करून दिली जाईल.
