You are currently viewing चार तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीला 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगती

चार तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीला 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगती

एमपीसी न्यूज – मावळ, खेड, शिरूर, बारामती तालुक्यामधील ग्रामपंचायतींनी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने सरपंच व उपसरपंच पदांसाठी 9 फेब्रुवारी व 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडी जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्या आदेशान्वये 16 फेब्रुवारी पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

 

जिल्हाधिकारी डाॅ राजेंद्र देशमुख यांनी जिल्ह्यातील एकूण 746 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतरच्या पहिल्या सभेत सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडीचे आदेश दिले होते. परंतु मावळ तालुक्यातील परंदवडी व खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, बिरदवडी, नाणेकरवाडी, शिरूर तालुक्यातील शिक्रापुर आणि बारामतीतील निंबूत या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाल्या आहेत.

याचिकाकर्त्यांना मंगळवार (दि 9) सकाळी अकरा वाजता सुनावणी करिता जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्यास व 9 आणि 10 फेब्रुवारी या कालावधीतील सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक न घेता 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे.

मात्र हवेली, मुळशी, भोर, वेल्हा, इंदापूर, दौंड, जुन्नर, आंबेगाव आणि पुरंदर या नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच निवडी ठरल्याप्रमाणे आज (दि 9) व 10 फेब्रुवारीलाच होणार असल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी 9 व 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडीला जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द करण्याचा आदेश दिल्याने सरपंचपदासाठी इच्छुकांनी केलेल्या जय्यत तयारीवर पाणी पडले असून हिरमोड झाला आहे. मात्र भावी सरपंच व उपसरपंचांना पुढील तारीख घोषित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा