You are currently viewing कोरोना सोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्वाची -आरोग्यमंत्री राजेश टोपे..

कोरोना सोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्वाची -आरोग्यमंत्री राजेश टोपे..

कोरोना उपचाराबाबत राज्य शासनाने सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून विविध निर्णय घेतले आहेत. कोरोना सोबत जगताना एसएमएस ही त्रिसूत्री महत्वाची असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी दोन हात या कार्यक्रमात सांगितले.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ‘कोरोनासह जगण्याची तयारी’ याविषयी केलेल्या चर्चेचा चौथा भाग आज प्रसारीत होत आहे. त्यावेळी ते बोलत होते.
आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, सध्या आपल्याकडे  कोरोनावर प्रतिबंधक लस नाही. लस येईपर्यंत किती महीने लागतील, सांगता येत नाही. लॉकडाऊन करत राहिलो तर आपल्या अर्थव्यवस्थेचं काय होईल? ज्यांचं हातावर पोट आहे त्याचं काय होईल? बिझनेस हाऊसेस, व्यवसाय बंद होतील. ज्येष्ठ उद्योगपती श्री. रतनजी टाटा यांनी स्पष्ट सांगितलं आहे की “हे वर्ष नफा-नुकसानीचा विचार करायचे नाही. हे वर्ष फक्त जगण्यासाठी आपण जगा.” हे करीत असताना आपल्याला एसएमएस (एस म्हणजे सोशल डिस्टनसिंग, एम म्हणजे मास्क, एस म्हणजे सॅनिटायजर म्हणजेच सॅनिटाईज्ड हॅण्डस्.) पद्धतीने जगावे लागेल.
“मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक” याप्रमाणे सगळ्याच गोष्टींवर मनाचा ब्रेक लावणं गरजेचं आहे. म्हणजेच अनावश्यक ठिकाणी जायचे टाळलं पाहिजे.  ज्येष्ठ नागरिकांनी, कोमॉर्बीड लोकांनी गर्दीत जाणे टाळावे. सध्या शाळा उघडल्या नाहीत, सतर्कता म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टी पुन्हा सुरू करत नाही. पण एसएमएस पद्धतीचा वापर करून जरूर आपलं कार्य करावं आणि जेवढं टाळता येऊ शकत असेल त्या अनावश्यक गोष्टी जरूर टाळाव्यात, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
शाळा सध्या बंद असल्या तरी शिक्षण चालू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून  स्मार्ट फोन ज्यांच्याकडे आहे ते लोक ऑनलाइन स्कुलिंग करू शकतात.  जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाइन स्कूलिंग सर्वत्र अजून चालू नाही. काही अडचणी आहेत. ऑनलाइन स्कूलिंग १०० टक्के परिणामकारक आहे असे मला वाटत नाही आणि हे आपल्याला कायमस्वरूपी ऑनलाइन ठेवता येणार नाही. त्यामुळे लस येईपर्यंत हे असंच सुरू ठेवावं लागेल.
मुलांचं नुकसान निश्चितच होऊ नये.  त्यांचं वर्ष वाया जाता कामा नये. जो काही गॅप पडला आहे, तो भरून काढण्यासाठी  शिक्षणाची पद्धत असो, शिकवण्याची पद्धत असो किंवा कंटेन्ट मध्ये बदल करायचे असोत,  शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण थांबता कामा नये, याची काळजी आपल्याला घ्यावीच लागेल.

राज्यात “महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना” सुरू आहे त्यामध्ये. १००० रुग्णालये आहेत, ज्यामध्ये आपण १०० टक्के कॅशलेस सेवा, एक रुपया न घेता या सगळ्या सुविधा देऊ शकतो. राज्य सरकारचा एकच फोकस राहिलेला आहे की सामान्य माणूस हा आमच्या डोळ्यासमोर आहे, सामान्य गरीब पेशंट डोळ्यासमोर आहे आणि त्याचे हित आपल्याला कसं जपता येऊ शकेल ते जपण्याच्या दृष्टीकोनातूनची  धोरणं आखण्यात आलेली आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दररोज रात्री ९.०० वाजता ही चर्चासत्र मालिका प्रसारीत होत आहे.
·       रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी  कोरोना: प्रतिकारशक्ती व इच्छाशक्तीचे महत्व
·       सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी  कोरोना: प्लाझ्मा व सिरो सर्व्हेलन्स या विषयांवर चर्चा होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + thirteen =