प्रशासनाच्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे!
देशाच्या तिन्ही सैन्यदलाबद्दल सिंधुदुर्गवासीय जनतेला अभिमान
कणकवली :
देशात जी युद्धजन्य स्थिती आहे, त्याच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार जशासतसे उत्तर देत आहे. देशाच्या सैन्यदलाबद्दल सिंधुदुर्गवासीय जनतेला अभिमान आहे. केंद्र सरकारकडून ज्या सूचना, आवाहने केली जात आहेत, त्यांचे पालन आपण नागरिक म्हणून करायला हवे. निष्याप पर्यटकांना पेहलगाममध्ये अतिरेक्यांनी मारल्यानंतर मोदी सरकारने या अतिरेक्यांविरोधात मोहीम उघडली आहे. अशावेळी सर्वांनी सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
कणकवली येथील प्रहार भवनमध्ये पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे बोलत होते, भारताचे नागरिक म्हणून आपण सोशल मीडिया तसेच अन्य माध्यमांतून सैन्य दलाचे मनोबल वाढविणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरूनही सैन्याच्या कारवायांबाबत शंका उपस्थित न करता त्यांचे मनोबल कसे वाढेल असे काम करा. कायद्याच्या चौकटीत राहून तिरंग्याची रॅली काढली जात असल्यास जिल्हा प्रशासन सहकार्य करेल. नागरिकांनी रक्तदान शिबिर आयोजित करावीत. भारतीय नौदउकडून सागरी हद्द आणि मच्छी मच्छिमारांना ज्या सूचना दिल्या जातील. त्या सर्व मच्छीमारांना पाळाव्यात, संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलीसांशी संपर्क साधावा अतिउत्साहीपणा न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मत्स्य आणि बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी केले.
मी माझ्या मत्स्य व बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. किनारपट्टी भागासाठी केंद्राने दिलेल्या सूचना व आदेश पाळण्यासाठी सहकार्य करावे, कोणीही मच्छिमारीसाठी खोल समुद्रात जाऊ नये, उत्साहाच्या भरात नियम सोडले जाऊ नये याची काळजी घ्या. प्रशासनालाही मच्छीमारबांधवांपर्यंत सूचना, आदेश पोहचविण्यास सांगण्यात आले आहे, असे श्री. राणे यांनी सांगितले. तिनही दलांचे सुरक्षेच्यादृष्टीने बारकाईने लक्ष आहे. जलदुर्ग व बंदरे सुरक्षिततेच्यादृष्टीने आढावा घेण्यात आला आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास संपर्क साधावा, असेही सांगितले आहे.
मदरशांमधून शिक्षण मिळायला हवे, असा उद्देश आहे. मात्र दोडामार्गला मदरशांमध्ये तलवारी मिळाल्या. त्यामुळे गरज पडली तर सर्च ऑपरेशनही राबवावे लागेल. कुडाळ तालुक्यातील एका मदरशामध्ये बाहेरून फंडिंग होतेय, असे कानावर आले आहे. त्यामुळे मदरशांमधून शिक्षणच मिळायला हवें, यासाठी लक्ष ठेवले जात आहे, असेही श्री. राणे यांनी सांगितले.
मे महिन्याच्या सुटीच्या हंगामात पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत आहेत, त्यांना चांगली सेवा देण्यासाठी हॉटेल चालकांनी प्रयत्न करावेत, गोव्यातील पर्यटक सिंधुदुर्गात वळत आहे. त्यांना चांगली सेवा देण्यासाठी हॉटेल व्यावसायीकांना मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही श्री. राणे यांनी सांगितले. खरीप हंगामासाठी आम्ही तयार आहोत. सध्या निसर्ग लहरी झाला आहे. मात्र शेतकऱ्याऱ्यांना बी बियाणे, खते वेळेत उपलब्ध केली जातील, असे श्री. राणे यांनी सांगितले.