You are currently viewing तारतम्य

तारतम्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*तारतम्य*

 

*तारतम्य* याचा शब्दार्थ “निरनिराळ्या गोष्टींमधला तुलनात्मक फरक.” हे फरक कमी- जास्त, उंच- नीच, गरीब- श्रीमंत अशा प्रकारात असतात. “तारतम्य सापेक्षता दाखवते. म्हणजे एका वस्तुच्या किंवा व्यक्तीच्या स्थितीशी दुसऱ्या वस्तू किंवा व्यक्तीच्या स्थितीशी तुलना करते.

 

विज्ञान, समाजशास्त्र, अर्थशास्त्र साहित्य अशा विविध क्षेत्रात “तारतम्य” वापरले जाते. मराठी भाषेच्या व्याकरणात “तारतम्य” या शब्दाला आपण नामाची जागा देऊया. हा शब्द एकप्रकारचा भाव व्यक्त करतो म्हणून “भाववाचक नाम” असे “तारतम्य” शब्दाबद्दल म्हणू शकतो. “तारतम्य” हा शब्द फक्त सापेक्ष तुलना व्यक्त करतो. बोलणं, वागणं या क्रियांशी “तारतम्य” या शब्दाचा घनिष्ठ संबंध येतो. आपण अगदी सहज जाता जाता म्हणतो त्याच्या वागण्यात बोलण्यात काही तारतम्यच नसते. आघळपघळपणा, ढिसाळपणा, दिशाहीनता, अप्रासंगिकता असणारं बोलणं किंवा वागणं म्हणजे “तारतम्य” नसलेले वर्तन वा वक्तव्य हे निश्चित आणि आपल्या भोवतालच्या समाजात अशी तारतम्य सोडून वागणारी माणसं म्हणजे खरोखरच डोकेदुखी, चीड आणणारी ठरतात हेही एक सत्यच. बर्‍याच वेळा अशी माणसं भोचक असतात, आगीत तेल ओतणारी असतात. त्यांचा अविर्भाव जरी हितचिंतकाचा असला तरी ती केवळ नकारात्मकताच माजवणारी असतात. त्यांच्या सहवासात कधीही प्रसन्नता अथवा आशावाद निर्माण होऊ शकत नाही. ही माणसं घरीदारी कधीही स्वागतार्ह नसतात. केवळ भिडस्तपणा म्हणून आपण आपल्या अंतरंगात उसळत असणाऱ्या त्यांच्या विषयीच्या क्रोधाच्या भावना दडपत त्यांना सहन करत राहतो पण शक्यतो जमेल तितकं त्यांना टाळण्याचा त्यांच्यापासून दूरच राहण्याचा आपला मानस असतो. थोडक्यात “तारतम्य” या शब्दाभोवती एक नकारात्मकता आहे.

 

माझी धाकटी बहीण काही आजारानिमित्ताने एका दवाखान्यात भरती होती. डॉक्टरांनी तिच्या व्याधीचे व्यवस्थित निदान करून योग्य ती उपचार पद्धती सुरूही केली होती आणि तिच्या प्रकृतीत उतारही पडत होता. एक दिवस आमच्याच नात्यातील एक गृहस्थ तिला भेटायला आले आणि म्हणाले,” हा दवाखाना म्हणजे रुग्णांना लुटणारा लुटारू आहे गं! झाले काय तुला? माझ्या ओळखीचे एक आयुर्वेदिक वैद्य आहेत, दहा मिनिटात त्यांच्या औषधाचा परिणाम दिसायला लागतो अशी त्यांची ख्याती आहे. इथे येण्याआधी मला थोडी तरी कल्पना दिली असतीस तर?आता इथे तुझं काही खरं नाही. हे लोक…”

मी त्यांना पुढे बोलूच दिले नाही.

कुठे काय बोलावं, काय सांगावं याचं बिल्कुल तारतम्य नसलेलं त्यांचं हे बोलणं ऐकून मी त्यांना अक्षरश: रूम मधून बाहेरच काढलं. क्षणभर धरून चालूया की त्यांच्या बोलण्यात काही तथ्य असेलही पण वेळ, काळ, प्रसंग याचं भान नसावं का त्यांना? थोडक्यात भान विसरून, बेभानपणे वागणं- बोलणं म्हणजेच तारतम्य न बाळगणं.

 

आजकाल राजकीय नेत्यांच्या तोंडून अनेक वादग्रस्त विधानं उच्चारली जातात. मग कुणाच्या वैयक्तिक, सामाजिक, जातीय, धार्मिक, आर्थिक, ऐतिहासिक, भौगोलिक, बौद्धिक साऱ्या काही भावना दुखावल्या जातात आणि वादंग माजतात. दंगली, हिंसाचार घडतात. सामाजिक घडी अस्थिर होते. विस्कटून जाते. मूळ समस्या आणि त्यावरचं निराकरण दूरच राहतं आणि भलत्याच वादाला तोंड फुटतं तेव्हा असं हे वादंग वाजवणारं निष्फळ वक्तव्य म्हणजे तारतम्य सोडून केलेलं भाष्य ठरतं पण प्रत्येक वेळी “तारतम्य” नकारात्मक सापेक्षता दाखवते असेही म्हणता येणार नाही. खूप वेळा आपण एखाद्या तप्त प्रसंगी माघार घेणाऱ्या व्यक्ती पाहतो. जिथे “एक घाव दोन तुकडे” होऊ शकले असते तिथे या व्यक्तीने अशी माघार का घ्यावी? असा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो पण सबुरी आणि संयम हे त्यांच्या वागण्यात त्यावेळी जाणवतात. परिस्थितीचा चौफेर तुलनात्मक विचार करून समंजसपणे, तारतम्य बाळगून घेतलेली त्यांची ही माघार योग्यच असते.

 

हिंदी भाषेत एक म्हण आहे की, ” अगर आप खुद कांचके घर मे रहते हो तो दुसरोंके घर पर पत्थर नही मारना.” यात तारतम्यता आहे.

“आपल्या पायाशी असलेलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मात्र लगेच दिसतं.” अशी वृत्ती तारतम्य या शब्दाला नकारार्थी, घातक साज चढवते. श्रेष्ठत्वाची, अहंकाराची, मीच तेवढा ज्ञानी” या भावनांची टोकं जेव्हा नको तितकी धारदार होतात तेव्हा वागण्यातला, बोलण्यातला तोल सुटतो. वयाच्या, इतरांच्या भावनांच्या, विचारांच्या मर्यादा ओलांडल्या जातात आणि तारतम्य हरपतं.

 

“तारतम्य”चा दुसरा अर्थ असाही आहे की “सारासार विचार करण्याची बुद्धी” समोर ठाकलेल्या क्षणाचं नेमकेपण जाणून केलेली शारीरिक अथवा वाचिक प्रतिक्रिया. हे ज्या व्यक्तीस जमतं त्याच्या जीवनात स्थैर्य असू शकतं.

 

तारतम्य आणि तार्किकता हे जरी समानार्थी शब्द नसले तरी हे शब्द जुळ्या भावंडांसारखे आहेत. तार्किकतेत तारतम्याचा विचार केलेला असतो.आणि तारतम्यतेत समोरच्या व्यक्तीवरच्या परिणामाचा तर्क असतो.

 

ज्याप्रमाणे मीटर, सेंटीमीटर, किलो, लिटर, व्होल्ट आणे, रुपये ही शास्त्रीय, वैज्ञानिक, शैक्षणिक युनिट्स आहेत, त्याचप्रमाणे “तारतम्य” हे मानवी जीवनाचं एक युनिट आहे आणि त्या युनिट प्रमाणे वागणं हेच अपेक्षित आहे.

वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात प्रसन्नता निर्माण करणारं युनीट म्हणजे “तारतम्य”

 

राधिका भांडारकर.

प्रतिक्रिया व्यक्त करा