You are currently viewing महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मळगावातील वीज ग्राहकांचा उद्रेक

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मळगावातील वीज ग्राहकांचा उद्रेक

*सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या नेतृत्वाखाली मळगाव बाजारपेठेत घेतली बैठक*

 

*महावितरणचे सावंतवाडी उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती*

सावंतवाडी:

सिंधुदुर्ग जिल्ह्यात “पावस नाय पाणी आणि महावितरण गाता रडगाणी” अशीच परिस्थिती सिंधुदुर्गातील महावितरणच्या कारभाराची झाली आहे. त्यामुळे वीज वितरणच्या भोंगळ कारभाराला कंटाळून मळगाव येथील व्यापारी वर्ग व कारखानदार घरगुती वीज ग्राहक आदींनी एकत्र येत सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी चे महावितरण चे उपकार्यकारी अभियंता श्रीशैलेश राक्षे व मळगाव येथील इतर वीज वितरण चे कर्मचारी यांच्या उपस्थितीत वीज ग्राहकांची बैठक घेत माळेगाव बाजारपेठेसह गावात उद्भवत असलेल्या समस्या लेखी स्वरुपात महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे मांडल्या यावेळी संतप्त झालेल्या वीज ग्राहकांना उपकार्यकारी अभियंता श्रीशैलेश राक्षे यांनी मळगाव येथील सर्व समस्या लवकरात लवकर सोडवून वीज ग्राहकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे प्रभारी अध्यक्ष श्री.संजय लाड, उपाध्यक्ष गणेश तथा बाळ बोर्डेकर, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, मळगाव येथील वीज ग्राहक महेश खानोलकर, निवृत्त आरोग्य अधिकारी श्री राजन पटेकर, गणेश प्रसाद पेडणेकर, विनायक राऊळ, गोपाळ नार्वेकर, संजय तांडेल, उपकार्यकारी अभियंता श्री शैलेश राक्षे, सहा.अभियंता आर. बी.खांडेकर ग्रामीण, यांच्यासह मळगाव व्यापारी संघाचे सदस्य मळगाव येथील वीज ग्राहक व सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध शाखांमधील अधिकारी वर्गाची उचल बांगडी होऊन काही नवे अधिकारी नियुक्त झाले आहेत. परंतु जिल्ह्याची वीज वितरण व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर कुचकामी असल्यामुळे आणि गावागावात जाणाऱ्या वीज वाहिन्या या जंगलमय भागातून जात असल्याने वीज वितरणामध्ये बऱ्याचदा समस्या निर्माण होतात. याला कारणीभूत म्हणजे वेळोवेळी आवश्यक असलेली डागडुजी, झाडी तोडणे आदि कामे अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षामुळे केली जात नाहीत किंबहुना ज्युनियर अधिकारी उपकार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला जुमानत नाहीत. त्यामुळे करता येणारी साधीसुधी कामे सुद्धा रखडली जातात पर्यायाने जिल्ह्यातील वीज ग्राहकांना विजेच्या लपंडावामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. बाजारपेठेतील व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सुद्धा होते परंतु या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून महावितरण आपल्या वाहनातून थकीत वीज ग्राहकांना वीज बिले भरून सहकार्य करण्याची विनंती स्पीकरवर अनाउन्समेंट करून करते अशावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना लाज कशी काय वाटत नाही..? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मळगाव येथे गावातील वीज ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे ऑगस्ट 2024 मध्ये मळगाव येथे सरपंचांच्या उपस्थितीत वीज ग्राहकांची बैठक घेतली होती परंतु त्यावेळी सहाय्यक अभियंता असलेले लोहार यांनी उपकार्यकारी अभियंत्यांच्या आदेशाला न जुमानत बैठकीत उपस्थित होण्यास नकार दिला होता. सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्ह्यातील वीज समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून अशा कामचुकार अधिकाऱ्यांमुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास होत असतो महावितरणच्या अधिकारी वर्गाने जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि वेळोवेळी सोडविण्याचा प्रयत्न केल्यास जास्तीत जास्त तक्रारींचे निवारण वाद उत्पन्न न होता होऊ शकते सिंधुदुर्ग जिल्हा हा थकबाकी सर्वात कमी असलेला जिल्हा आहे परंतु महावितरण कडून जिल्ह्यासाठी आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जात नाहीत. जिल्ह्याचे वीज वितरणाचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याची आवश्यकता असून महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री.साळुंखे यांनी याकडे जातीनिशी लक्ष देऊन वीज वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मळगाव येथे समस्या उत्पन्न होण्यासाठी कारणीभूत आहे ते मंजूर होऊ नये जागे अभावी रखडलेले सबस्टेशन. मळगाव निरवडे भागात जर नवे सब स्टेशन उभे राहिले तर कमी दाबाने होणारा वीज पुरवठा सुरळीत होऊन मळगाव निरवडे सह तळवडे भागाची वीज समस्या मोठ्या प्रमाणावर सुटू शकेल. यासाठी महावितरणने कोणीतरी जमीन दान देईल अशी वाट न पाहता जागा उपलब्ध होईल ती जमीन खरेदी करून सबस्टेशन बांधणे ही काळाची गरज आहे. कारण दिवसेंदिवस वीज ग्राहकांमध्ये वाढ होत असून मूळ पुरवठा पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याने कमी दाबाचा वीज पुरवठा होऊन अनेकांची विद्युत उपकरणे जळून खाक झालेत तर उभ्या असलेल्या माड पोफळींच्या बागा पाण्याअभावी तडफडत आहेत.

मळगाव येथे काल पार पडलेल्या बैठकीत अनेक वीज ग्राहकांनी विजेच्या जुन्या तारा बदलणे, कमी अधिक दाबाने होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करणे, बंद असलेल्या जुन्या मीटर मुळे सरासरी वीज देयके देणे या मुख्य समस्या मांडल्या. प्रमोद राऊळ यांनी मळगाव येथे सडलेल्या अवस्थेत असलेल्या जुन्या खांबांचा विषय ऐरणीवर आणला. त्याचप्रमाणे रात्रीच्या वेळी कमी दाबाने वीज पुरवठा होतो ही समस्या मांडली. गुरुनाथ गावकर यांनी वीज वितरण चे कर्मचारी समस्या समजून न घेता फोन कट करतात अशी तक्रार केली. रेडकर वाडी येथील कौस्तुभ रेडकर यांनी तर विजेचा खांबच वाकलेला असून विजेच्या तारा खाली आल्या आहेत असे सांगून वीज वितरणचे कर्मचारी डोळे झाकून काम करत असल्याचा दाखला दिला. काजू व्यावसायिक संजय तांडेल यांनी रोजच्या रोज विजेचा फ्युज उडतो त्याला कारण म्हणजे कमी दाबाने होणारा वीज पुरवठा ही खंत व्यक्त केली. राजन नार्वेकर, राजेश राऊळ यांच्यासह अनेक वीज ग्राहकांनी लो होल्टेज असल्याची मुख्य तक्रार केली. मदन शिरोडकर यांनी वायरला लागत असलेल्या झाडी तोडण्याची सूचना केली तर ममता नेरुरकर यांनी कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने जुनी वायर बदलून मिळावी अशी मागणी केली. वेंगुर्ला लाईन वरील 33 केवी कनेक्शनचा सडलेला पोल बदलणे, अशी सूचना देखील वीज ग्राहकांनी केली. यावेळी 20 एप्रिल पर्यंत झाडी तोडणाऱ्या कंत्राटदाराकडून क्रेन मागून मळगाव येथील झाडी तोडून वीज खांब आणि वाहिन्यांना मोकळीक देण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता श्री शैलेश राक्षे यांनी दिले.

मळगाव येथील दत्त मंदिर येथे आयोजित वीज ग्राहकांची बैठक आटोपल्यानंतर मळगाव येथील कमी दाबाचा वीज पुरवठा तात्काळ दुरुस्ती करण्याचे प्रयत्न केल्याचे देखील दिसून आले. कारण काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ही ग्राहकांनी सांगितले. याचाच अर्थ काही समस्या ह्या क्षुल्लक असतात परंतु संबंधित विभागाचे सहाय्यक अभियंता आणि सबस्टेशनचे लाईनमन, वायरमन आदी कर्मचारी यांच्या नाकर्तेपणामुळे वीज ग्राहकांना वीज समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून आले.

यावेळी नरेंद्र तारी, डॉ.मनोज रेडकर, प्रमोद राऊळ अंकुश रेडकर, संजय पंडित काशिनाथ सोनुलकर, सुवर्ण धुरी, तन्वी गोसावी, सचिन धुरी, सिद्धेश तेंडोलकर, आदी वीज ग्राहक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्याचबरोबर महावितरण चे अधिकारी व कर्मचारी लाईनमन एम .एच.पाटणकर, प्रितेश हळदणकर ग्रामीण १, करण परब ग्रामीण १, संतोष गावकर ग्रामीण २ इत्यादी बैठकीला उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा