You are currently viewing सतर्कता बाळगा – बर्डफ्लूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखा….

सतर्कता बाळगा – बर्डफ्लूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखा….

सिंधुदुर्गनगरी 

राज्यातील परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक 10 जानेवारी 2021 रोजी कोंबड्या तसेच कावळे हे पक्षी बर्ड फ्लू मुळे मृत्यू झाल्याचे शासनाने जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर बर्डफ्लू रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होऊ नये यासाठी  जिल्ह्यातील कुक्कुटपालक आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

            कुक्कुटपालक तसेच कुक्कुटपालन क्षेत्रातील कर्मचारी यांनी याविषयी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. पोल्ट्री फार्मवर अचानकपणे मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा अनैसर्गिक मृत्यू होत असल्यास त्याची माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थाप्रमुखांना द्यावी, पोल्ट्री फार्मवरील पक्षांचा इतर जंगली पक्षांशी उदा. बदके, कबुतर, पोपट, चिमण्या, कावळे, इ) संपर्क होणार नाही याची दक्षता घ्यावी व जैव सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करावी. कुक्कुटपालकांनी पोल्ट्री फार्म व परिसरामध्ये स्वच्छता बाळगणे, नियमित सोडीयम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, 4 टक्के फॉरमॅलिन, चुना लावून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करणे, संशयित, रोग प्रादुर्भाव झालेल्या फार्मवरील पक्षांची तसेच खाद्याची वाहतूक, खरेदी, वित्री बंद करावी, बर्डफ्लू रोगासंदर्भातील कोंबड्यांमध्ये आढळणारी प्रमुख लक्षणे – कोंबड्यांच्या नाकातून चिकट स्त्राव येणे, श्वसनास त्रास होणे, चेहऱ्यावर सूज येणे, गलोल व तुरा निळा पडणे, विष्ठा पातळ होणे तसेच पक्षी मलूल व निस्तेज दिसणे ही आहेत.

            नागरिकांनी याबाबत पुढील काळजी घ्यावी. चिकन स्वच्छ करताना हॅण्ड ग्लोजचा वापर करावा, बर्डफ्लूचा विषाणू 60अंश सेंटीग्रेडच्या पुढील तापमानास पूर्णपणे नष्ट होतो. त्यामुळे चिकन व अंडी 100 अंश सेंटीग्रेड तापमानास शिजवावीत, समाज माध्यमातून व इतर प्रसार माध्यमातून प्रसारित अफवावर विश्वास ठेवू नये, स्थलांतरित पक्षी येणाऱ्या जलाशयांच्या ठिकाणी पक्षी मृत झाल्याचे आढळल्यास नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

            अधिक माहितीसाठी www.dahd.nic.in  तसेच www.ahd.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. बर्डफ्लू हा पक्षांचा रोग असून देशात आजपर्यंत तरी पक्षांपासून मानवाला या रोगाची लागन झालेली दिसून आलेली नाही. तरी नागरिकांनी याविषयी खबरदारी बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. दिलीप शिंपी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =