You are currently viewing वर्षभरात मुंबईचा चेहरा बदलणार – अस्लम शेख

वर्षभरात मुंबईचा चेहरा बदलणार – अस्लम शेख

मुंबईच्या विकासाबाबत मंत्रालयात सादरीकरण

मुंबई

वर्षभरात या मुंबई शहराचा कायापालट होणार असून विकासाचे अनेक मोठे प्रकल्प राबवण्याचे नियोजन असल्याचं प्रतिपादन मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांनी केलं. सोमवारी ना. शेख यांच्या दालनात मुंबई विकासाबाबत मुंबई महानगरपालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी व तज्ज्ञांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आलं. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मुंबई शहराच्या विकासाबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले.

ना. अस्लम शेख म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशाच्या विविध भागांतून लोक रोजीरेटीच्या शोधात मुंबई शहरामध्ये येत असतात. या शहराला चांगल्या सोयी-सुविधा देणं हे आम्हा दोन्ही पालकमंत्र्यांचं कर्तव्य आहे. यासाठी उपनगरचे पालकमंत्री ना. आदित्य ठाकरे व मी या शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कटिबद्ध आहोत.

येणाऱ्या काळात ट्राफिकच्या समस्येवर उपाय म्हणून टोकीयोच्या धर्तीवर सिग्नल व्यवस्था, महानगपालिकेच्या प्रत्येक वाॅर्डमध्ये पाच नवीन रस्ते, पाच नवीन शौचालयं, दोन नवीन उड्डाणपुल, चार खाऊ गल्ली आणि जेवढे हेरिटेज परिसर आहेत तिथे पदपथ असं या विकासाचं स्वरुप असणार आहे.

या विकासाच्या प्रकल्पांच्या उभारणीसाठी महानगरपालिकेच्या निधीबरोबरच सी.एस.आर निधीचा देखील मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येणार आहे. एकट्या डी-वाॅर्डमधील विकास प्रकल्पांसाठी जवळपास तीस कोटींचे नियोजन आहे. ज्यामध्ये गिरगाव, वरळी, महालक्ष्मी मंदीर, हाजी हली येथील जास्त रहदारीचा परिसर यांचा समावेश आहे.

पर्यटकांचा मोठ्या प्रमाणावर ओघ असणाऱ्या पर्यटन स्थळांच्या सुशोभिकरणावर व सुविधांवर देखील भर दिला जाणार आहे. तसेच चर्चगेट रेल्वे स्थानकांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर देखील सुशोभित करून मुंबईला एक सुंदर शहर बनविण्याचा मानस असल्याचं ना. अस्लम शेख यांनी शेवटी सांगितलं.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 9 =