You are currently viewing ” मी फक्त मंदिराची पायरी”

” मी फक्त मंदिराची पायरी”

पुरोगामी महाराष्ट्रात कर्तृत्वान पुरुषांबरोबर स्त्रियांसुध्दा आपली कर्तबगारी दाखवत आहेत.राजकारणात,समाजकारणात ,आंदोलनात त्या त्यावेळी अनेक कर्तृत्वान महिलांनी नारिशक्तीचा ठसा उमटवलेला आहे.रुढी,परंपरा, अंधश्रद्धा अशा बंदिस्त परिघाबाहेर येवून मुक्त जगाचा अनुभव मुक्तपणे घेता यावा आणि स्त्री आत्मनिर्भर आणि स्वावलंबी व्हावी यासाठी आपलं सारं आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मानव संसाधन स्ंस्थेच्या वतीने दिनांक तीन जानेवारी रोजी अणाव सिंधुदुर्ग येथे संस्थेच्या वतीने गेली सुमारे पंधरा वर्षे सुरू असलेल्या नर्सिंग काँलेजच्या भव्यदिव्य अशा नव्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम मा.सुरेशजी प्रभू यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.यावेळी माझ्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिला सबलीकरणाच्या नुसत्या गप्पा न करता तसेच कोणतीही प्रसिद्धी न करता सातत्याने सुमारे गेली पंचवीस वर्षे आदरणीय सुरेशजी प्रभू यांच्या सुविद्य पत्नी,टाईम्स आँफ इंडियाच्या माजी एडिटर, जनशिक्षण सिंधुदुर्गच्या माजी अध्यक्षा आणि मानव संसाधन संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौ.उमा प्रभू यांनी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अर्थात प्रभूसाहेबांच्या कोकणभूमीत केलेलं काम थक्क करणारं आहे.राजकारणात प्रचंड पैसा ओतावा लागतो…आणि शाश्वत विकास करण्यासाठी दुरदृष्टी ठेवून प्रामाणिक कष्ट करावे लगतात..पैसा ओतून मिळवलेले यश हे अळवावरच्या पाण्यासारखे क्षणिक असते तर सामान्य माणूस केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून दुरदृष्टीने केलेल काम हे स्थायी स्वरुपाच आणि समाज घडवणाऱ असतं.प्रभूसाहेब राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सक्रिय असले तरी कोकणभूमीकडे त्यांच तेवढचं लक्ष आहे.तरीही मानव संसाधन संस्था, ल्युपीन फाऊंडेशन, जनशिक्षण अशा संस्थाचं तळागाळात आज जे प्रभावी काम सुरु आहे त्यात मा.उमाताईंचा फार मोठा वाटा आहे.त्या एक सक्षम आणि अभ्यासू पत्रकार त्यामुळे समाजाला काय हवं? काय नको? याची जाणीव आहे.पत्रकार हा समाजाचा आरसा असतो..त्यांनी आपल्या या अनुभवाचा उपयोग समर्थ आणि स्वावलंबी समाज बांधणीसाठी केला…अर्थात त्याना समर्थ साथ मिळाली ती आदरणीय प्रभूसाहेबांची…
मी, जनशिक्षण, ल्युपीन फाऊंडेशन, मानव संसाधन संस्था अशा संस्थाच्या विविध कार्यक्रमाला अनेकदा उपस्थित राहिलो.उमामँडमांची अनेक संबोधने ऐकली.त्या तीन ते चार मिनीटेच बोलतात.. इंग्लिशवर प्रभुत्व असल्याने मराठी बोलत असताना त्याचा परिणाम जाणवेल अस मला वाटायचं..मात्र मराठी या भाषेवरही त्यांच तेवढच प्रभुत्व असून त्या अगदी अल्प वेळात प्रभावीपणे मांडणी करतात…
परवा अणावला भूमीपूजनाच्या कार्यक्रमात त्या फक्त चार मिनीटेचं बोलल्या… म्हणाल्या “या जिल्ह्यात विकासाचं मंदिर उभ रहाव म्हणून आपण सगळेच जण प्रयत्न करत आहोत.प्रभूसाहेबांचही तेच स्वप्न आहे…गेली काही वर्षे मी या जिल्ह्यात प्रभूसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे..आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून उभ़ रहाणाऱ्या या मंदिरातील देव म्हणजे इथली जनता असून मी या विकासरुपी मंदिराची एक छोटीशी पायरी आहे…आणि मला शेवटपर्यंत पायरीच राहून काम करायचे आहे”
खरचं क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या या कर्तृत्वान लेकीनं दिलेला संदेश समाजात काम करणाऱ्या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आणि आमच्या सर्व महिला भगिनींसाठी फार मोलाचा आहे.धन्यवाद उमाताईं.
….अँड.नकुल पार्सेकर…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × five =