You are currently viewing वीरनारी सरस्वतीबाई राजगे यांच्या ८८ व्या जन्मदिनी सुरेश प्रभू आणि लखमराजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते १ जुलै रोजी सन्मान

वीरनारी सरस्वतीबाई राजगे यांच्या ८८ व्या जन्मदिनी सुरेश प्रभू आणि लखमराजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते १ जुलै रोजी सन्मान

वीरनारी सरस्वतीबाई राजगे यांच्या ८८ व्या जन्मदिनी सुरेश प्रभू आणि लखमराजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते १ जुलै रोजी सन्मान

सावंतवाडी

शहीद हवालदार बाबली राजगे यांना भारत-पाक युद्धाप्रसंगी वीरगती प्राप्त झाली. त्यांची पत्नी सरस्वतीबाई राजगे यांचा सन्मान सोमवार, दि. १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजित केला आहे. हा सन्मान माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य लखमराजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावर्षी भारत पाकिस्तानच्या युद्धाला ६० वर्षे, आणि कारगिल युद्धाच्या विजयाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. शहीद हवालदार बाबली राजगे यांना २३ सप्टेंबर १९६५ च्या भारत-पाक युद्धाप्रसंगी वीरगती प्राप्त झाली. त्यांची पत्नी सरस्वतीबाई राजगे यांचा ८८ वा जन्मदिवस १ जुलै रोजी आहे. या त्रिवेणी संगमाच्या निमित्ताने, विनायक दळवी चॅरिटेबल फाऊंडेशनने सिंधुदुर्गातील एनसीसी हआणि एन.एस.एस सोबत सैनिक कल्याण विभागाच्या सहकार्याने आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या पुढाकाराने त्यांचा छोटेखानी सत्कार करण्याचे योजिले आहे.
कार्यक्रमाची सुरूवात ‘एनीबडी कॅन सिंग’ या संकल्पनेच्या निर्मात्या आणि देणगीदार गायिका मानसी केळकर-तांबे यांच्या सुश्राव्य गीतगायनाने होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या इस्माईल युसुफ महाविद्यालयातील निवृत्त प्राचार्या आणि विनायक दळवी चॅरिटेबल फाऊंडेशन (VDCF) च्या सचिव डॉ. भाविता चव्हाण या फाऊंडेशनच्या उपक्रमांची माहिती देतील. यानंतर जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्गच्या अध्यक्षपदी नामनिर्देशन झाल्याबद्दल श्री. मोहन होडावडेकर यांचा सत्कार होईल. प्रमुख अभ्यागत कर्नल दीपक दयाळ यांचे मनोगत व्यक्त होईल. यानंतर वीरनारी सरस्वतीबाई राजगे यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी शुभेच्छासंदेश देण्यास मान्यता दिली आहे.
१९६५ च्या पाक युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या हवालदार बाबली राजगे यांच्या वीरनारी सरस्वतीबाई राजगे यांनी नेटाने साठ वर्षे संसाराचा गाडा एक हाती हाकला. २३ सप्टेंबर १९६५ रोजी या हुतात्म्यांचे अंत्यसंस्कार भारत-पाक सीमेवरच झाले. तेव्हा सूर्यकांत हा त्यांचा मुलगा चौथीत होता. विनायक दळवी चॅरिटेबल फाऊंडेशन (VDCF) ही सामाजिक संस्था मिशन पँम्पर (Mission Pamper) या संकल्पने द्वारे हुतात्मा सैनिकांच्या प्रियजनांच्या आयुष्यात दोन आनंदचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करते. अशा वीरनारींनी केलेल्या त्यागाची कृतज्ञतापूर्वक जाणीव आणि त्यांच्या समर्पणामुळे जी नागरिकांची आयुष्य सुरक्षित राहिली, त्याचं स्वरूप म्हणून, त्यांच्या वाढदिवसाच्या शुभदिनी प्रतीकात्मक चांदीचा लामणदिवा भेट देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे कारण ‘आनंदाची पखरण’ हेच व्हिडीसीएफ चे ब्रीद आहे. भविष्यात ‘केसरी टूर्स’ या प्रवासी कंपनीद्वारे एखादी विदेशयात्रा प्रायोजित करून अशा वीरनारींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे व्हिडीसीएफ चे स्वप्न आहे.
या उपक्रमास ‘मेट्रोवुमन’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या वरिष्ठ सनदी अधिकारी श्रीमती अश्विनी भिडे यांनी संस्थेच्या संवर्धक या नात्याने विशेष मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात प्राचार्य दिलीप भारमल, एनसीसी चे कर्नल दीपक दयाळ, एन एस एस चे श्री. वसीम सय्यद यांचे विशेष योगदान आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक व पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा