You are currently viewing 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त : मराठी पाऊल पडते पुढे

1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त : मराठी पाऊल पडते पुढे

 

आज महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. आजच्या महाराष्ट्रात दिनाचे वैशिष्ट्य हे की गतवर्षी महाराष्ट्र शासनाने सर्व प्रकारचे शिक्षण हे मराठी माध्यमातून देण्याचा संकल्प सोडला आहे आणि ही खऱ्या अर्थाने मराठी पाऊल पडते पुढे त्या दृष्टीने एक चांगली गोष्ट झाली आहे .खरं म्हणजे याची सुरुवात खूप आधी व्हायला पाहिजे होती. आजकाल इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटलेले आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर जगायचे असेल खऱ्या अर्थाने जर समजून घ्यायचे असेल तर मराठी माध्यमातून शिक्षण घेणे हे केव्हाही चांगले. जागतिक शिक्षण तज्ञांच्या मतांच्या आधार घेतला तर असे लक्षात येईल त्यांच्या कल मातृभाषेतून शिक्षण याकडेच आहे .मातृभाषेतून शिक्षण दिले तर मुलांना त्याचे आकलन लवकर होते. तुम्ही जपानचे उदाहरण घेतले तर जपान हे प्रगती राष्ट्र आहे. प्रत्येक चांगली गोष्ट ही जपानची आहे. त्याला कारणही तसेच आहे. पण तुम्ही जर जपानमध्ये उच्च शिक्षणासाठी गेला तर तुम्हाला सर्वप्रथम जपानी भाषा शिकावी लागेल आणि नंतरच तिथलं शिक्षण तुम्हाला घेता येईल .आज इंग्रजीचा एवढा बोलबाला आहे. पण जपानने मातृभाषेतून शिक्षण देणे मातृभाषेतून उच्च शिक्षण देणे याला प्राधान्य दिले आहे. आज आमच्या अमरावतीकारांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे हे आमच्या अमरावती शहराला मराठी साहित्यिकांच्या फार मोठा वारसा लाभलेला आहे. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर या गावाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. मराठी भाषेतील सर्व प्रमुख ग्रंथ याच गावात लिहिल्या गेलेले आहेत. परवा महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे ज्या ठिकाणी लीळाचरित्र ग्रंथाचे लेखन करण्यात आले त्या ठिकाणाला भेट देऊन आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने रिद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची घोषणा करून एक चांगली गोष्ट केलेली आहे .रिद्धपूरचे महत्व अनन्यसाधारण आहे. ते नवीन पिढीला नाही समजणार ? खरी मराठी भाषेची सुरुवात झाली ती महानुभाव पंथीय लोकांकडूनच.सर्वश्री गोविंद प्रभू चक्रधर स्वामी म्हाईभट या मान्यवरांचे कार्य अनन्यसाधारण आहे .ते शब्दातीत आहे. मी परवा तामिळनाडूमध्ये तंजावर मध्ये गेलो .आम्ही येत असल्याची सूचना श्री संभाजी राजे भोसले यांच्या नातेवाईकांना दिली होती. ते राजवाड्यात राहतात. भोसले च्या ऐवजी ते भोंसले असे लिहितात. मला आश्चर्याचा याचा धक्का बसला. राजेसाहेब जेव्हा मला त्यांच्या ग्रंथालयात घेऊन गेले तर त्या ग्रंथालयाची देखरेख करायला दोन आयएएस ऑफिसर शासनाने नेमलेले पाहून मला खरोखरच तामिळनाडू सरकारचं कौतुक करावंसं वाटलं. तंजावरला सरस्वती वाचनालय मध्ये सर्व भाषेतील दुर्मिळ ग्रंथाचे जतन करण्यात आलेले आहेत.मी तिथे ताडपत्रावर लिहिल्या गेलेले ग्रंथ पाहिले .आपल्याकडे रिद्धपूरला मराठीमध्ये हजारो ग्रंथ हस्तलिखितच्या स्वरूपात रिद्धपूरला आहेत. खरं म्हणजे ती लिपी वाचन करणारी मंडळीही आता कमी होत चाललेली आहे .कारण ते सांकेतिक लिपी मध्ये आहेत तत्कालीन लिपीमध्ये आहेत .ती लिपी समजणारे फार कमी लोक आता राहिलेले आहेत. म्हणून शासनाने सर्वप्रथम ते ग्रंथ दीर्घकाळ राहतील या दृष्टिकोनातून प्रिझर्व करणे गरजेचे आहे. मराठी विद्यापीठाच्या माध्यमातून ते होईल असे अपेक्षा करूया .आपण अमरावतीचे लोक संपूर्ण भारतामध्ये फिरतो. जगामध्ये फिरतो .पण जिथे मराठी भाषेचा जन्म झाला त्या रिद्धपूरला आपण किमान एक तरी चक्कर मारावी. तिथले हस्तलिखिते पहावे अशी किमान अपेक्षा करायला हरकत नाही. अमरावती जिल्ह्यात प्रबोधनकार ठाकरे विश्राम बेडेकर विद्याधर गोखले वीर वामनराव जोशी दादासाहेब खापर्डे बाबासाहेब खापर्डे आमच्या मागच्या पिढीतील सुरेश भट मधुकर केचे उद्धव शेळके शरदचंद्र सिन्हा भाऊ मांडवकर बाबा मोहोड सुदाम सावरकर अशी कितीतरी नाव मराठी साहित्यात नावलौकिकास आलेली आहेत.सर्वात महत्त्वाचा कळस सुरेश भटांनी गाठला. सुरेश भटांनी आपले अमरावती शहराचे नाव संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर गजलवर प्रेम करणाऱ्या भारतातील उर्वरित प्रदेशांमध्ये व जगातील गजल प्रेमी पर्यंत पोहोचविले आहे. सुरेश भटांचा जन्म अमरावतीत झाला. सुरेश भट यांचा बराचसा कालखंड म्हणजे साधारणतः 1976 पर्यंतचा कालखंड हा अमरावती शहरातच गेलेला आहे. मी मागे सुरेश भटांबरोबर बेळगावला गेलो. तिथले दैनिक तरुण भारतचे संपादक श्री किरण ठाकूर यांनी सुरेश भटांच्या कार्यक्रम तिथल्या सभागृहामध्ये ठेवला होता .ठाकूर साहेबांनी कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली होती. आलेल्या सर्व लोकांना जेवण दिले होते. सुरेश भटांचा दुसऱ्या राज्यांमध्ये एवढा गौरव झालेला पाहून मला खूप छान वाटेले. आपण मराठी भाषेला जपलं पाहिजे. मराठी संस्कृतीला जपलं पाहिजे. तेव्हाच कुठे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रा दिन साजरा होईल आणि आपल्याला अभिमानाने म्हणता येईल. मराठी पाऊल पडते पुढे.

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक मिशन आय ए एस

अमरावती महाराष्ट्र

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा