You are currently viewing समाजापर्यंत साहित्य पोहोचवणारे साहित्य सम्राटचे कार्य – कवी ठोकळे

समाजापर्यंत साहित्य पोहोचवणारे साहित्य सम्राटचे कार्य – कवी ठोकळे

पुणे :

अंतरीच्या भावना, कवितेचा उमाळा, हृदयाची भाषा ही सामान्य माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी साहित्य सम्राट पुणे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी अष्टुळ यांचे हडपसर सारख्या उपनगरात खूप मोठे कार्य आहे. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. हडपसर मध्ये साहित्यिक कार्य चालणारच नाही. असे म्हणणाऱ्यांना अष्टुळ यांनी विविध उपक्रमांद्वारे सातत्याने आज पंधरा वर्षात १८३ कवी संमेलने घेऊन सिद्ध केले. ते म्हणतात काळीज असते तिथे कविता असतेच. खऱ्या अर्थाने समाजापर्यंत कविता रुजवण्याचे काम अष्टुळ यांनी केलेले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. असे गौरवोद्गार प्रसिद्ध कवी दत्तू ठोकळे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले.

साहित्य सम्राट पुणे संस्थेने हडपसर येथील नीलकंठेश्वर महादेव मंदिर येथे महामानवांच्या जयंती निमित्त १८३ व्या कवी संमेलनाचे आयोजन केले होते.

यावेळी विचारपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते आणि दिग्दर्शक अर्जुन नोटके उपस्थित होते. त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. नीलकंठेश्वर महादेव मंदिराच्या प्रसन्न वातावरणात महामानवांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या वास्तवादी कविता कवी कवयित्री यांनी कविता आणि गझलांमधून सादर केल्या. यामध्ये दत्तू ठोकळे, अशोक शिंदे, गौरव नेवसे, विनोद अष्टुळ, मेघराज पाटील, सुभाष महाराज बडधे, शारदा बडधे, गुलाबराजा फुलमाळी, नवनाथ तोडकर, उदय बनसोडे, ॲड. राणी गुंबाडे, विजय माने, आनंद महाजन अशा दिग्गज कवी कवित्रींनी वास्तववादी विचारातून रसिक जनांची आणि भक्तगनांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि बहारदार सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉक्टर आनंद महाजन यांनी व्यक्त केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा