You are currently viewing मालवणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवणमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण :

 

निवडणुका आणि लोकशाहीमध्ये नागरिकांच्या सार्वत्रिक आणि प्रबुद्ध सहभागासाठी; निवडणुकीत माहितीपूर्ण आणि नैतिक पद्धतीने मतदान करण्यासाठी प्रबोधन करून मतदारांना सक्षम करण्याच्या उद्देशाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री किशोर तावडे यांच्या संकल्पनेतून मालवण नगर परिषद क्षेत्रात मतदान जनजागृती मोहिमेचे आयोजन दिनांक २४ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी; कुडाळ ऐश्वर्या काळूशे या उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमास मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, गट विकास अधिकारी आत्मज मोरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सह आयुक्त मत्स्यविभाग सागर कुवेसकर, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले उपस्थित होते. मतदान जनजागृती मोहिमेस शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सेवाभावी संस्था, महिला बचत गट, युवा मतदार, ज्येष्ठ मतदार, महिला मतदार, स्थानिक मच्छिमार असे अंदाजे १००० पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावित जिल्हा तांत्रिक तज्ञ, नगर विकास विभाग निखिल नाईक यांनी केले. दिनांक ७ मे रोजी ४६-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे मतदान; लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पार पडणार असून या मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घेऊन लोकशाही बळकट व्हावी या उद्देशाने SVEEP (Systematic Voters Education & Electoral Participation) अंतर्गत मतदान जनजागृती कार्याक्रमाचे आयोजन मालवण नगरपरीषदेकडून करण्यात आले होते. या मोहिमेत वाळूशिल्प स्पर्धा, बीच रन, मतदान करण्याबाबत शपथ हे कार्यक्रम आयोजित करून मतदारांना मतदान करण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

 

*मतदान जनजागृतीसाठी वाळूशिल्प स्पर्धेचे आयोजन –*

 

मालवण बंदर जेटी येथे मतदान जनजागृती मोहिमेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी वाळूशिल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत कुडाळकर हायस्कूल, प्राथमिक व माध्यमिक शाळा, टोपीवाला हायस्कूल, भंडारी हायस्कूल, जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल, कन्याशाळा या शाळांनी सहभाग नोंदवला. सर्व स्पर्धकांनी तयार केलेली मतदारांना मतदानाचा संदेश देणारी बोलकी वाळू शिल्पे विशेष आकर्षण ठरली. स्पर्धेचे परीक्षण मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, गट विकास अधिकारी आत्मज मोरे, नायब तहसीलदार श्रद्धा चौगुले व मालवण नगर परिषदेचे लेखापाल दिनेश राऊत यांनी केले. या स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलने प्रथम क्रमांक, कन्याशाळा द्वितीय क्रमांक तर जयगणेश इंग्लिश मिडीयम स्कूलने तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. सर्व बक्षीस प्राप्त स्पर्धकांचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे, प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.

 

*बीच रन आणि शपथेच्या माध्यमातून प्रशासनाकडून मतदारांना मतदानाचे आवाहन -*

 

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी हिरवा झेंडा दाखवून बीच रनला सुरुवात केली. मतदारांमध्ये मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी युवा मतदार, ज्येष्ठ मतदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पत्रकार, महिला, सेवाभावी संस्था यांनी उत्साहाने या बीच रन मध्ये सहभागी होऊन घोषणा व माहिती फलकाच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे आवाहन केले. बीच रनचा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. कार्यक्रमाच्या ठिकाणी सेल्फी घेण्यासाठी विशेष सुविधा दिलेली असल्याने उपस्थितांनी सेल्फी घेऊन मतदार करण्याचा संदेश सोशल मिडीयाच्या माध्यमातून इतरांना दिला.

यावेळी युवा मतदार रीना मराळ व हितेश सावंत तसेच ज्येष्ठ मतदार श्री श्रीकांत वेंगुर्लेकर यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन आपल्या मनोगतातून व्यक्त केले. भंडारी हायस्कूल च्या शिक्षिका सौ राधा दिघे यांनी लोकशाहीच्या बळकटी करणासाठी मतदानाचे महत्व अधोरेखित केले तर प्राध्यापक नागेश कदम आणि शिक्षिका श्वेता यादव यांनीही आपल्या मनोगतातून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

मालवण नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री संतोष जिरगे यांनी आपल्या मनोगतात मतदान हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव संपूर्ण देशात सुरु आहे व भारताची लोकसंख्या १४२ कोटी असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात ९५ कोटीहून अधिक मतदार नोंद झालेले आहेत असे सांगून आपल्या देशाची लोकशाही आदर्श लोकशाही असून भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे व मतदान हा भारतीय राज्यघटनेने दिलेली जन्मसिद्ध अधिकार असल्याचे नमूद केले. त्यांनी मतदानाच्या अधिकाराचा जागतिक इतिहास सांगितला, पूर्वी काही मोजक्याच घटकांना असलेला मताचा अधिकार, सरंजामशाही आणि त्यानंतर संघर्षातून समाजातील प्रत्येक घटकाला मिळालेला मतदानाचा हक्क आणि यातून मानवतेच्या मूल्यांना व लोकशाहीला मिळालेली बळकटी अधोरेखित करून सर्वांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासन गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून विशेष मोहीम राबवत असल्याचे म्हटले व मतदान जनजागृती कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. सर्व उपस्थितांना दिनांक ७ मे २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान करून तुमच्या संपर्कातील मतदारांनाही मतदान करण्याचे आवाहन करून आपल्या मतदारसंघाच्या मतदान टक्केवारी वाढीसाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले.

केंद्र स्तरीय अधिकारी, ग्रामस्तरीय अधिकारी, शिक्षक, आशा सेविका यांच्या माध्यमातून प्रशासन मतदार नोंदणीसाठी सदैव नागरिकांच्या घरोघरी कार्यरत असते; मतदान हा नागरिकांना दिलेला हक्क आहेच पण मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकट करणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे व मतदानाचा हक्क बजावताना तो जबाबदारीने बजावला पाहिजे; ज्याप्रकारे आपण आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतो त्याच प्रकारे मतदानाचे कर्तव्यही आपण तितक्याच गांभीर्याने बजावले पाहिजे असे आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी आपल्या मनोगतात सांगितले व मतदान हि मनापासून आलेली दान भावना असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तसेच मतदाना दिवशी ७ मे रोजी जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास उपस्थित ज्येष्ठ मतदार श्री श्रीकांत वेंगुर्लेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच युवा मतदार रीना मराळ, हितेश सावंत व संकेत हसोळकर यांचेही गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सेवाभावी संस्थांचे प्रतीनिधी, महिला बचत गटांचे प्रतिनिधी, सहभागी झालेले सर्व शासकिय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शैक्षणिक संस्थांचे शिक्षक यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. महसूल विभागाच्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनासाठी मालवण नगरपरिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा तांत्रिक तज्ञ निखिल नाईक यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा