You are currently viewing स्मृति भाग ५७

स्मृति भाग ५७

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ५७* 

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आपण *दक्ष* स्मृति पहात आहोत . तसा गृहस्थाश्रमाचे मूळ हे गृहस्थाची पत्नि असते . म्हणून तिच्याविषयी सुटसुटीत आणि मोकळी व नेमकी चर्चा चवथ्या अध्यायात *दक्ष प्रजापतिंनी* केली आहे . ती म्हणजे चर्चा सगळ्यांना आवडावी अशीच आहे . ती आता पाहू .

 

*पत्नीमूलं गृहं पुंसां यदि च्छन्दोSनुवर्तिनी ।*

*गृहस्थाश्रमसमं नास्ति यदि भार्य्या वशानुगा ॥*

*तया धर्मार्थकामानां त्रिवर्गफलमश्नुते ।*

मनुष्यांच्या घराचा आधार पत्नि आहे , जर ती पतीच्या इच्छेनुसार आचरण असणारी आहे . जर ती पतीची वशवर्तिनी असेल तर गृहस्थाश्रमासारखा कोणताच आश्रम नाही . पत्निद्वारे तो धर्म , अर्थ व काम त्रिवर्गाचे फल प्राप्त करु शकतो .

हा पत्नीच्या सद्गुणांवर प्रजापतिंनी टाकलेला विश्वास नव्हे का ? पण पुढे ते असंही सांगतात— जर पत्नी स्वेच्छाचारिणी असेल आणि पती जर अति स्नेहाने तिला रोखत नसेल तर ती कालांतराने उपेक्षा केलेल्या रोगासारखी पति आज्ञेच्या बाहेर जाते . आजाराची उपमा काय चपखल बसवली आहे ! असे अलंकार समजायलासुद्धा स्वतंत्र बुद्धि लागते ना ? ते समजले नाही म्हणून आपण यंत्रयुगातील मन व बुद्धीने अतिमागासले जीव झालो आहोत !!!!

 

*अनुकूला न वाग्दुष्टा दक्षा साध्वी प्रियंवदा ।*

*आत्मगुप्ता स्वामिभक्ता देवता सा न मानुषी ॥*

पति अनुकूल आचरण करणारी , वाणीने दुष्ट शब्द न बोलणारी , घरकामात चतुर , पवित्र आचरण करणारी , गोड बोलणारी , स्वतःची रक्षा करणारी आणि पतिवर श्रद्धा ठेवणारी ती माणूस नसून देवताच आहे .

खरंच आपली संस्कृती स्त्रीच्या किती रुपात देवता पाहते ? हा संशोधनाचा व कर्त्याला पुरस्काराने मण्डित करण्याचाच विषय आहे . अशा आपल्या उन्नत , मंगलदायी , विश्व कल्याणाची मनिषा बाळगणार्‍या संस्कृतीत स्मृतिविरोधी विचार घुसल्यानेच आपण उद्ध्वस्त होत आहोत ना ? त्यात पहिली पत्नी कशी व दुसरी कशी असते यांचे सालंकृत केलेले वर्णन वाचनीयच आहे ! वेळप्रसंगी तिला खून पिणार्‍या जलौकेची ही उपमा प्रजापतिंनी दिली आहे .भार्या कोण , लक्ष्मी कोण हे सर्व सांगत लोकगौरव कुणाचा होतो ? हे पुढील श्लोकाद्वारे वर्णन केले आहे .

 

*शिष्यो भार्य्या शिशुर्भ्राता पुत्रो दासः समाश्रितः ।*

*यस्यैतानि विनीतानि तस्य लोके हि गौरवम् ॥*

ज्या मनुष्याचा शिष्य , पत्नि , लहान मुलगा , भाऊ , मुलगा , दास आणि आश्रित जन हे सर्वच्या सर्व विनीत आहेत , त्याचाच लोकांमधे गौरव आहे .

मन प्रसन्न करणारा श्लोक वाटतो ना ? एवढा सूक्ष्म विचार आजचा विचारवंत करु शकतो ??? आम्ही फक्त एका ऐतिहासिक व आपल्या समाज्याच्या माणसाला पकडायचे , त्याचे नावाने सगळे फायदे कसे पदरात पडतील , याचा विचार करायचा , नसेल फायदा तर समूह मस्ती करायची आणि सामाजिक जीवन उद्ध्वस्त करत बसायचे !!! *चरणे आणि मरणे याशिवाय असणारे जीवन म्हणजे संस्कृती* हेच विसरलो आपण . आणि याला कारण आजची राज्यपद्धती !! पुढे सतीत्वाचे संदर्भात दोन श्लोक येतात व अध्याय संपतो , उद्या पुन्हा नवीन !!🙏🙏

आज थांबतो . तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा