You are currently viewing आरसीबीने रोमहर्षक सामन्यात यूपी वॉरियर्सचा २ धावांनी केला पराभव

आरसीबीने रोमहर्षक सामन्यात यूपी वॉरियर्सचा २ धावांनी केला पराभव

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

महिला प्रीमियर लीगचा दुसरा सामनाही रोमांचक झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना आरसीबीने जिंकला. आरसीबीने धडाकेबाज खेळ करत यूपीचा २ धावांनी पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली. प्रथम खेळताना आरसीबीने १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात यूपीने ७ बाद १५५ धावा केल्या. शोभनाने विजयाकडे जाणाऱ्या आरसीबीला रोखले. शोभनाने एकाच षटकात ३ विकेट घेत आपले ५ बळी पूर्ण केले आणि आरसीबीला सामन्यात परत आणले. आरसीबीच्या फलंदाजीत ऋचा घोष आणि मेघना यांनी अर्धशतके झळकावली.

नाणेफेक जिंकल्यानंतर यूपीने आरसीबीला फलंदाजी करण्यास सांगितले. सोफी डिव्हाईन (१), स्मृती मानधना (१३) आणि एलिस पेरी (८) स्वस्तात बाद झाल्या. यानंतर सबिनेनी मेघनाने ५३ धावांची शानदार खेळी केली आणि ऋचा घोषने ६२ धावांची शानदार खेळी खेळून संघाची धुरा सांभाळली. आरसीबीने ६ गड्यांच्या मोबदल्यात १५७ धावा केल्या. यूपीकडून राजेश्वरी गायकवाडने २ बळी घेतले.

प्रत्युत्तरात यूपीने एलिसा हिलीची विकेट झटपट गमावली. ती ५ धावा करून बाद झाली. यानंतर वृंदा दिनेशने १८ आणि ताहलिया मॅकग्राने २२ धावा केल्या. दोघी बाद झाल्यानंतर ग्रेस हॅरिस आणि श्वेता सेहरावत यांनी परिस्थिती सांभाळली. दोघींनी अनुक्रमे ३८ आणि ३१ धावांची खेळी खेळली.

शोभना आशाने युपीकडे जाणारा सामना एकाच षटकात ३ बळी घेत फिरवला आणि आपले ५ बळी पूर्ण केले. या स्पर्धेत पंचक मारणारी ती पहिली भारतीय ठरली. तिलाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. शेवटच्या षटकात यूपीला ११ धावांची गरज होती पण दीप्ती ते करू शकली नाही आणि आरसीबीने २ धावांनी सामना जिंकला.

प्रतिक्रिया व्यक्त करा