You are currently viewing ऑस्ट्रेलिया १४ वर्षांनंतर अंडर-१९ विश्वचषक विजेता

ऑस्ट्रेलिया १४ वर्षांनंतर अंडर-१९ विश्वचषक विजेता

*चौथ्यांदा विजेतेपद पटकावले*

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

जागतिक कसोटी विजेतेपद २०२३ आणि एकदिवसीय विश्वचष २०२३ च्या अंतिम सामन्यामध्ये वरिष्ठ स्तरावर भारताचा पराभव केल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने आता कनिष्ठ स्तरावर देखील भारतीय चाहत्यांची मने मोडली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे खेळल्या गेलेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यांनी टीम इंडियाचा ७९ धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात गडी गमावून २५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ४३.५ षटकांत १७४ धावांवर गारद झाला.

 

कांगारूंनी वर्षभरात तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न भंगले आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव केला होता. त्यानंतर गेल्या वर्षीच १९ नोव्हेंबरला कांगारूंनी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा पराभव केला होता आणि आता ८५ दिवसांनंतर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा तिसऱ्यांदा विजेतेपदाच्या सामन्यात पराभव केला आहे.

 

अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचे हे चौथे विजेतेपद आहे. याआधी त्यांनी १९८८, २००२ आणि २०१० मध्येही विजेतेपद पटकावले होते. ऑस्ट्रेलियाने १४ वर्षांनंतर अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे तर भारत पाच वेळा विजेता ठरला आहे. भारताने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये विजेतेपदावर कब्जा केला होता. यासह ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा अंडर-१९ विश्वचषक जिंकण्याचा भारताचा इरादाही उधळला. आतापर्यंत केवळ पाकिस्तानलाच सलग दोनदा अंडर-१९ विश्वचषक जिंकता आला आहे. २००४ आणि २००६ मध्ये त्यांनी विजेतेपद पटकावले होते.

 

पुरुष आणि महिला अशा दोन्ही आयसीसी स्पर्धा एकत्र करून सलग चार आयसीसी विजेतेपद जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला संघ ठरला आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये, ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर जून २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून कसोटी विश्वविजेतेपद पटकावले. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून एकदिवसीय विश्वचषक चषक स्पर्धा जिंकली आणि आता फेब्रुवारी २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून अंडर-१९ विश्वचषक जिंकला आहे.

 

अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ तिसऱ्यांदा आमनेसामने आले होते. यापूर्वी २०१२ आणि २०१८ मध्ये टीम इंडियाने अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. २०१२ मध्ये उन्मुक्त चंद आणि २०१८ मध्ये पृथ्वी शॉ हे भारतीय संघाचे कर्णधार होते. अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कांगारूंनी टीम इंडियाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात गडी गमावून २५३ धावा केल्या. संघाची सुरुवात खराब झाली. राज लिंबानीने सॅम कॉन्स्टासला त्रिफळाचीत केले होते. त्याला खातेही उघडता आले नाही. मात्र, त्यानंतर कर्णधार ह्यू वेबगेनने हॅरी डिक्सनच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. वेबगेन आणि डिक्सन या दोघांचीही अर्धशतके हुकली. नमनने दोघांनाही तंबूमध्ये पाठवले. वेबगेन ६६ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने ४८ धावा करून बाद झाला तर डिक्सन ५६ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४२ धावा करून बाद झाला. यानंतर हरजस सिंगने ६४ चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५५ धावांची खेळी केली. रायन हिक्सने २० आणि राफ मॅकमिलनने दोन धावा केल्या. चार्ली अँडरसन १३ धावा करून बाद झाला. टॉम स्ट्रेकर आठ धावा करून नाबाद राहिला आणि ऑलिव्हर पीक ४६ धावांवर नाबाद राहिला. राज लिंबानीने तीन, नमन तिवारीने दोन तर सौमी पांडे आणि मुशीर खान यांना प्रत्येकी एक गडी बाद केले.

 

२५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अर्शीन कुलकर्णी तीन धावा करून बाद झाला. यानंतर आदर्श सिंग आणि मुशीर खान यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी महाली बिर्डमनने मोडली. त्याने आधी मुशीर आणि नंतर कर्णधार उदय सहारनला तंबूमध्ये पाठवले. मुशीर ३३ चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने २२ धावा करून बाद झाला तर उदय आठ धावा करून बाद झाला. यानंतर मागच्या सामन्याचा हिरो सचिन धास काही विशेष करू शकला नाही आणि तो नऊ धावा करून तंबूमध्ये परतला.

 

वेगवान गोलंदाजांनंतर ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाज राफे मॅकमिलनची चमक पाहायला मिळाली. सचिनशिवाय त्याने अरवली अवनीश आणि राज लिंबानी यांना तंबूमध्ये पाठवले. तर, चार्ली अँडरसनने प्रियांशू मौलियाला बाद केले आणि बियर्डमॅनने आदर्श सिंगला बाद केले. आदर्शने ७७ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४७ धावांची खेळी केली. अखेरीस मुरुगन अभिषेकने ४२ धावा केल्या, पण ते पुरेसे नव्हते. टॉम स्ट्रेकरने सौमी पांडेला बाद केले आणि भारताचा डाव ४३.५ षटकांत १७४ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून महाली बियर्डमन आणि मॅकमिलन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. त्याचवेळी कॅलम विडेलरने दोन विकेट घेतल्या. चार्ली आणि स्ट्रेकर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

महाली बियर्डमनने १५ धावांमध्ये ३ गडी बाद केले. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तर दक्षिण आफ्रिकेच्या क्वेना मफाका याने ६ सामन्यांमध्ये २१ गडी बाद करत स्पर्धावीर पुरस्कारावर आपले नाव कोरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा