You are currently viewing शांत सुसंस्कृत शहराला गालबोट लागू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करा…

शांत सुसंस्कृत शहराला गालबोट लागू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करा…

शांत सुसंस्कृत शहराला गालबोट लागू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करा…

शांतता समितीच्या बैठकीत आवाहन: पोलिस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न..

सावंतवाडी

शहरात शांतता राखावी म्हणून सर्व समाजाच्या बांधवांनी सहकार्य करावे. समाजातील तणावामुळे शहराची बदनामी होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी कायदा सुव्यवस्था अबाधित राखून योग्य ती माहिती पोलिसांना द्यावी. आपल्या शांत सुसंस्कृत शहराला गालबोट लागू नये यासाठी सर्वांनी सहकार्य करा, असे आवाहन सावंतवडी पोलिस ठाण्यात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.

सावंतवाडी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक पोलिस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आनारोजीन लोबो, जगदीश मांजरेकर, सिताराम गावडे, राजू बेग, गोविंद वाडकर, श्रीपाद चोडणकर, अभिमन्यू लोंढे, रफिक मेमन, पुंडलिक दळवी, बाळासाहेब बोर्डेकर, तौकीर शेख, संदेश परब, विलास जाधव, अफरोज राजगुरू, दत्ता सावंत,हितायततुल्ला खान, सोहेब बेग, शफीक खान,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले,आगोस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, शहरात तणाव निर्माण होत नाही. पण दुर्दैवाने घटना घडली लोक रस्त्यावर उतरले पण लोकप्रतिनिधीनी लोकांना शांतता राखावी म्हणून आवाहन करायला हवे होते.शहराची बदनामी होत आहे त्यामुळे प्रत्येक समाजाने शांतता राखावी म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. नगरपरिषद स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दारूच्या बाटल्या मिळतात. अवैध धंदे बंद झाले पाहिजे. अवैध धंद्यातून असे प्रकार घडू शकतात.यावर नियंत्रण आले पाहिजे, असे आवाहन बबन साळगांवकर यांनी केले.

माजी नगराध्यक्षा आनारोजीन लोबो म्हणाल्या, प्रशासने शांतता राखण्याचे काम करताना समाजाने देखील शांतता राखावी. माजी नगरसेवक राजू बेग म्हणाले, तो मजकूर सोशल मिडियावर कोठून आला ते तपासून घ्या. पुंडलिक दळवी यांनी शहरातील प्रकार पोलिसांनी गंभीरपणे हाताळले. जगदीश मांजरेकर म्हणाले, प्रत्येक समाजाने खबरदारी घेतली पाहिजे. सावंतवाडी शहरात अशा घटना घडत नाहीत. लोक शांतता राखावी म्हणून प्रयत्न करत आहेत.

सिताराम गावडे म्हणाले, कालची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या ठिकाणी हिंदू ,मुस्लिम, ख्रिश्चन सर्व गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यामुळे झाल्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे. गोविंद वाडकर म्हणाले, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करत आहे. समाजा सोबत पालकांची जबाबदारी वाढली आहे. शहरात मोती तलावाच्या काठावर लोकांना फुटपाथवर फिरण्यासाठी सहज मिळाले आहे. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिले आहेत.

तर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले म्हणाले, दुर्दैवी घटना घडली त्यानंतर लोक आक्रमक झाले. शांतता होती ती नंतर अबाधित राहिली.सोशल मिडिया बाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो अवैध धंदे बंद करण्यासाठी पुढाकार घेऊ. उपजिल्हा रुग्णालयाच्या जवळपास फटाके आतषबाजी होते ती बंद करू, असे स्पष्ट केले.

शेवटी पोलिस निरीक्षक त्रषीकेश अधिकारी म्हणाले, पोलिसांना माहिती देणं गरजेचं आहे. शहरात पुन्हा असं घडू नये. सावंतवाडी शहरात अचानक तणाव निर्माण झाला तसे चित्र शहरात नको.ज्याच्या विरोधात तक्रार केली तर कारवाई होईल. कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे आणि कोणी बिघाड करत असेल तर कारवाई करावी लागेल असे स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा