You are currently viewing आंबा व काजू फळपिकावरील कीड- रोग व्यवस्थापनासाठी हॉर्टसॅप प्रकल्प सुरू

आंबा व काजू फळपिकावरील कीड- रोग व्यवस्थापनासाठी हॉर्टसॅप प्रकल्प सुरू

*आंबा व काजू फळपिकावरील कीड- रोग व्यवस्थापनासाठी हॉर्टसॅप प्रकल्प सुरू*

*सिंधुदुर्ग*

आंबा व काजू फळपिकांकरीता क्रॉपसॅप योजनेअंतर्गत कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापनसाठी महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) “आंबा व काजू पिक” सन २०२३-२४ हा प्रकल्प कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधील ३६ तालुक्यांमध्ये १ ऑक्टोंबरपासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाचा कालावधी ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे.
फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) “आंबा व काजू पिक” अंतर्गत आंबा व काजू फळपिकांकरीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी तसेच निश्चित प्लॉटधारक शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत येणार्‍या प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्यामार्फत प्रशिक्षणे घेण्यात आली. त्यामाध्यमातून आंबा व काजू फळपिकांवरील कीड-रोगांची ओळख, नियंत्रणाच्या उपाययोजना, निरीक्षणे घेण्याच्या पद्धती तसेच हवामानातील बदल व अवेळी पावसामुळे उद्रेक करणार्‍या कीड-रोगांच्या प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, भारतीय कृषि संशोधन परिषद नवी दिल्ली, कृषि विद्यापीठे, विविध संशोधन केंद्र व कृषि विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयातून योजनेचे काम केले जात आहे. यासाठी किमान ५०० आणि जास्तीत जास्त २००० हेक्टर क्षेत्रासाठी एक सर्वेक्षक, कृषि पर्यवेक्षक गावातील निश्चित प्लॉट व रॅन्डम प्लॉटमधून दर सोमवार, मंगळवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी सर्वेक्षण करून पिकांची अवस्था व कीड-रोगांची निरीक्षणे करून अहवाल नोंदवतात. कीड-रोग नियंत्रक कृषि अधिकारी या योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करतात. जर कीड-रोग आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त असल्यास कृषि विद्यापीठामार्फत त्यावर मार्गदर्शक सूचना (सल्ले) पाठविण्यात येतात. त्यानुसार कीड-रोगांचे नियंत्रणाचे उपाय केले जातात.
कोकण विभागातील शेतकर्‍यांना तांत्रिक मार्गदर्शनासाठी प्रक्षेत्रावर शेतीशाळा आयोजित केल्या जातात. कोकण विभागातील आंबा फळपिकासाठी ३६ व काजूकरीता २१ शेतीशाळा असून त्यासाठी क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. याचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ तालुक्यांसाठी त्यांच्या उपविभागस्तरावर कृषि चिकित्सालय, नांदगाव व तालुका बीजगुणन केंद्र, माणगाव येथे एकूण २ प्रशिक्षणे आंबा व काजू पिकांकरीता आयोजित केली होती. या प्रशिक्षणाच्या तांत्रिक सत्रात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार देसाई यांनी काजू पिकावरील किडी-रोगांची ओळख व नियंत्रण आणि आंबा पिकावरील रोगांची ओळख व नियंत्रण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अजय मुंज यांनी आंबा पिकावरील महत्वाच्या किडींची ओळख व नियंत्रण याविषयी व डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी आंबा पिकावरील इतर दुय्यम किडींची ओळख व नियंत्रण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा