You are currently viewing साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या मंचावर “ज्ञानगंगा” प्रकाशित

साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या मंचावर “ज्ञानगंगा” प्रकाशित

सावंतवाडी :

शिक्षक रमेश गावडे यांच्या ‘ज्ञानगंगा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या मासिक ३५ व्या कार्यक्रमात करण्यात आले. कट्ट्याचे समन्वयक तथा साहित्यिक विनय सौदागर यांचे हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळेस प्रसिद्ध चित्रकार प्रकाश कब्रे उपस्थित होते.

सुरुवातीच्या प्रास्ताविकानंतर जयप्रकाश पेडणेकर यांनी काव्यसंग्रह निर्मितीची पार्श्वभूमी सांगितली. त्याचे टप्पे विशद केले. त्यानंतर साहित्यिक विनय सौदागर यांच्या हस्ते ‘ज्ञानगंगा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. “हा काव्यसंग्रह दोन भागात असून पहिला भाग हा शालेय मुलांसाठी उपयुक्त आहे तर दुसरा भाग हा सामाजिक विषयासंबंधी आहे. मला या दुसर्‍या भागातील कविता अत्यंत आवडल्या असून गावडे यांचेमध्ये एक दर्जेदार कवी होण्याची क्षमता आहे. त्यांनी काव्यलेखन चालू ठेवावे,” असे प्रतिपादन सौदागर यांनी या प्रसंगी केले.

आपल्या मनोगतात कवी गावडे म्हणाले, “या कविता मी मुलांसाठी व शिक्षकांसाठी लिहिल्यात. आनंददायी शिक्षणासाठी या कवितांचा वापर व्हावा.” सर्व प्राथमिक शाळांना हे पुस्तक विनामूल्य देण्याचा विचारही त्यांनी बोलून दाखवला.

या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले चित्रकार प्रकाश कब्रे यांनी गावडेंचे कौतुक केले व त्याना प्रोत्साहन दिले. सगुणी शेटकर यानीही मनोगत व्यक्त केले.

शेवटी सानिया शेख, मानसी पांचाळ, प्रभाकर मोरजकर आणि आयान शेख यांनी काव्यसंग्रहातील चार कविता गाऊन सादर केल्या. कट्ट्याच्या मागील कार्यक्रमात जाहीर केलेली शरद परुळेकर पुरस्कृत ‘पुस्तक वाचन’ योजना कार्यान्वित करणेत आली. पहिल्या टप्प्यात ‘ययाती’, ‘क्रौंचवध’, ‘अमृतवेल’ आणि ‘करुळचा मुलगा’ ही चार पुस्तके सदस्यांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

या कार्यक्रमास प्रा. कौलापुरे, प्रियांका कब्रे, अनिता सौदागर, दिक्षा आसोलकर, दत्ताराम शेटकर, एकनाथ शेटकर, सिंधू दीक्षित, रोहित आसोलकर आदी साहित्य प्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा