दत्ता सामंतांनी जिल्हाध्यक्षपद सोडावे – दीपक सुर्वे
चिंदर ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दत्ता सामंत यांच्यावर टीका; विकासकामांबाबत खुले आव्हान
मालवण / प्रतिनिधी :
“जर माझ्या चिंदर गावात दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून १४ विकासकामे केली असतील तर मी माझ्या पंचायत समिती गटनेता पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. अन्यथा दत्ता सामंत यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा,” असे खुले आव्हान चिंदर पंचायत समिती सदस्य तथा मालवण पंचायत समिती भाजप गटनेते दीपक सुर्वे यांनी दिले आहे.
दीपक सुर्वे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. दिलेल्या प्रसिद्धीपत्रात त्यांनी म्हटले आहे की, “खरेतर खोटे बोल पण रेटून बोल ही आजपर्यंतची दत्ता सामंत यांची राजकीय नीतीच राहिली आहे. आता चिंदर गावची निवडणूक जवळ आली आहे म्हणून त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना चिंदर गाव दिसले. यापूर्वी कधी का नाही दिसले?
लोकांना सांगायचे एक आणि प्रत्यक्षात करायचे दुसरे, तसेच आमदार-खासदार निधी मिळवायचा हे त्यांचे नेहमीचे काम आहे. चिंदर गाव हे भौगोलिक दृष्ट्या मालवण तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. त्यात काही पाणंद रस्ते राहिले असतील तर त्यातील २-३ पाणंद रस्त्यांची कामे केली असतील. बाकी ठेकेदारी घेतलेले निकृष्ट कामे पुन्हा दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.
आता खर्च केलेले पैसे हे आमच्या गावातील निकृष्ट कामांमधून उरलेल्या पैशांतूनच असतील,” असा टोला दीपक सुर्वे यांनी लगावला. “सध्या एवढेच सांगतो, उर्वरित आवश्यकतेनुसार अधिक बोलेन,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
