You are currently viewing कृष्ण .. एक कर्मयोगी…

कृष्ण .. एक कर्मयोगी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*कृष्ण .. एक कर्मयोगी…*

 

 

खूप मोठा गहन विषय आहे हा! जगाचा नियंता कृष्ण

फक्त कर्मावर विश्वास असणारा व कर्म करा असा संदेश

देणारा कृष्ण म्हणतो..

 

“नियतं कुरू कर्म त्वंम्…

 

तुमच्या वाट्याला जे काम आले आहे ते निर्लेप भावनेने करा.

त्याचे फायदे तोटे नफा नुकसान या कडे पाहू नका.फलाशा

तर मुळीच धरू नका. इथेच तर आमचे घोडे अडते ना? फलाशा धरू नका? केवढे अवघड काम सांगतात हो कृष्ण?

अहो, आमचे सारे जीवनच फलाशेवर चालते. अपेक्षे विना

आम्ही कामच करू शकत नाही इतकी ती हाडीमांसी खिळली

आहे.एखादे काम दुसऱ्यासाठी केले रे केले की आम्ही स्वत:ला

महान समजायला लागतोच शिवाय तो कुठेतरी कृतज्ञ राहून

आपल्याला काही देईल, चार जागी आपली प्रसंशा करेल

याची वाट पाहतो. आणि जर का त्याने असे केले नाही तर…

लगेच तो आम्हाला कृतघ्न वाटू लागतो. त्याच्या काही अडचणी असतील हे आम्ही गृहित धरतच नाही व आमची

इतकी मजाल की त्याची कुचाळकी करायलाही आम्हाला शरम वाटत नाही इतके आम्ही घसरतो, म्हणून मी सुरूवातीलाच म्हटले की, मोठे अवघड काम कृष्ण आम्हाला

सांगतात जे आम्हाला जमणे अत्यंत अवघड वाटते.

 

 

खरे तर, देण्यातील आनंद हा सर्वश्रेष्ठ आनंद असतो. मग तुम्ही

काही ही द्या..(उपरोधाने असे म्हणू या की, शिव्या देण्यातही

खूप लोकांना आनंद मिळतोच की!)अहो, तुम्ही जे द्याल, त्याग

कराल, झिजाल, त्याच्या दुपटीने ते तुम्हाला परत मिळते हे लोकांना का कळत नाही हेच मला समजत नाही? कृष्ण स्वत:

जीवनभर देत आला.जेव्हा जिथे ज्याला जे पाहिजे ते ते तो देत

आला.देव असला तरी मनुष्य म्हणून जन्माला आला होता तरी

कुठेच मनुष्यत्वाचे भान सुटले नाही.त्याच्या इतके निर्लेप आपल्याला होता आले नाही तरी अनुकरण करण्याचा प्रयत्न

तरी आपण करायला हवा ना?आपल्याला मिळालेले षड्रिपू

आपल्याला वरदानच आहेत पण आपल्याला त्यांची मर्यादा

सांभाळता येत नाही, कुठे थांबावे हेच कळत नाही म्हणून

स्वत:ला दोषी न ठरवता आपण विकारांना दोष देतो व घोंगडे

झटकून मोकळे होतो. भुजंगाला दगड मारल्यावर त्याने फुत्कार

टाकलाच पाहिजे पण त्याने चावता कामा नये.ही मर्यादा त्याने

पाळायलाच हवी.तसेच आपले ही आहे.मर्यादा पाळायला हवी, म्हणजे सर्व प्रश्न सुटतात.रिपू हे रिपू न राहता मित्र होतात.

 

कृष्ण म्हणतात, मनुष्य जन्मात तुमच्या वाट्याला आलेली

सर्व कर्मे करा. उदा. संसार .. हो, तुम्ही संसारात पडला आहात

तर संसार नीट करा. सत्कर्म कराच, नेकीने करा पण..

सारी कर्मे मला अर्पण करा.”कृष्णार्पणमस्तु “ म्हणा. सतत माझे चिंतन करा.तुम्ही माझा भाग आहात मलाच येऊन मिळणार आहात. तुमचा श्वास प्राण मीच आहे.

गोकुळात कृष्णाने आपल्या बाल लालांनी सर्वांना वेड लावले.

वृंदावन वासियांना अलोट प्रेमात न्हाऊ घातले. त्यांच्यावर

आलेले प्रत्येक संकट अंगावर घेतले व त्यांना सुखात ठेवले.

तो फक्त देत राहिला. वास्तविक जन्मदात्रीच्या प्रेमाला तो वंचित होता. तो स्वत: विधाता असूनही विधीलिखीत म्हणून

साऱ्या गोष्टी त्याने स्वीकारल्या.कर्ता करविता असूनही तो म्हणतो, मी काही करत नाही. हे सारे ठरलेले आहे.त्याच्या

इतके नि:ष्काम आपल्याला होता येणार नाही पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?

 

 

कौरव पांडव युद्धात ही त्याची भूमिका रक्षण करतो तो धर्म!अशीच होती.

म्हणून समेटाचे सारे प्रयत्न त्याने टाळले नाहीत.ते संपल्यावरच

युद्धाचा निर्णय झाला. दुर्योधनाची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली होती की, समोटाच्या सभेत तो कृष्णाला जखडून जेरबंद करू

पहात होता. हा विश्वाचा बाप आहे हे त्याला कधीच कळले

नाही व स्वार्थांध होऊन चुकांमागून चुका तो करत राहिला व

शेवटी विनाशाप्रत गेला.म्हणून म्हणतात जे विधीलिखीत आहे

ते कधीच टळत नाही. कष्ण सतत देणे शिकवत गेला त्याग

शिकवत गेला, तसे वागत राहिला. अती झाल्यावरच त्याने

क्वचितच शस्राला हात घातला व अन्यायाचा नि:प्पात केला.

आपणा सर्वांना ज्ञात असा शेवटचा महत्वाचा प्रसंग म्हणजे

युद्धभूमीवर ऐनवेळी अर्जुनाने गलीतगात्र होण्याचा! ते जरी

स्वाभाविक वाटले तरी आता त्याला फार उशिर झाला होता.

आता शस्र उचलणे आवश्यकच होते. म्हणून अर्जुना, पाप पुण्य स्वर्ग नरक काय ते मी पाहून घेईन. तू आता शत्रूशी

लढ. तसे न केल्यास मात्र तू नक्की दुर्गतीला जाशिल. सर्व

माझ्यावर सोपव व विजय मिळव हेच तुझे आता साध्य आहे व

त्या साठी शस्र हेच साधन आहे.

 

 

असा हा कर्म शिकवणारा कर्मयोगी कृष्ण जे सांगतो ते आपण

नक्की केले पाहिजे. मला सारे अर्पण करा व चिंता मुक्त व्हा!

अजून काय हवे हो! काम करा, चांगले करा, काय मिळेल याची अपेक्षा करू नका. किती सोपे आहे हो..! मग करायला

नको का? चला तर मग ..

 

“कृष्णार्पणमस्तू ..म्हणू नि सुखात राहू..”

 

आणि हो, ही फक्त माझी मते आहेत, सहमत झालात तरी

ठीक, नाही झालात तरी ठीक …

 

धन्यवाद …

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा