*वेंगुर्ल्यात भारतीय जनता पक्षाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा; ‘राष्ट्र प्रथम’ मंत्राचा जागर करत चौकाचौकांत झाले ध्वजारोहण*
वेंगुर्ले
भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त आज वेंगुर्ले शहरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करून आणि विविध उपक्रम राबवून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “भाजपा म्हणजे केवळ राजकीय पक्ष नसून तो राष्ट्रसेवेचा, विचारांचा आणि समर्पणाचा अखंड प्रवास आहे,” अशा भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
*शून्यातून विश्वनिर्मिती आणि संघर्षाचा गौरव:*
६ एप्रिल १९८० रोजी शून्यातून स्थापन झालेल्या या पक्षाने आज कार्यकर्त्यांच्या त्याग आणि निष्ठेमुळे शिखरापर्यंत भरारी घेतली आहे. वेंगुर्ले येथील कार्यक्रमात बोलताना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांतून आणि अटलजी-अडवाणींच्या परिश्रमातून उभा राहिलेला हा पक्ष आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक स्तरावर सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे.
*महाराष्ट्रातील विकासाचे नवे मॉडेल:*
राज्यात स्व. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी ग्रामीण भागात पक्षाची मजबूत पायाभरणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सत्तेच्या माध्यमातून विकासाचे नवे मॉडेल सादर करण्यात आले. जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग आणि ‘लाडकी बहीण’ यांसारख्या प्रभावी योजनांच्या अंमलबजावणीमुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात मोठा बदल घडला आहे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
*वेंगुर्ल्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण:*
स्थापना दिनानिमित्त वेंगुर्ले शहरातील प्रमुख चौकाचौकांत, तसेच बुथ स्तरावर पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘भारत माता की जय’ आणि ‘भारतीय जनता पार्टीचा विजय असो ‘ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शहरातील भाजप कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.
*’माझा परिवार, भाजपा परिवार’चा निर्धार:*
“राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हा मंत्र हृदयात बाळगून वेंगुर्ल्यातील कार्यकर्त्यांनी आगामी काळात अधिक जोमाने समाजकार्य करण्याची शपथ घेतली. भारताला अधिक सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर बनवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री.विष्णू परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, नगराध्यक्ष राजनजी गिरप, उपनगराध्यक्ष विनायक गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभुखानोलकर, महिला मोर्चा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनवेल फर्नांडिस, तालुका सरचिटणीस वसंत तांडेल, प्रीतम सावंत, सुधीर पालयेकर, सचिन शेट्ये, रविंद्र शिरसाठ, सदानंद गिरप, आकांक्षा परब, गौरी मराठे, गौरी माईणकर, काजल कुबल , गणेश माईणकर , सायमन आल्मेडा शक्ती केंद्र प्रमुख, संतोष सावंत आणि आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
