*ज्येष्ठ कवी मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”थांबवी हे समर आता”*
हे “युद्ध” आता थांबवी रे
उठ तू दयाघना
नेत्री अश्रू आणूनी मी,
करितो तुज ही प्रार्थना. /१/
माणसानै माणसाशी,
स्वार्थ येथे साधला
आग ओकूनी, शस्त्र आली
काय होती यातना. /२/
विश्व सारे आज येथे
भयभीत आहे “केशवा”
सुबुद्धी च्या “वेणू नादे ”
डोलवी”नर जीवना”. /३/
षड्रिपूंचा” स्पर्श आहे
आज येथे जाहला
युद्ध घडवूनी काय केले
साध्य तू विचारी मना. /४/
थांबवी हे “समर” आता
थांबवी “संहार” हा
नेत्री अश्रू आणूनी मी
करितो तुज ही प्रार्थना /५/
तप्त ऐशा वसुंधरेला
तोषवी “शित गारवा”
मानवाच्या या मतीला
तोषवी तू वामना. /६/
नेत्री अश्रू आणूनी मी
करितो तुज ही प्रार्थना…….
रचना:– मोहन मराठे..
सर्वांचं अस्तित्व नष्ट करणारे हे युद्ध हे परमेश्वरा आता थांबू दे…. युद्ध कर्त्यांना मानवतेची, प्राणीमात्रांची कीव येऊ दे…..या पृथ्वी मातेच्या पोटावर होणारे दाहक घाव शांत होऊ दे……
