दहावी बारावीची परीक्षा संपल्यानंतर प्रत्येकाला पुढे काय करायचे हा प्रश्न पडतो. आज सर्वत्र बेरोजगारांचा प्रश्न भेडसावीत आहे. सुशिक्षित बेकारीची संख्या वाढत आहे .पण युवकांनी अगदी प्रमाणिकपणे प्रयत्न केल्या केल्यास त्याला प्रशासनात प्रवेश मिळून शकतो. त्यासाठी थोडी मेहनत काळजीपूर्वक सातत्याने व आत्मविश्वासाने करण्याची गरज आहे.
ध्येय ठरवा
विद्यार्थ्यांनी पुढे चालून आपल्याला काय व्हायचे आहे हे ठरविले पाहिजे व त्यादृष्टीने आपला जीवनक्रमाची आखणी केली पाहिजे. प्रत्येक मुलाला डॉक्टर इंजिनीयर व्हावेसे वाटते. पण आपली आर्थिक मानसिक व शैक्षणिक परिस्थिती कशी आहे. त्याचाही विचार विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी केला पाहिजे. केवळ इतर जातात किंवा या दोन व्यवसायाला क्रेझ आहे म्हणून त्याकडे वळू नये. म्हणून सर्व प्रथम ध्येय निश्चित करा. तुम्हाला ज्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने आवड आहे. त्या क्षेत्राची निवड करा.
स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय
माझ्या मते स्पर्धा परीक्षा हे ध्येय विद्यार्थ्यांनी ठरविले पाहिजे. या माध्यमातून पटकन एक रुपयाही खर्च न करता नोकरी मिळू शकते. आज विविध क्षेत्रात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड केली जाते. आय ए एस, एम पी एस सी, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन असे कितीतरी पर्याय आहेत. पण या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास पदवी परीक्षेच्या प्रथम वर्षापासून जर केला तर तो विद्यार्थी पदवी परीक्षेनंतर एकाच एकाच वर्षात नोकरी मिळवू शकतो. पण त्यासाठी जिद्दीने सातत्याने नियोजन बद्ध अचूक प्रयत्न करण्याची गरज आज आहे.
आपले व्यक्तिमत्व घडवा
विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपले व्यक्तिमत्व घडविले पाहिजे. तो तत्पर तेजस्वी व तपस्वी असला पाहिजे. अभ्यासात प्रगती केलीच पाहिजे. पण त्याचबरोबर भाषणे वाद-विवाद गटचर्चा क्रीडा गायन बुद्धिमत्ता चाचणी मुलाखत तंत्र या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व समृद्ध करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मुलाखतीला समोरे जावे लागते. त्यासाठी व्यक्तिमत्व घडविणे गरजेचे आहे.
रोज 30 प्रश्न सोडवा
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासनात व इतरत्र जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी रोज 30 प्रश्न सोडविण्याचा सराव केला पाहिजे. रोजचे 30 तर महिन्याचे 900 एका वर्षाचे 10800 प्रश्न सोडवून होतील. एमपीएससीला प्रश्न येतात फक्त 200 आणि यूपीएससी ला प्रश्न येतात फक्त 180. जो विद्यार्थी तीन वर्ष रोज 30 प्रश्न सोडवेल त्याचे प्रश्न सोडून होतील 33000. तो विद्यार्थी ह्या परीक्षा सहज पास होऊ शकेल. फक्त सातत्याने सराव करीत राहणे गरजेचे आहे.
शासकीय संस्था
महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारली आहेत. तिथे प्रशासनाची निवासाची भोजनाची व विद्या वेतनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. मुंबईला एस आय ए सी, पुण्याला यशदा, कोल्हापूर औरंगाबाद अमरावती व नागपूर येथे एस आय ए सीच्या शाखा कार्यरत आहेत. तिथे सर्वसाधारणपणे प्रत्येक बॅचला 60 मुलांना प्रवेश दिला जातो. इथे विद्या वेतनही मिळते. याशिवाय प्रत्येक विद्यापीठात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र आहेतच.
हेल्पलाइन
शासकीय यंत्रणेशिवाय बऱ्याच खाजगी संस्थाही या क्षेत्रात कार्य करीत आहेत. अमरावतीची विद्यापीठ रोडवरील जिजाऊ नगरातील मिशन आयएएस अंतर्गत काम करणारी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही अशीच एक सेवाभावी संस्था आहे. याठिकाणी सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत या अकॅडमीला 373 आयएएस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या अकादमीचा हेल्पलाइन क्रमांक 9890967003 हा असून अकादमीचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे हे स्वतः या हेल्पलाइनवर 24 तास उपलब्ध असतात.
विद्यार्थ्यांनो अधिकारी व्हा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये मुलींसाठी 30 टक्के आरक्षण आहे. खरंतर विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. प्रशासनात आज महिलांची गरज आहे. एका सर्वेक्षणानुसार फक्त 1.51 टक्के महिला प्रशासनात आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या जागा महिलांची वाट पाहत आहेत. म्हणून मुलांनी प्रशासकीय सेवेकडे वळणे गरजेचे आहे. मागासवर्गीय विद्यार्थी प्रशासनात मागासवर्गीय विद्यार्थीसाठी आरक्षण आहे व याशिवाय त्यांना प्रशासनात जाण्यासाठी शासनाने विविध खात्यामार्फत प्रशिक्षणाची व विद्यावेतनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. आदिवासी युवक व युवतींसाठी आदिवासी विभागाने विविध योजनांची व प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ घेऊन युवकांनी प्रशासनात गेले पाहिजे. प्रशासन म्हणजे देशसेवा. केंद्र शासनात किंवा महाराष्ट्र शासनात तुम्हाला रोजगार मिळाला तर त्या माध्यमातून अनेक लोकोउपयोगी कामे करता येतात. शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत प्रामाणिकपणे पोचविता येतात. याशिवाय नोकरीमध्ये कायम स्वरुपी पगाराची सोय असते. फार तर बदली होईल. पण तडकाफडकी काढून टाकल्या जात नाही. आपण स्वच्छेने आनंदाने व समाधानाने शासनात काम केले तर विविध पुरस्कार देऊन तुम्हाला गौरविण्यातही येते.
एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची लिपिक किंवा टंकलेखक या परीक्षेसाठी जास्त शैक्षणिक पात्रतेची गरज नाही. किमान शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांना ही परीक्षा देता येते हे अनेकांना माहीत नाही. लिपिक आणि टंकलेखक ह्या त्या परीक्षा आहेत. ज्यांची परिस्थिती पुढे शिकण्याची नाही अशा विद्यार्थ्यांनी एमपीएससीची ही परीक्षा दिली पाहिजे. ही परीक्षा वैकल्पिक असते. दहावी स्तरावरचे प्रश्न या परीक्षेत विचारले जातात. या परीक्षेला मुलाखत नसते. लेखी परीक्षेच्या आधारावरच उमेदवाराची निवड केली जाते. यूपीएससी म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची आय ए एस ची परीक्षा दरवर्षी मे महिन्यात होते. या परीक्षेची जाहिरात प्रसार माध्यमावर प्रसिद्ध होते.
मित्रांनो. चला उठा. दहावी बारावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करू या. या संदर्भात तुम्हाला काहीही अडचण आली तर अमरावतीची डॉ पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमी तुम्हाला विनामूल्य मार्गदर्शन करावयास तयार आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक – डॉ पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी जिजाऊ नगर महापौरांच्या बंगल्यासमोर विद्यापीठ रोड अमरावती कॅम्प
9890967003
