You are currently viewing ठाण्यात क्षमता एनजीओच्या कर्मचाऱ्यांसाठी छायाचित्रण प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न

ठाण्यात क्षमता एनजीओच्या कर्मचाऱ्यांसाठी छायाचित्रण प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न

ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) :

सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे मांडता यावे, तसेच दृश्य दस्तऐवजीकरण आणि संवाद कौशल्ये वृद्धिंगत व्हावीत, या उद्देशाने क्षमता एनजीओच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी विशेष छायाचित्रण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम रामचंद्र नगर, ठाणे येथील क्षमता ट्रान्सफॉर्मेशन सेंटर येथे उत्साहात पार पडला.

या प्रशिक्षण सत्राचे मार्गदर्शन सुप्रसिद्ध छायाचित्रकार सुश्री अर्चना देशपांडे जोशी यांनी केले. त्यांनी सहभागींना कॅमेरा हाताळणी, छायाचित्र रचना, प्रकाशयोजना, फ्रेमिंग तसेच मोबाईल फोन आणि कॅमेऱ्यांचा व्यावहारिक वापर अशा मूलभूत व उपयुक्त बाबींचा सविस्तर परिचय दिला. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी सांगितले, “सामाजिक कार्य करताना योग्य दृश्य माध्यमाचा वापर आपली कथा अधिक प्रभावीपणे मांडण्यास मदत करतो,” असेही त्यांनी अधोरेखित केले.

सत्रादरम्यान सामाजिक क्षेत्रातील दस्तऐवजीकरण, अहवाल लेखन आणि कथाकथनासाठी छायाचित्रणाचा प्रभावी उपयोग कसा करता येईल, यावर विशेष भर देण्यात आला. व्यावहारिक प्रात्यक्षिके आणि परस्परसंवादी चर्चांमुळे सहभागी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळाला आणि त्यांच्या दैनंदिन कार्यात उपयुक्त ठरणारी छायाचित्रण तंत्रे आत्मसात करता आली.

प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सुश्री श्यामाश्री भोसले, सुलोचना कपिल आणि सुश्री दीप्ती या मान्यवर विशेष पाहुण्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सहभागी कर्मचाऱ्यांना सामाजिक कार्यात दृश्य माध्यमांचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे बे व्ह्यूच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

क्षमता एनजीओचे कर्मचारी मोठ्या उत्साहाने या प्रशिक्षणात सहभागी झाले असून, सत्र माहितीपूर्ण व सुबक रचनेचे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संस्था समाजातील वंचित आणि लैंगिक हिंसाचाराच्या पीडित महिलांच्या पुनर्वसाहासाठी कार्य करते. ती महिलांना मानसिक आरोग्य, कौशल्य विकास, नोकरी आणि स्थिर उपजीविकेच्या माध्यमातून सक्षमीकरणाच्या दिशेने मार्गदर्शन करते. क्षमता एनजीओचे उद्दिष्ट म्हणजे महिलांना जीवनावर नियंत्रण मिळवून समाजात सन्मानाने व आत्मनिर्भरतेने जगता यावे. अशा क्षमता-निर्मिती उपक्रमांमुळे संस्था आपल्या संघटनात्मक प्रभावाला बळकट करत राहते.

प्रतिक्रिया व्यक्त करा