*नाचणीच्या हिरव्या अंकुरांतून साकारली ‘जिवंत भारतमाता*’
*घारपी शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती, शेती व पर्यावरणाचा सुरेल संगम*
*बांदा*
भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राबविण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाने देशभक्तीला जिवंत रूप दिले आहे. शाळेच्या ध्वजस्तंभाजवळ विद्यार्थ्यांनी नाचणी (रागी) या स्थानिक व पौष्टिक तृणधान्याची पेरणी करून भारतमातेचा नकाशा साकारत राष्ट्रप्रेम, शेती आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश दिला आहे.
काही दिवसांतच नाचणीला फुटलेले हिरवेगार अंकुर संपूर्ण नकाश्यावर पसरल्याने जणू हिरव्या कोंबांतून ‘जिवंत भारतमाता’ अवतरल्याचा भास होत आहे. या सजीव प्रतीकातून राष्ट्रीय एकात्मता, संविधानाविषयी आदर आणि मातृभूमीप्रती असलेली निष्ठा विद्यार्थ्यांच्या मनात अधिक खोलवर रुजत आहे.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली भारतमातेच्या नकाशाची अचूक आखणी करत नाचणीची पेरणी केली. त्यानंतर नियमित पाणी देणे, देखभाल करणे अशी जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली. या प्रक्रियेतून शिस्त, संयम, जबाबदारी आणि सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकायला मिळाले.
या उपक्रमातून देशभक्तीबरोबरच शेतीचे मोल, शेतकऱ्यांचे अमूल्य योगदान, स्थानिक तृणधान्यांचे पोषणमूल्य तसेच पर्यावरण संवर्धनाची गरज प्रभावीपणे अधोरेखित झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त राबविण्यात आलेला हा उपक्रम उपस्थित पालक, ग्रामस्थ व पाहुण्यांचे विशेष आकर्षण ठरला असून, शाळेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची परंपरा अधोरेखित करणारा ठरला आहे. हा नकाशा साकारण्यासाठी शाळेतील विद्यार्थी लक्ष्मण नाईक,राज गावडे, बाबाजी कविटकर, बळीराम गावडे या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली असून या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक जे.डी.पाटील, सहकारी शिक्षक धर्मराज खंडागळे, मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे यांचे मार्गदर्शन लाभले.
