You are currently viewing “कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध – पालकमंत्री नीतेश राणे

“कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध – पालकमंत्री नीतेश राणे

“कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध – पालकमंत्री नीतेश राणे

*कणकवली तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन

* भजनी कलाकारांच्या प्रश्नांसाठी संतोष कानडे करत असलेल्या पाठपुराव्याचे केले कौतुक

*पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार

कणकवली :

कणकवली येथे आयोजित तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नीतेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पुढील चार वर्षांत भजनी कलाकारांसाठी अधिकाधिक योजना, मानधन, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. भजन सदन उभारणी, कलाकार मानधन वाढ, तसेच पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. भजनी कलाकारांना न्याय व ओळख मिळवून देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
भजनी कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी न्याय मिळावा, या उद्देशाने कणकवली येथे आयोजित ‘तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचा’ उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात पालकमंत्री नाम. नीतेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री आपल्या कोकणातीलच आहेत. तसेच मंत्रिमंडळात माझ्या शब्दाला वजन असल्याने, पुढील चार वर्षांच्या काळात भजनी कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आपल्याकडे काम थांबवणारे विरोधकच उरले नसल्याने, आपण जास्तीत जास्त विधायक काय घडवू शकतो, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा विश्वास पालकमंत्री नीतेश राणे यांनी व्यक्त केला.

कणकवली येथे आयोजित ‘तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या’ उद्घाटन सोहळ्यात मंत्री नीतेश राणे बोलत होते. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेवक राकेश राणे, ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज, भजनी कलाकार समितीचे अध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष प्रकाश पारकर, माजी सभापती बुलंद पटेल, सुरेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

नीतेश राणे म्हणाले, भजनी कलाकार समितीचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर संतोष कानडे यांनी आपल्या पदाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. वारकरी संप्रदाय आणि भजनी कलाकारांना सरकारशी जोडणारा एक भक्कम दुवा म्हणून ते कार्यरत आहेत. योग्य व्यक्तीच्या हाती नेतृत्व गेल्यावर संस्थेचा कायापालट कसा होतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांच्या प्रश्नांसाठी संतोष कानडे सातत्याने पाठपुरावा करत असतात. प्रत्येक अधिवेशनात ते कलाकारांच्या मागण्या घेऊन माझ्याकडे येतात. महाराष्ट्रातील इतर कलां प्रमाणेच कोकणातील या समृद्ध भजन संस्कृतीची दखल सरकारने घेणे आवश्यक आहे. सरकारकडे देण्याची क्षमता मोठी आहे, फक्त त्यांना या गोष्टींची जाणीव करून देणारे नेतृत्व हवे असते, असे मंत्री राणे म्हणाले.

संतोष कानडे म्हणाले, संत मंडळींनी दिलेल्या वारसाचे तंतोतंत पालन करून भजन कलाकारांसाठी पालकमंत्री चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३० वर्षांत भजनी कलाकारांना कोणीही दाद दिली नव्हती, कोणीही ओळखही केली नव्हती. ती ओळख निर्माण करण्याचे काम पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले, त्यामुळे या स्पर्धेला पालकमंत्री चषक हे नाव दिले आहे.

भजनी कलाकार हा अजूनपर्यंत वंचित होता. त्याला कधीही कोणी न्याय देण्याचे काम केले नाही. महायुतीचे सरकार आल्यावर पालकमंत्री नीतेश नारायण राणे यांनी भजन कलाकारांना न्याय देण्याचे काम केले. भजनी कलाकारांना कोठेही मानधन मिळत नव्हते. मात्र नाम. नीतेश राणे यांनी मला कलाकार मानधन समितीचा अध्यक्ष केल्यानंतर २२०० रुपये एवढे मानधन होते. मात्र पालकमंत्री राणे यांनी सरकारकडे सततचे पत्रव्यवहार व पाठपुरावा करून ते मानधन ५ हजार रुपये एवढे करून घेतले. त्याचबरोबर भजन कलेशी संबंधित असलेली प्रलंबित व नवीन कामे मंत्री नीतेश राणे यांनी केल्याने या स्पर्धेला पालकमंत्री चषक असे नाव देण्यात आले आहे.

सर्व भजनी कलाकार एकाच छताखाली रहावे यासाठी कणकवलीत भजन सदन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी जागाही निश्चित करण्यात आली आहे. त्याचे बांधकाम काही दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. गेल्या आठ महिन्यांत एवढ्या योजना उपलब्ध करून देणारा माणूस म्हणजे नीतेश राणे, असे संतोष कानडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन पालकमंत्री नीतेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.

बॉक्स:

पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वारकऱ्यांना पंढरपूर येथे आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मी प्रयत्नशील आहे. खासदार नारायण राणे यांच्याशी चर्चा देखील करणार आहे. पंढरपूर येथे जागा घेतली आहे. त्याठिकाणी येत्या दोन ते तीन वर्षांत वारकरी भवन उभारण्यात येणार आहे. या वारकरी भवनामध्ये निवास व्यवस्था, भोजन, स्वच्छतागृहे तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, पंढरपूर वारीच्या काळात तसेच इतर वेळीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही मंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा