शासन पातळीवरील अडचणी सोडविण्यासाठी नागरिकांना लेखी स्वरूपात तक्रारी मांडण्याचे आवाहन
वेंगुर्ले :
राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.
नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी शासन स्तरावर त्वरीत सोडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यापूर्वी झालेल्या जनता दरबारांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून, अनेक प्रश्न तत्काळ मार्गी लावले गेले आहेत. काही समस्या संबंधित विभागामार्फत सोडविण्यात आल्या तर अनेक अडचणींवर जनता दरबारातच तोडगा काढण्यात आला.
वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांना जर शासन पातळीवरील काही समस्या किंवा अडचणी असतील, तर त्यांनी या दरबारात सहभागी होऊन आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात मांडाव्यात, असे आवाहन भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी केले आहे.
