You are currently viewing स्वतंत्रतेचे स्तोत्र
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

स्वतंत्रतेचे स्तोत्र

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योती कुळकर्णी यांनी स्वा.सावरकरांच्या कवितेचे केलेले रसग्रहण*

*स्वतंत्रतेचे स्तोत्र*

स्वा.सावरकरांच्या अनेक उत्कृष्ट कवितांमधूनही ही कविता मला अतिशयच आवडते.मोराचा पिसारा ज्याप्रमाणे सुंदर रंग लेवून मोराचा बाज खुलवितो, त्याचप्रमाणे आशयसौंदर्य, भाषासौंदर्य व काव्यसौंदर्याने मराठी भाषेचा बाज खुलविणारी तसेच छंदबद्ध,वृत्तबद्ध व लयबद्ध असलेली ही कविता मला फारच आवडते.

स्वा.सावरकरांचे विचारधन म्हणजे शुद्ध, निखळ सौंदर्य! त्याला आणखी आशयघनता देऊन आणि विविध अलंकारांनी नटवून त्यांनी ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे.देशप्रेमाची तीव्र भावना व उपजत बुद्धिमत्ता यामुळेच त्यांना हे शक्य झाले आहे.

आपण काव्यार्थाचा आस्वाद घेऊ या. कवितेकरता घेतलेली मध्यवर्ती कल्पना अतिशय सुंदर रितीने त्यांनी आपल्यापुढे मांडली आहे.

आपण आपल्या संस्कृतीत जलदेवता, अग्निदेव, वरुणदेव मानले आहेत.त्यांचा कोप होऊ नये म्हणून आपण त्यांची प्रार्थना करत असतो.हीच कल्पना डोळ्यापुढे ठेऊन, स्वतंत्रतेलाच देवी मानून,तिने पारतंत्र्यातून भारतमातेला मुक्त करावे यासाठी प्रार्थना करण्यास हे स्तोत्र लिहिले आहे.

आपण बघतोच की घरात कर्त्या पुरुषाची हुकूमशाही असली,वागण्याच स्वातंत्र्य अजिबात नसले तर सगळ्यांचाच जीव गुदमरतो.परकीय सत्तेच्या अंमलाखाली पूर्ण देशच त्याकाळी गुदमरला होता.त्यातून सुटकेसाठीच्या इच्छेच्या भावना या कवितेतून व्यक्त झाल्या आहेत.
” हे मातृभूमि तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले”
हेच त्यांच्या साहित्याचे उद्दिष्ट आहे.

अशाच देशभक्तिच्या उदात्त आशयसौंदर्यानी युक्त अशी ही कविता आहे.शब्दसौंदर्य व इतरही अलंकारांनी नटलेल्या कवितेचे वर्णन करायला खर म्हणजे माझ्यासारखीचे शब्दच अपुरे पडतील.

जगातल्या प्रत्येक गोष्टीचे सौंदर्य खुलायला स्वातंत्र्य अत्यावश्यक असते,हे किती सुंदर कल्पना व शब्दांचा मेळ घालून या कवितेत त्यांनी मांडले आहे बघा…..

स्वातंत्र्यामधे काय सामावलेले नसते?म्हणूनच स्वातंत्र्य-देवीला आळवतांना ते म्हणतात….
“राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची
स्वतंत्रते भगवती!श्रीमती राज्ञी तू त्यांची”
हे स्वातंत्र्यदेवते!आमच्या राष्ट्राचे मूर्तीमंत चैतन्य तूच आहेस.पारतंत्र्यात असल्याने,तुझी अनुपस्थिती असल्याने साहाजिकच ते चैतन्यच आज हरवले आहे.तसेच नीती आणि संपत्ती यांची देखील तू राणी आहेस.कारण नीतीमत्ता काय?किंवा संपत्ती काय ? जो आपल्याला पारतंत्र्यात ठेवतो त्याच्या मर्जीवरच अवलंबून असते.
स्वातंत्र्यदेवते! तू कशी आहेस?तर…..
“परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी
स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी”
परवशतेचा काळ म्हणजे एक अंधःकारमय पर्व, या पर्वात मिळालेले थोडीशीही स्वातंत्र्याची आशा म्हणजे पर्वणीच!ही आशा म्हणजेच जणू लखलखणारी चांदणीच!जी आपल्याला आकर्षित करू शकते.योग्य प्रतिमान वापरून ‘चमचम’ ‘लखलखशी’ सारख्या शब्दांनी काव्याचे माधुर्य वाढतेच व ते वाचणे म्हणजे आपल्यालाही आनंदाची पर्वणीच!

प्रत्येकच कडव्यात मांडलेल्या एकापेक्षा एक सुंदर कल्पना म्हणजे शब्द आणि विचार यांचा अपूर्व संगमच! उपजत बुद्धिमत्ता व सुंदर कल्पना यांचे दुग्ध-शर्करा मिश्रणच!हे काव्यरसाचे मिश्रणच रसपाना साठी आपल्या समोर ठेवले त्यांनी. रसपान करतांना त्यांच्या आर्त शब्दांचे घोटही आपल्या मनाला भिडतात.
पूढे ते लिहितात…..
“गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली”
हे कडवे वाचतांना तर एक अपूर्व शब्दचित्रच आपल्यापुढे डोलते.गालावरच्या लालिमायुक्त सौंदर्याचे
फूल केव्हा विलसेल? गालावरच्या सुंदर फुलाची लाली मुक्त विहार करणार्‍या व्यक्तिच्या गालावरच विलसू शकेल.गालावरचे फूल किंवा फुलांचेच गाल ही एकमेकांवरच्या प्रत्यारोपाची भ्रांतिमान कल्पना एक अपूर्व शब्दमाधुर्य निर्माण करते. ते फक्त रसिकांनाच जाणवू शकते,व्यक्त करणे कठीणच!

पुढे देवीला किती अर्थपूर्ण विशेषणे लावतात बघा….
“तू सूर्याचे तेज उदधिचे गांभीर्यही तूची”
हे स्वातंत्र्यदेवते! सूर्याचे तेज तथा सागराचे गांभीर्यही तूच आहेस.अतिशय तेजस्वी असूनही ग्रहण लागल्यावर तो तेजोहिनच होतो.ग्रहण सुटल्यावरच त्याला परत पूर्वीचे तेज प्राप्त होते.सागराच्या गंभीरतेचा अर्थ तरी काय आहे?उथळ किनार्‍यावर,आपल्या मनातली खळबळ, लाटांच्या स्वरुपात धडकवण्याचे स्वातंत्र्य घेऊनच आतल्या खोल समुद्राला गंभीरतेचे सौंदर्य प्राप्त होते न!विचारस्वातंत्र्य नसतांना मांडलेल्या तत्त्वज्ञानाला काय अर्थ आहे?ते ही परतंत्रच असते.आणिबाणीत स्वराज्यात देखील आपण ते अनुभले आहेच.

त्यांची स्वातंत्र्याबद्दलची ओढच इतकी जबरदस्त होती की त्या व्यक्त करण्यासाठी त्यांनी मांडलेल्या कल्पना सहजस्फूर्तच वाटतात.भारतीय तत्त्वज्ञानातील कल्पनांचा आधार घेऊन पुढे ते म्हणतात….
“मोक्ष मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदान्ती”
मोक्ष आणि मुक्ति तरी काय?तुझीच म्हणजेच स्वातंत्र्याचीच रूपे! इतकेच नाही तर या जगात जे काही उत्तम! उदात्त! आणि नितांत सुंदर आहे त्याला ‘तुझा’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा’ परीसस्पर्श असतोच! कारण राजकीय दडपशाही असेल तर कुठलाही योग्य विचार, तत्त्वज्ञान मांडण्याचे स्वातंत्र्यच कुठे असते?पृथ्वी गोल आहे आहे हे सिद्ध करू शकत असला तरी शास्त्रज्ञाला ते मांडायचा अधिकार राजसत्तेच्याच मर्जीवर!

म्हणूनच दुर्गामाता,कालीमातेप्रमाणेच अधम
अधम लोकांच्या रक्ताने रंगलेल्या व चांगल्या लोकांचे पूजन करणार्‍या देवतेला ते सांगतात…..
“तुजसाठी मरण ते जनन,तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण चराचर शरण”
स्वातंत्र्यासाठी जगण्याची इच्छा असणारी पूर्ण चराचर
सृष्टी तुलाच शरण जाते,तुला मिळवण्याचीच धडपड करत असते.म्हणूनच आम्हा सगळ्या भारतवासीयांतर्फे मी तुला प्रार्थना करतो की आम्हाला अलिंगन द्यायला तू लवकर ये”
” सकल चराचर शरण चराचर शरण” अनुप्रासयुक्त ओळी मधून नादमाधुर्याबरोबरच आशयही द्विगुणीत होतो. अलंकाराचे सौंदर्य जपतांना अर्थाची ओढाताण कुठेही होत नाही या काव्यात!आशयासोबत अलंकार रत्नजडीत दागिण्यांप्रमाणे मिरवतात या कवितेत.

यानंतरच्या कडव्यात तर त्यांचा सूर अतिशयच हळवा व लाडिक झाला आहे.ते म्हणतात…..
“हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकराला
क्रीडा तेथे करण्याचा का वीट तुला आला”
प्रत्यक्ष भगवान शंकरालाही कैलास पर्वतावर रहाण्याचा मोह झाला आणि तुला मात्र येथे क्रीडा करायला देखील यावेसे वाटत नाही?
यानंतरची कल्पना बघा किती सुंदर आहे! ते म्हणतात ,जान्हवीचा सुधाधवल स्त्रोत अप्सरांना देखील सरसे करण्याला आवडतो.भारतभूमीला ‘सुवर्णभूमी’ म्हटल्या जाते.या सुवर्णभूमीत रहायला काय कमी पडले तुला?हव तर कोहिनूरचे ताजे पुष्प वेणीत माळायला घे पण इथे वास्तव्याला लवकर ये.पूर्वीप्रमाणेच आमच्यावर प्रेम कर.माझ्या सकलगुणसंपन्न मातेसाठी,तुला प्राप्त करण्यास यश मिळावे म्हणून मी माझ्या शब्दांची आरती करतोय तुझी!

खरच! या शब्दप्रभूने किती आंतरिक तळमळीने व सुंदर शब्दात आळवणी केली आहे या स्तोत्राद्वारे!

मम्मटाने काव्यप्रकाशात काव्याच्या रसास्वादासाठी अनेक निकष व अलंकारांचे वर्णन केले आहे.स्वा.सावरकरांनी देखील अर्थालंकार व शब्दालंकारांची पखरण करीत,उत्तमोत्तम कल्पना व प्रतीमांच्या आधारे काव्याची एक मनोहर यात्रा या कवितेद्वारे आपल्याला घडवली हे आपण बघितलेच.काव्यात गेयता असेल तरच एखादे सुंदर काव्य संदेशासकट लोकांपुढे सादर होते.मधुकर गोळवलकरांनी संगीतबद्ध केलेल हे गीत लतादिदींनी आपल्या मधुर आवाजात गाऊन अजरामर केले आहे.अर्थातच स्वा.सावरकरांची किर्ती म्हणजे ‘स्वयमेव मृगेंद्रता!
मम्मटानी काव्यप्रकाश मधे म्हटले आहे..
“काव्यं यशसेsर्थकृते, व्यवहारविदे,शिवेतरक्षतये,
सद्यःपरनिवृत्तये,कांतासंमिततयोपदेशयुजे”
काव्य यश,पैसा,कल्याणकारी,वाचल्याबरोबर आनंद देणारे,पत्नी व मित्राप्रमाणे योग्य मार्गदर्शन करणारे असावे.
देशासाठी घरादाराची होळी झालेल्या या देशभक्ताला अर्थप्राप्तीची अभिलाषा कधीच नव्हती.
पारतंत्र्यरूपी अमंगलाचा नाश व्हावा व देशाचे कल्याण व्हावे हेच यातून सूचित होते.सद्यः परिस्थितीत लोकांपुढे कार्याचे उद्दिष्ट काय असावे याचा परिपाठच या स्तोत्राने घालून दिला आहे.

त्यांच्या काव्याचे गाण्यामधून जे सुंदर रुपडे रसिकांपुढे येते ते हे गीत रसिक आपसुकच गुणगुणतात व नंतर त्यांच्याही मनात सावकरांइतकी नसली तरी अंशतः का होईना, देशभक्तिची भावना जागृत होते.त्यातूनच देशाने वेळोवेळी पुकारलेल्या आव्हानांना आपण एकत्र येऊन प्रतिसाद देतो.कानीकपाळी अोरडून सांगितलेल्या भाषणापेक्षा सुंदर काव्यातून निर्माण होणारी जागृती नक्कीच दीर्घकाळ परिणामकारक ठरते.

कुठलाही भाव मनात नसतांना ‘जयोस्तुते’ हे भावपूर्ण गीत कानावर पडते त्यावेळी गाण्यातील एकेक शब्द रसिकांच्याही मनात घर करून रहातो.त्यावेळी उरलेले असते ते गाण्याचे शुद्ध,सात्त्विक स्वरुप! आणि ते आपल्याला आनंदाची वारंवार प्रचिती आणून देत असते.

या काव्यात संस्कृतप्रचुर शब्द असूनही काव्याची मधुरता कुठेही कमी होत नाही.तसेच मला तरी असे वाटते की पहिल्यांदा वाचतांना काव्य थोडे कठीण वाटले तरी पुन्हा वाचतांना काव्य दुर्बोध वाटत नाही.मध्यवर्ती कल्पना नीट समजावून घेतल्यानंतर अनेक शब्दांचा अर्थ आपल्यापुढे आपोआप उलगडत येतो.कुठलेही कठीण शब्द उगाच मधे आल्यासारखे बोचत नाहीत.उलट हवा तो आशय व्यक्त करणारे व काव्याची गोडी वाढवणारेच वाटतात.ऐकणार्‍या प्रत्येकाला,तो कुठल्याही प्रकारच्या पारतंत्र्यात असला तरी हे गीत स्वातंत्र्याची ओढ लावल्याशिवाय रहाणार नाही.हेच या काव्याचे मोठे यश आहे असे मला वाटते.

*जयहिंद*

सौ. ज्योती प्रकाश कुळकर्णी.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा