You are currently viewing करूया जागर देवीचा
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

करूया जागर देवीचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

*करूया जागर देवीचा*

जागर

नवरात्री उत्सवाच्या निमीत्ताने मी माझे काही विचार
या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करते.
।।नमो देव्यै महादेव्यै
शिवायै सततं नम:
नम:प्रकृत्यै भद्रायै
नियत:प्रणता स्मताम् ।।

अश्विन शुद्धप्रतिपदे पासून घरोघरी घटस्थापना होते.
देवीचे मूर्त तेज वातावरण उजळते.मंत्रजागर आरत्या
यांचा नाद घुमतो.उदबत्त्या ,धूपार्तीचे सुगंध दरवळतात.
दररोज नवनवे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात.
नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रेही परिधान केली जातात.सर्वत्र उत्साह ,मांगल्य ,पावित्र्य पसरलेले असते.
लहानपणापासून आपण एक कथा ऐकत आलो आहोत. महिषासुराची. या महिषासुराने पृथ्वी आणि पाताळात अत्याचार माजवला होता.आणि त्यास स्वर्गाचे राज्य हासील करायचे होते.सर्व देव इंद्रदेवांकडे जाऊन ,महिषासूरापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात.इंद्र आणि महिषासुरात युद्ध होते व या युद्धात इंद्रदेव पराभूत होतात.
हतबल झालेले देव,ब्रह्मदेवाकडे येतात.व आसुरापासून रक्षण करण्याची विनंती करतात.
महिषासुराचा वध हा मनुष्यमात्राकडून होणे असंभव होते.मग ब्रह्मा, विष्णु,महेश यांच्या तेजातून एक स्त्रीशक्ती
निर्माण केली जाते.ही स्त्रीशक्ती म्हणजेच आदीमाया.
आदीशक्ती.दुर्गामाता.
शंकराचे त्रिशूळ,विष्णुचे चक्र,वरुणाचा शंख,यमाची गदा,तसेच कमंडलु,रुद्राक्ष,अशा दहा शस्त्रांची परिपूर्ण शक्ती…दशभुजा दुर्गा..सर्वशक्तीमान रुप.
तिचे आणि महिषासुराचे घनघोर युद्ध होते.व महिषासुराचे दारुण मर्दन होते.म्हणून ही महिषासुरमर्दिनी..
सिंहारुढ ,पराक्रमी,तेज:पुंज देवी.
नवरात्रीचे ,महाराष्ट्रात आणखी एक विशेष म्हणजे भोंडला.भोंडला म्हटले की शालेय जीवनातले दिवस
आठवतात.नवरात्रीत सगळ्या सख्या,नऊ दिवस .वेगवेगळ्या सखीकडे जमतात. पाटावर ,सोंडेत माळ धरलेल्या,हत्तीचं चित्र काढायचं,अन् त्या पाटाभोवती फेर धरुन एकेक प्रचलित लोकगीतं गायची..
तर असा हा भोंडला,भुलाई,हादगा ..
ऐलमा पैलमा
गणेश देवा
माझा खेळ मांडू दे
करीन तुझी सेवा।।

अक्कण माती चिक्कण माती
खळगा जो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई
जातं ते रोवावं…
अस्स जातं सुरेख बाई
शेल्यानं झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई
पालखीत ठेवावा
अश्शी पालखी सुरेख बाई
माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई
खायाला देतं
अस्सं सासरद्वाड बाई
कोंडून मारतं..
अस्सं आजोळ गोड बाई
खेळाया मिळतं…
गाणी रंगत जातात.सख्या आनंदाने फुलतात. आणि मग शेवटी..
बाणा बाई बाणा स्वदेशी बाणा
गाणे संपले खिरापत आणा..।।

खिरापत ही गुलदस्त्यातील.ती ओळखायची.अन् नंतर चट्टामट्टा करायचा…नवरात्री च्या या उत्सवातील,असा हा
पारंपारिक खेळ…सामुहिक आनंदाचा सोहळा.
अर्थात् नवरात्र म्हणजे देवीचाच ऊत्सव.तिची शैलपुत्री,ब्रह्मचारिणी,चंद्रघंटा ,कूष्मांडा,स्कंदमाता,
कात्यायनी,कालरात्री,महागौरी,सिद्धीदात्री ही निरनिराळी नऊ नावे असली तरी ती एकाच,आदीशक्तीची विविध रुपे
आहेत.देवीच्या कथाही अनेक आहेत.पण सामाईकपणे ही नारीशक्ती आहे.आणि तिचा अवतार,अहंकार,क्रोध, वासना पशुप्रवृत्ती,वासना यांचा संहार करण्यासाठीच झाला आहे…
दरवर्षी नवरात्री ऊत्सवात या सर्वांचं,मोठ्या भक्तीभावाने
पूजन,पठण होते.गरबा,दांडीयांचा गजरही या आनंदोत्सवाला सामायिक स्वरुप देतोच..
पण मग एका विचारापाशी मन येऊन ठेपतं…
आपले सर्वच सण,हे आध्यात्मिक संदेश घेऊन येतात..
अर्थपूर्ण.नैतिक संदेश.
ऊत्सव साजरे करताना या संदेशाचं काय होतं..?
ज्या स्त्रीशक्तीची नऊ दिवस पूजा केली जाते,दहाव्या दिवशी अनीतीचा रावण जाळला जातो ,आणि मग
अकराव्या दिवसापासून पुन्हा तीच हतबलता…??
खरोखरच स्त्रीचा सन्मान होतो का?
स्त्री सुरक्षित आहे का आज?
ज्या शक्तीपीठाची ती प्रतिनिधी आहे ,त्या स्त्रीकडे
किंवा त्या स्त्रीबाबत विचार करण्याचा समाजाचा ,दृष्टीकोन नक्की कसा आहे…?
आज तिच्या जन्माचा आनंदोत्सव होतो का?
कां तिला ऊमलण्याच्या आतच खुडलं जातं…?
ज्या पवित्र गर्भातून विश्वाची निर्मीती होते,त्या देहावर
पाशवी,विकृत वासनेचे घाव कां बसतात…?
विद्रोहाच्या घोषणांनी काही साध्य होते का?
समाजासाठी मखरातली देवी,आणि आत्मा असलेली ,
चालती बोलती स्त्री..ही निराळीच असते का?
असे अनेक प्रश्न ,अनेक वर्षे युगानुयुगे,अगदी कथांतून,पुराणातून,इतिहासातून व्यक्त झाले आहेत.
आणि आजही ते अनुत्तरीत आहेत.
स्त्रीचा विकास झाला म्हणजे नक्की काय झाले?
ती शिकली.आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली.उच्चपदे
तिने भूषविली.तिच्या वागण्या बोलण्यातही फरक
पडला.तिचा वेशही बदलला.ती आत्मनिर्भरही झाली.
पण तिचा संघर्ष संपला का?
तिचे हुंदके,तिची घुसमट,तिची होरपळ..आहेच त्या चौकटीत.
एका मोठ्या रेषेसमोरची ती एक लहान रेषच.
दुय्यमच. म्हणून डावलणं आहेच.सन्मान कुठे आहे तिचा…?
मग हा जागर कधी होणार?
तिच्या सामर्थ्याचं त्रिशूळ,बुद्धीचं चक्र,विचारांची गदा,
सोशिकतेचं कमंडलु ,भावनांची रुद्राक्षं, तेजाचे तीर …
जेव्हां धार लावून तळपतील ,तेव्हांच या शक्तीपीठाचा
ऊत्सव सार्थ ठरेल…
नवरात्री निमीत्ताने जोगवा मागायचाच असेल तर स्त्री
जन्माच्या पावित्र्याचा..मांगल्यांचा.शक्तीच्या आदराचाच
असला पाहिजे हे मनापासून वाटते…
हे देवी!तुझ्या दशभुजा, सर्व शस्त्रांसहित पसर आणि
तुझ्या दिव्य तेजाचंच दर्शन दे…..!!!

*सौ. राधिका भांडारकर अमेरिका*

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

प्रतिक्रिया व्यक्त करा