You are currently viewing बैल पोळा

बैल पोळा

*जागतिक साहित्य कला विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री हेमांगी देशपांडे लिखित अप्रतिम लेख*

*बैल पोळा*

भारत हा कृषिप्रधान देश आहे. सहाजिकच शेती संबंधी कार्यात मदत करणारे सर्व घटक महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत करणारा सर्वात महत्त्वाचा साथीदार म्हणजे बैल.
हा बैल शेतीतली सर्वजण व मेहनतीची कामे करतो. जसे पेरणी करणे ,नांगरणे, मोटे ने पाणी ओढणे, शेतीतील पीक बैलगाडीत भरून इकडून तिकडे ने आण करणे असे महत्त्वाचे काम करतो. म्हणून बैलाला शेतकऱ्याचा मित्रही म्हणतात.बैल शेतीची ही सारी कामे वर्षभर मुकाट्याने करत असतो. म्हणून त्याच्या या सेवेबद्दल कृतज्ञता दर्शवण्यासाठी शेतकरी एक दिवस बैलाची मनोभावे पूजा करतो. हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून पाळला जातो. पोळा हा बैलासाठी व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सण आहे.
तर असा हा बैलपोळा सण श्रावण मासाच्या अमावस्येला येतो. याला पिठोरी अमावस्या ही म्हणतात. पोळा हा श्रावण मासातील शेवटचा सण.
शिवारातील कामे आता संपलेली असतात. भर पावसात पेरणी करणारा, भर उन्हात नांगरणीची कामे केलेल्या बैलाच्या या मदतीचे ऋण फेडण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो.
“आज पुंजरे बैलाले
फेड उपकाराचे देण
बैला खरा तुझा सण
शेतकऱ्या तुझं रीन”
खरे तर बैलांनी केलेली मदत ही शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे ऋण असते.
पोळ्याच्या दिवशी बैलाला नदीवर घेऊन जातात त्याची आंघोळ घालून त्याला स्वच्छ केल्या जाते. त्यानंतर त्याची शिंगे रंगवितात. त्याच्या अंगावर रंगीत नक्षीकाम देखील करतात. त्याच्यावर झूल पांघरतात. गळ्यात फुलांच्या आणि घुंगराच्या माळा घालतात. आधीच धष्टपुष्ट असलेले बैल त्या दिवशी आणखीनच राजबिंडे व देखणे दिसतात.
शेतकरी बैलांची पूजा करतो. त्यानंतर त्यांना घरी केलेल्या पुरणावरणाचा गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो.
आता हा सजवलेल्या बैलाची गावात मिरवणूक काढतात. शेवटी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी किंवा मारुतीच्या पारावर गावातली सारी सजलेली बैल गोळा होतात. तिथे त्या सर्वांची पूजा होते. यालाच बैलपोळा भरणे असेही म्हणतात.नंतर हे सजवलेले बैल वेशीपर्यंत नेतात व घरी परततात. घरी आल्यावर बैलांची पूजा होते. कुठे बैलाच्या पाठीवर काकडी मोडतात.
बैल पोळ्या बद्दल काही पौराणिक कथाही आहेत.
असे म्हणतात एकदा शंकराने आपल्या नंदीलासांगितले की पृथ्वीवर जा आणि सर्वांना माझा संदेश दे की” एक वेळ जेवण आणि दोन वेळा आंघोळ करा”
पृथ्वीवर येता येता नंदी संदेश विसरतो त्याने पृथ्वीवासीयांना “दोन वेळा जेवण करा आणि एक वेळ आंघोळ करा” असा उलट संदेश दिला. भगवान शंकराने जेव्हा नंदीला या संदेशाबद्दल विचारले तेव्हा नंदिनी हा घोळ झाल्याचे सांगितले. तेव्हाच भगवान शंकर म्हणाले”आता पृथ्वीवर जाऊन व मानवाची दोन वेळ जेवणाची सोय कर.त्यांना अन्नधान्य पिकवण्यासाठी शेती कामात वर्षभर मदत कर.”हे ऐकून नंदिनी शंकरांना प्रार्थना केली व तो गयावया करू लागला. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितले की तू वर्षभर काम केले म्हणून शेतकरी वर्षातून एक दिवस श्रावण अमावस्येला तुझी पूजा करेल. तो दिवस म्हणजे बैलपोळा असे मानतात.
एक कथा अशी ही आहे की एकदा श्रीकृष्ण दिलेत भगवान श्रीकृष्णाने पोळा सूर नावाच्या एका असूराचा वध केला. तो दिवस श्रावणी अमावस्येचा होता. पोळा सुराच्या वधाचा प्रतीकात्मक दिवस म्हणून पोळा सण साजरा केला जातो असेही म्हणतात.
पोळ्याच्या अशा अनेक कथा आहे.
पोळा महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक विदर्भाच्या सीमेवर असलेले राज्य मध्य प्रदेश व तेलंगणा राज्यातही साजरा केला जातो.
महाराष्ट्रात या सणाला पोळा म्हणतात तर दक्षिण महाराष्ट्रात पोळ्याला बेंदूर किंवा बेंडर असेही म्हणतात. तर कर्नाटका कऱ्हूनावी या नावाने संबोधतात.
ज्यांच्या घरी खरे बैल नाही ते घरीच मातीचे बैल तयार करतात किंवा बाजारातून विकत आणतात व त्यांची पूजा करतात. दुसऱ्या दिवशी हीच मातीची बैल घेऊन बालगोपाल पोळा भरवतात व त्यांची पूजा करतात त्याला तान्हापोळा म्हणतात.
तर असा हा पोळा सर्व भारतीय शेतकऱ्यांचा लाडका सण आहे.
या दिवशी प्रत्येक शेतकरी हेच म्हणत असेल.
“सण बैलांचा आज पोळा
वाडा शिवार सार ,वाडवडिलांची पुण्याई
किती वर्णू तुझे गुण, मन मोहरुन जाई
तुझ्या अपार कष्टाने, बहरते सारी भुई
एका दिवसाच्या पूजे न हो कसा उतराई ”
तर असा हा बैलपोळा सर्व भारतीय शेतकऱ्यांचा लाडका सण आहे हे निश्चित.

सौ हेमांगी देशपांडे
चिंच भवन, नागपुर
मो .7350823742

प्रतिक्रिया व्यक्त करा