You are currently viewing संविधानाचे शिल्पकार

संविधानाचे शिल्पकार

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने लिहिलेला अप्रतिम लेख*

 

*संविधानाचे शिल्पकार*

 

संविधान किंवा राज्यघटना, हा, एखादा देश अथवा राष्ट्र चालविण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच असतो. हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. थोडक्यात संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारा संबधीच्या तरतुदीचा लिखित दस्तऐवज.

९ डिसेंबर १९४६ रोजी भारताची संविधान सभा ही भारताचे संविधान निर्माण करण्यासाठी स्थापन झाली. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि २९ आॉगस्ट १९४७ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली, भारतीय संविधानाच्या निर्मीतीसाठी, मसुदा समितीची स्थापना झाली होती.

संविधान सभेत एकूण २९९ सदस्य होते. डाॅ.राजेंद्रप्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा, विविध देशांच्या संविधानांचा गाढा अभ्यास होता.

त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करुन, संविधानाचा मसुदा तयार केला व तो सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा आणि मसुद्यात फेरबदल करुन तो अधिकाधिक निर्दोष करण्याचे काम डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले.

अंतीम मसुदा २६नोव्हेंबर१९४९रोजी संविधान समीतीने तो स्वीकारला. त्या संविधानाचे राष्ट्रार्पण दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी करण्यात आले. १९ नोव्हेंबर २०१५ रोजी भारत सरकारने २६ नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून घोषीत केले. संविधान संपूर्ण रुपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

संविधानाचे इंग्रजी आणि हिंदी भाषेत हस्तलिखित आहे. प्रेम बिहारी नाराईन राईजदा यांच्या सुंदर हस्ताक्षराने संविधान लिहिले गेले आणि नंदलाल बोस आणि इतर कलाकार यांच्याकडून त्यामधली कलाकृती केली गेली. १९५० सालचे संविधान हे १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर आधारित होते.

नागरिकत्व,निवडणुका आणि अंतरीम संसदे विषयीचेआणि इतर तात्पुरत्या बाबी त्यावेळी तात्काळ लागू झाल्या. सुरवातीला संविधानात, २२ भागात ३९५ कलम आणि ८ अनुसूची होत्या. आज संविधानात प्रस्तावना आणि २५ भागात ४४८ कलम १२ अनुसूची व ५ परिच्छेद आहेत. संविधानात आतापर्यंत १०३ दुरुस्ती झाल्या आहेत. भारतीय संविधानाच्या ऊद्देशिकेप्रमाणे, भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे. ही संविधानाची बैठक आहे.

त्यानुसार, संविधान म्हणजे देश चालवण्यासाठी केलेली मूलभूत नियमावली. जनतेकडून निवडून दिलेलेच लोकप्रतिनिधी सरकार स्थापन करु शकतात. संविधानातील तरतुदीनुसारच राज्यकारभार करण्याचे, शासनावर बंधन असते. संविधानात विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. संविधानातील तरतूदी अनेकविध आहेत. नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासक यांचे संबंध, निवडणुका, शासनाच्या मर्यादा, राज्यांचे अधिकारक्षेत्र, वगैरे बाबींबाबत संविधनात मार्गदर्शक सूत्रे आहेत.

इतिहास, समाजरचना, संस्कृती, धर्म, परंपरा या सर्वांचा विचार भारतीय राज्यघटना निर्माण करताना केला गेला आहे.

स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, कर्तव्ये, समता, न्याय, लोकशाही, बंधुता ही मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणे हा संघटना निर्मीतीचा मूळ उद्देश. एकतेत अनेकता जपणे हा दृष्टीकोन!

संविधान हा देशाचा अभिमान आहे. महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांसह भारतीय संविधानाच्या निर्मीतीत हातभार लावलेल्या, तमाम व्यक्तीमत्वांना मनापासून अभिवादन..!!!

त्याचबरोबर या निमीत्ताने एक आवर्जून सांगावेसे वाटते की संविधानातील मूलतत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवून त्यांना एक जागरुक नागरिक बनवणे हे पालक आणि शैक्षणिक संघटनांचे आद्य कर्तव्य आहे…

 

जयहिंद!!

 

सौ. राधिका भांडारकर. पुणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा