You are currently viewing प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने वेंगुर्ल्यात जनसुनावणी रद्द ….

प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने वेंगुर्ल्यात जनसुनावणी रद्द ….

वेंगुर्ला :

चेन्नई येथील संस्थेचे प्रतिनिधी आज वेंगुर्ल्यात संपन्न होणाऱ्या प्रत्यक्ष जन सुनावणी साठी गैरहजर राहिल्याने शासकीय अधिकारी यांनी ३ तालुक्यासाठी ठेवलेली जन सुनावणी रद्द केली. योग्य नियोजन नसल्याने आणि ग्रामस्थांना गृहीत धरल्याने अखेर दुसऱ्या दिवशीही जनसुनावणी रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली. मात्र वेंगुर्लेतील जनसुनावणी ठिकाणी एखाद्या दंगली प्रमाणे पोलिस सुरक्षा व्यवस्था ठेऊन दाबावाचा प्रयत्न करण्यात आल्याचे चित्र होते. दरम्यान तालुकानिहाय कार्यशाळा घेतल्यानंतरच पुढील जन सुनावणी घेण्यात येईल असे उपस्थित निवासी उपजिल्हाधिकारी सौ. शुभांगी साठे यांनी जाहीर केले. सीआरझेड जिल्हास्तरीय जनजागृती व समन्वय समिती, सिंधुदुर्ग यांच्या पाठपीराव्या काल शासनाने व्हीसी द्वारे ऑनलाइन जनसुनावणी आयोजित केली होती. मात्र त्या जनसुनावणी वेळी कोणाचाच कोणाला मेळ नसल्याने जिल्हाभरातून सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून निषेध केला. तसेच ती जनसुनावणी रद्द करण्यास भाग पाडले. आणि तालुकानिहाय जनसुनावणी घ्या अशी मागणी केली होती. प्रशासनाने मात्र तत्परतेने दुसऱ्या दिवशीच म्हणजे आज वेंगुर्ला, सावंतवाडी आणि कुडाळ या तीन तालुक्यातील नागरिकांसाठी वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात ऑफलाईन जनसुनावणी आयोजित केली होती. मात्र ज्या अधिकाऱ्यांनी हा आराखडा बनविला ते अधिकारी या वेळी उपस्थित राहिले नाहीत. तसेच जनतेच्या हरकती ऐकून त्यांच्या समर्पक उत्तरे देण्यासाठी ही कुणी नव्हते. तसेच वास्तविक तिन्ही तालुक्यांना एकत्र बोलावणे हे आजच्या कोरोना महामारीच्या काळात धोकादायक आहे. तरीही तसा निर्णय प्रशासनाने घेऊन आज जनसुनावणी चे सोपस्कार पूर्ण करण्याची दुसरी तयारी केली होती, ती ही फोल ठरली.
आजच्या वेंगुर्ला येथील या जनसुनावणी वेळी ज्यांनी आराखडा तयार केला ते चेन्नई येथील अधिकारीच उपस्थित नव्हते. या बाबत प्रथम सीआरझेड जिल्हास्तरीय जनजागृती व समन्वय समितीने उपस्थित अधिकारी यांच्याशी चर्चा केली. या विषयावरून दोन ते अडीच तास चर्चा रंगली पण ठोस उत्तरे मिळत नसल्याने संबंधित अधिकारी नसल्याने ही जनसुनावणी रद्द करावी अशी मागणी सर्वांनी लावून धरल्याने निवासी उपजिल्हाधिकारी यांनी उपरोक्त निर्णय घेतला. यावेळी तहसिलदार प्रवीण लोकरे, सभापती अनुश्री कांबळी, नगराध्यक्ष दिलीप गिरप, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चव्हाण आदी उपस्थित होते. या जनसुनावणी साठी समिती जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर तसेच वसंत तांडेल, भूषण नाबर, माजी सभापती जगन्नाथ डोंगरे जिल्हा परिषद सदस्य दादा कुबल, माजी नगराध्यक्ष सुनील दुबळे, सरपंच पप्पू परब, मनोज उगवेकर, गणेश तारी, सुमन कामत, रुपेश मुंडये, तुलसीदास ठाकूर, देवेंद्र डीचोलकर, वंदना किंळेकर यांच्यासह तिन्ही तालुक्यातील सर्व सरपंच, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.
वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालय बाहेर चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कार्यालयाच्या दोन्ही बाजूने बेरीगेट्स लावून रस्ता अर्धा सुरू ठेवला होता. तसेच दंगल नियंत्रण पथकही तैनात ठेवले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + nineteen =